‘पाठीत दुखतंय.. अशी तक्रार तुमची मुलं वारंवार करतात? तुम्ही त्याची कारणं शोधलीत?’ अशा प्रश्नांचा भडिमार करत मागे एकदा एका चित्रवाणी वाहिनीने एखाद्या गौप्यस्फोटाच्या थाटात एक वृत्त प्रसारित केले. राष्ट्रीय स्तरावरील एका पाहणीत ‘पाठीवरचे दप्तराचे ओझे’ हे मुलांच्या पाठदुखीचे कारण असल्याचा निष्कर्षही निघाला होता. राज्यात सत्तांतर झाले आणि नवे शिक्षणमंत्री वजनकाटा घेऊन शाळांमध्ये गेले. त्यांनी मुलांच्या दप्तराचे वजन केले, तेव्हाचे फोटोही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले. या समस्येवर उपाय म्हणून शाळकरी मुलांना टॅब वाटण्याचा समारंभही मुंबईत गाजावाजापूर्वक झाला. त्याच्याही कितीतरी आधीपासून, ‘दप्तराचे ओझे’ या विषयावर चिंता आणि चर्चा झाली असली, तरी जेव्हा जेव्हा पुन्हा ही चर्चा सुरू होते तेव्हा तेव्हा पालक चिंतातुर होतात. पण अजूनही हा प्रश्न मात्र सुटलेला नाही. एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रश्नाएवढय़ा जटिल झालेल्या या समस्येच्या मुळाशी जाण्यात कोणते हितसंबंध आड येतात, या प्रश्नाने पालकवर्ग हैराण झालेला असतो. मुलांच्या पाठदुखीबरोबर पालकांची डोकेदुखी वाढीला लागलेली असते.

त्या दिवशी हा कार्यक्रम सुरू असताना माझा फोन वाजला. कोकणातल्या देवगड तालुक्यातल्या शिरगाव नावाच्या गावातील शमसुद्दीन आत्तार यांचा फोन होता. तिथल्या शाळेत ते शिक्षक आहेत. नववी-दहावीच्या मुलांना गणित, विज्ञान आणि खेडय़ातल्या मुलांना नेहमीच अवघड वाटणारे सगळे विषय ते रस घेऊन शिकवतात आणि मुलं त्या अवघड विषयांशी अक्षरश: खेळायला लागतात. अवघडातले अवघड गणित घेऊन ते सोडवण्याचा वेगळाच छंद शिरगावातल्या शाळेतील अनेक मुलांना लागला, त्याचं कारण आत्तार सर! त्याच आत्तार सरांचा फोन होता.. गेल्या ऑगस्टमध्ये आत्तार सरांची २०१७ मधील ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ म्हणून निवड झाली. दरवर्षी जगभरातील शिक्षकांसाठी मायक्रोसॉफ्ट ही स्पर्धा घेत असते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात, यावर शिक्षकांकडून प्रकल्प मागवला जातो. या प्रकल्पातून निवडक प्रकल्पांची निवड केली जाते. मग वर्षभर या शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षणे, मायक्रोसॉफ्टच्या नवनवीन उत्पादनांची माहिती व उपलब्धता आणि मुख्य म्हणजे, जगभरातील इतर शिक्षकांशी संवादाची संधीही मिळते. यातील काही शिक्षकांना तर ग्लोबल टीचर्स फोरमला हजर राहण्याचीही संधी मिळते. २०१७ साठी जगभरातील ४८०० शिक्षकांची निवड झाली, त्यात आत्तार सरही आहेत. त्यांनी उत्साहाने ही बातमी मला सांगितली, आणि आमचा संवाद पाठीवरच्या ओझ्याकडे वळला..

‘टीव्हीवरचा कार्यक्रम पाहताय ना?’असं आत्तार सरांनी अधीर आवाजात विचारलं आणि मी टीव्ही सुरू केला. ‘पाठीवरचं दप्तराचं ओझं’ हा विषय सुरू होता. मी हो म्हटले आणि डोळे टीव्हीवर ठेवून मी कान आत्तार सरांच्या बोलण्याकडे लावले.

