डॉ. नंदा संतोष हरम ‘‘आई, कुठे आहेस तू?’’ निखिल घरभर आईला शोधत होता.‘‘अरे बाळा, इकडे स्वयंपाकघरात. आवराआवर करतेय. मलाही यायचंय खाली कार्यक्रमांना..’’ काम करता करता आई म्हणाली.‘‘आई.. नमस्कार करतो.’’ आई आशीर्वाद देत म्हणाली, ‘‘निखिल, छान होऊ दे प्रयोग तुझा. धांदरटपणा करू नकोस. धीटपणे परीक्षकांना सगळय़ा प्रश्नांची उत्तरे दे.’’ ‘‘हो आई,’’असं म्हणत सगळं सामान घेऊन निखिल खाली पळाला.निखिल रहात असलेल्या रवी- किरण सोसायटीचा वर्धापन दिन चालू होता. त्यानिमित्त आता वेगवेगळय़ा स्पर्धा होत्या. वेगवेगळय़ा वयोगटाच्या मुलांकरिता, मुलींकरिता, कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवक - युवतींकरिता संध्याकाळी ७ वाजता आयोजित केलेली स्पर्धा थोडी वेगळय़ा स्वरूपाची, प्रथमच घेण्यात येणार होती. ही स्पर्धा होती खास ७ वी ते ९वीच्या शालेय मुला -मुलींकरिता. त्यांनी एक विज्ञानाचा प्रयोग करून दाखवायचा होता. तेवढंच नाही तर तो प्रयोग करून झाला म्हणजे सगळय़ांचे प्रयोग करून झाले, की एकाच वेळी सगळय़ांना एकच प्रश्न विचारला जाणार होता. त्यावर विचार करायला १० मिनिटे दिली जातील. या प्रश्नाच्या उत्तरावर स्पर्धेचा विजेता ठरणार होता. मुलांना पेच पडला होता की सगळय़ांचे प्रयोग वेगवेगळे असणार. पण फक्त एकच प्रश्न कसा निर्णायक ठरणार? जशी मुलांना उत्सुकता होती, तशीच पालकांनाही. एकूण दहा स्पर्धक होते. सगळय़ांनी प्रयोग छान केले. प्रयोगाविषयी जे प्रश्न विचारले, त्याची उत्तरंही छान दिली. स्पर्धेत भाग घेतल्यामुळे मुलांनी तेवढी तयारीही केली होती ना!आता सगळय़ा स्पर्धकांना एका रांगेत स्टेजवर उभं केलं. प्रयोग चांगले केल्याबद्दल परीक्षकांनी सगळय़ांचं भरभरून कौतुक केलं. परीक्षक म्हणाले, ‘‘आता आला तुमचा कसोटीचा क्षण! प्रश्न विचारल्यावर फक्त १० मिनिटे तुम्हाला विचार करायला दिली जातील. जो कोणी समाधानकारक उत्तर देईल, तोच ठरेल या स्पर्धेचा विजेता! सगळे जण तयार..?’’सगळी जणं म्हणाली, ‘‘हो.. तयार..’’ परीक्षक म्हणाले, ‘‘तुमच्या आजूबाजूला दिसणारी गोष्ट, ऐकलेली घटना, टी.व्ही.वर बघितलेली जाहिरातसुद्धा असेल, अगदी कोणतीही गोष्ट.. जिच्यावरून तुमचा प्रयोग सुचू शकतो किंवा त्याचा संबंध आहे, असं तुम्हाला वाटतं. ते तुम्ही सांगा. चला विचार करा. मी घडय़ाळ चालू केलं आहे. १० मिनिटे झाली की घडय़ाळ दादा इशारा करतीलच.’’सगळीकडे शांतता पसरली. स्पर्धक विचारात बुडून गेले. पाच मिनिटे संपल्यावर परीक्षकांनी आठवण करून दिली. काही स्पर्धक अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. हाताची बोटं मोडत होते, डोकं धरून बसले होते. निखिलला आईने दिलेला कानमंत्र लक्षात होता. तो डोळे मिटून स्टेजवर बसला. चित्त एकाग्र केलं. त्याला पटकन् तीन वर्षांपूर्वीची अलिबागची ट्रिप आठवली आणि वाटेत त्याच्या दादांनी घेतलेला गोटी सोडा. त्यानं मनाशी थोडा विचार केला. उत्तराची जुळवाजुळव केली आणि हळूच हात वर केला. एखाद मिनिटातच घडय़ाळ दादांनी वेळ संपल्याचं ओरडून सांगितलं.परीक्षक म्हणाले, ‘‘निखिल, तू हात वर केलास. तुझा प्रयोग होता लिंबाने फुगवला फुगा. आता सांग बरं, व्यवहारात त्याचा कशाशी संबंध तू सांगू शकतोस?’’ निखिल म्हणाला, ‘‘सर, गोटी सोडय़ाशी. त्या बाटलीत कार्बनडायऑक्साईडच्या दाबामुळेच ती काचेची गोटी बाटलीच्या तोंडाशी बुचासारखी जाऊन बसते. माझ्या प्रयोगात लिंबाचा रस आणि खायचा सोडा यांच्यात अभिक्रिया होऊन जो कार्बन डायऑक्साईड तयार झाला त्यामुळेच फुगा फुगला. बरोबर आहे ना संबंध?’’ परीक्षक फार खूश झाले. त्यांनी निखिलचं खूप कौतुक केलं. त्याचवेळी ते इतर स्पर्धकांना म्हणाले, ‘‘तुम्ही कोणी निराश होऊ नका. अशा तऱ्हेची स्पर्धा आम्ही प्रथमच घेतली. या अशा तऱ्हेच्या प्रश्नांमुळे निरीक्षणशक्ती, विश्लेषण, विचारशक्ती या सगळय़ाला चालना मिळते. या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही स्वत:ला अशी सवय लावून घ्या. निखिलला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित करतो.’’निखिल खूप खूश झाला. त्याचे डोळे गर्दीत आपल्या आई - बाबांना शोधत होते. gokhale.chess@gmail.com