‘मुलांच्या पाठीवरच्या ओझ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि अध्ययनावर होतोय.. नेहमी याची चर्चा होते, मग त्यांना उपाय का सापडत नाहीत?’ आत्तार सरांच्या सुरातील शिक्षक आणि पालक स्पष्ट जाणवत होते.

माझ्याकडून यावर उत्तर मिळावं, अशी त्यांची अपेक्षा नव्हती. उलट, उत्तर त्यांच्याकडेच असणार, याची मला खात्री होती.

पाच-सहा वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली आणि आत्तार सरांच्या ओळखीला निमित्त मिळालं. टेलिफोन, इंटरनेटवरून संवाद सुरू झाला. मुंबईतल्या एका सामाजिक संस्थेनं शिक्षणशास्त्रातील प्रशिक्षणार्थींच्या जागतिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी आत्तार सरांना निमंत्रित केल्याची ती बातमी होती. परिषदेतील आत्तार सरांच्या भाषणाचा विषय होता- ‘माहिती तंत्रज्ञानाचे माध्यमिक स्तरावरील अध्यापनातील महत्त्व’. शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या जगभरातील काही निवडक लोकांच्या परिषदेत आत्तार सरांनी भाषण केलं होतं.

मग मी एका सोशल साइटवरून आत्तार सरांचा नंबर मिळवला आणि आमचा संवाद सुरू झाला. या बातमीचं मला उगीचच कौतुक वाटलं होतं. कोकणातल्या अनेक गावांमध्ये अजूनही शाळेत जाणाऱ्या मुलांना धड कपडे, पुस्तकंही मिळत नाहीत. कितीतरी गावांत शिक्षणासाठी पायपीट करावी लागते, तर कितीतरी घरांत शिकणे परवडत नाही म्हणून शाळा सोडून मुंबई गाठण्याची वेळ मुलांवर येते. अशा कोकणातल्या एका खेडय़ातला एक शिक्षक ग्लोबल वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करतो, हे त्या कौतुकाचं कारण! आत्तार सरांनी गोव्यातल्या दहा दिवसांच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शकाची जबाबदारीही पार पाडली होती. रतन टाटा ट्रस्टनं नाशिकच्या देवळालीत आयोजित केलेल्या सामाजिक संस्थांच्या कार्यशाळेतही मार्गदर्शन केलं होतं. आत्तार सर शिरगावातल्या त्यांच्या शाळेतही माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतची नवनवीन संशोधनं करीत होते आणि शिरगावातली शाळकरी मुलंही ग्लोबल होत होती. इंग्रजी बोलायला घाबरणारी ती मुलं, जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या विषयांवरील तज्ज्ञांशी चॅटिंग करून आपल्या जिज्ञासेची भूक भागवू लागली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास संगणकाचा वापर कसा उपयुक्त ठरतो, यावर मुंबईतल्या एका संस्थेनं शिरगावातील या प्रयोगावर छोटासा माहितीपट तयार केला. ऑस्ट्रियामध्ये सामाजिक संस्थांच्या जागतिक परिषदेत तो दाखविला गेला. देशात कुतूहलाचा विषय ठरलेल्या किऑस्क प्रयोगाचा पहिला पाढा महाराष्ट्रात शिरगावातील या शाळेत लिहिला गेला आणि शिरगावातली मुलं संगणक साक्षरच बनली. बीबीसीनंही त्यावर वृत्तपट तयार करून प्रसारित केला. शिरगावातल्या शाळेतली मुलं संगणकाशी आता इतकी जोडली गेली आहेत की, दप्तरातली वही न काढता ती अभ्यास करतात.

.. आत्तार सरांच्या ताज्या फोनमुळे मला हे सगळं आठवलं. आत्तार सर बोलत होते आणि मी पॅड घेऊन त्यांचे शब्द उतरवून घेऊ  लागलो.

‘इंटरनेट आज घराघरांत पोहोचले आहे. सामान्य माणूसदेखील इंटरनेटचा वापर करू लागलाय. मग शिक्षक आपल्या अध्यापन व्यवसायात इंटरनेटचा वापर का करीत नाहीत?’

आत्तार सरांच्या प्रत्येक प्रश्नावर पुढे तेच उत्तर देणार हे मला माहीत असतं. मी फोनवर नुसतंच ‘हं’ म्हणतो.

‘प्रत्येक शिक्षक आपापल्या विषयाचे गृहपाठ मुलांना देतात. मग मुलांच्या दप्तरात शाळेची पुस्तकं, वह्य़ा आणि गृहपाठाच्या वह्यंचं ओझं वाढतं. गृहपाठाच्या या वह्य दप्तरातून हद्दपार केल्या तरी दप्तराचं ओझं खूप हलकं होईल. मी हा प्रयोग आमच्या शाळेत केलाय आणि ओझं खरंच हलकं झालंय’. आत्तार सरांच्या आवाजात आनंद दिसत होता आणि माझ्या चेहऱ्यावर कुतूहल उमटलं होतं. ते बहुधा त्यांना जाणवलंच असणार.

‘मी आमच्या शाळेत शिकवताना संगणकाचा जास्तीतजास्त वापर करतो. त्यातूनच मी प्रत्येक वर्गानुसार मुलांचा ‘गुगल ग्रुप’ तयार केला. मुलांच्या गणिताच्या गृहपाठाची वही रद्द केली आणि इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेलं ‘जिओजिब्रा’ नावाचं गणित विषयावरचं सॉफ्टवेअर कसं वापरावं, हे मुलांना शिकवलं. मग मुलांना गुगल ग्रुपवर ‘ईमेल’वरून गृहपाठ देऊ  लागलो. आमच्या शाळेत ‘सोल’ प्रकल्प आहे. संगणक प्रयोगशाळाही आम्ही उभारली आहे. शाळा सुरू व्हायच्या आधी किंवा शाळा सुटल्यावर मुलं इथं बसतात आणि जिओजिब्राची मदत घेऊन गृहपाठ सोडवतात. सोडवलेला गृहपाठ ईमेलनं मला पाठवतात. ग्रुप असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने पूर्ण केलेला गृहपाठ इतर मुलांनाही पाहायला मिळतो आणि मुलं आपल्या चुका आपल्याशीच पडताळून पाहू शकतात. कोण चुकलं, कुणाचं उत्तर अगदी बरोबर आहे, आपलं कुठे चुकतंय, हे सगळं मुलांना ग्रुपमुळे पडताळता येतं आणि ती चूक पुन्हा होण्याची शक्यताही कमी होते.’ आत्तार सर आत्मविश्वासानं सांगत होते.

‘हीच पद्धत भाषा विषयांसाठी वापरली तर?’ पुन्हा त्यांचा प्रश्न. मी फक्त त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत होतो.

‘समजा, एका वर्गात गृहपाठासाठी एखादा निबंध दिला, तर वर्गात जेवढी मुलं असतील, त्यांच्या संपूर्ण ग्रुपला प्रत्येकाचा निबंध वाचता येईल, आपल्या चुका सुधारता येतील.. मुख्य म्हणजे, आपल्यापुरता विचार करण्याची सवय शालेय जीवनापासूनच कमी होईल. देवाणघेवाणीचं शैक्षणिक महत्त्व मुलांना जाणवेल. भविष्यात त्याचा फार मोठा उपयोग असतो, नाही?’

या शेवटच्या शब्दातल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माझ्याकडून हवं होतं. मी ‘हो’ म्हणालो आणि आत्तार सरांचा उत्साह वाढला. मला ते जाणवलं.

‘या एकत्र केलेल्या निबंधांची, गृहपाठाची विकी बनवली तर?’ पुन्हा त्यांचा प्रश्न आणि फार ताणून न धरता लगेच उत्तरही!

‘हाही प्रयोग मी केलाय. मी विकी बनवलीय. मुलांनी लिहिलेले निबंध, सुविचार, म्हणी, व्याकरण, विज्ञानविषयक माहिती, सारं काही अपलोड केलंय. मुलांना जेव्हा जेव्हा माहितीची गरज भासते, तेव्हा ती या लिंकवर जातात आणि या माहितीचा उपयोग करून घेतात. या विकीमुळे मुलांच्या दप्तरातील निबंधाच्या वह्य, व्याकरणाची पुस्तकं, आलेख वह्य, चित्रकला वही असं ओझं कमी झालंय. माझ्या शाळेतली मुलं स्काइपचा वापर करून परदेशातील शाळांच्या शिक्षकांशी संवाद साधतात. शिकण्यास अनुकूल वातावरण तयार केलं तर मुलं आवडीनं अभ्यास करतात आणि  शिक्षेची, समज द्यायची वेळ येतच नाही.. माझ्या शाळेत २००९ पासून सोल अर्थात ‘सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निग एन्व्हार्यन्मेंट ’ (sole) हा प्रकल्प सुरू आहे. यामध्ये तेव्हा परदेशातील शिक्षक शिकवत होते. आता यात थोडा बदल करून, जिल्ह्यतीलच पाच शाळांचा एक ग्रुप तयार केला आहे. या शाळांमधील तज्ज्ञ शिक्षक एकमेकांच्या शाळेत स्काइपद्वारे अध्यापन करतील. या माझ्या कल्पनेस मूर्त स्वरूप येत असून विद्यार्थ्यांनाही चांगल्या शिक्षकांकडून शिकण्याचे भाग्य लाभत आहे..’

आत्तार सर प्रचंड उत्साहानं सांगत होते आणि मी फक्त हुंकार देत प्रतिसाद देत होतो.

‘‘टेड डॉट कॉम’ या साइटचा वापर करून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक ई-प्रकल्प आम्ही आमच्या शाळेत राबवतोय. ‘यूटय़ूब’वरील व्हिडीओचा वापर करून मुलांना इतिहास-भूगोलातील काही धडे शिकवता आलेत आणि ‘स्टेलेरियम’ सॉफ्टवेअर वापरून मी मुलांना खगोलाची ओळख करून दिलीय. ग्रहणे, ग्रह, उपग्रह, त्यांच्या कक्षा अशा अनेक गोष्टींची माहिती मुलांनी स्वत:च या सॉफ्टवेअरवरून करून घेतलीय. एका वेबसाइटवरून वैज्ञानिक उपकरणे तयार करण्याची माहिती मुलांनी मिळवली आणि तशी उपकरणे तयार करून एका विज्ञान प्रदर्शनात मांडली. तेव्हा झालेल्या कौतुकानं मुलं हरखून गेली होती.’

‘या वर्षांपासून पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झाली आहे. अगोदर ती चौथी आणि सातवीसाठी होती. यंदा प्रथमच आमच्या शाळेतून पाचवी आणि आठवीच्या या परीक्षेला काही मुले बसतील. या मुलांच्या सराव परीक्षा घेण्यासाठी मी ऑनलाइन परीक्षेची सुविधा वापरणार आहे. यासाठी मी पालकांची बैठक घेऊन त्यांचे मोबाइल फोन वापरणार आहे. मी व्हॉट्सअ‍ॅपवर पाचवी आणि आठवी असे दोन ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर गणित, मराठी व बुद्धिमत्ता या विषयांच्या सराव परीक्षा ऑनलाइन लिंक पाठवतो. पालक आपल्या मुलांकडून आपल्यासमोर मोबाइलवर तो पेपर सोडवून घेतात आणि त्यांना त्वरित निकालही पाहता येतो. चुकाही त्वरित कळतात. मी सुरू केलेल्या या उपक्रमाच्या प्रायोगिक चाचण्या पालकांसोबत घेतल्या आहेत. येत्या १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी दर आठवडय़ाला तीन चाचण्या सुरू होतील. विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचा निकाल मलाही पाहता येईल. ही ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी कोणताही खर्च येत नाही व पेपर तपासण्याचा वेळही वाचतो. ही सुविधा https://testmoz.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या वेबसाइटचा वापर केल्यामुळे पालकांनाही आपल्या मुलाच्या अभ्यासाच्या प्रगतीची कल्पना येते.’

आत्तार सरांनी हे वाक्य उच्चारलं तेव्हा तेही हरखून गेले होते.. दप्तराचं ओझं हलकं झाल्याच्या नुसत्या कल्पनेनं मुलं जशी हरखतात, तसेच!

dinesh.gune@expressindia.com

दिनेश गुणे