प्रदीप आपटे

Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

एकेकाळी रूढ असलेली आणि सम्राट अशोकाच्या आश्रयामुळे भारतभरच नव्हे तर समुद्रापार पोहोचलेली ब्रह्मी लिपी ही पुढे अगम्य झाली.  दोन-तीन शब्दांचा धागा पकडून ती अख्खी उलगडण्याचे काम जेम्स प्रिन्सेपने केले!

शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांमध्ये कॉनन डॉयलने ‘नाचत्या मनुष्याकृतीं’ची एक रहस्यकथा लिहिली आहे. त्यात कुणा अज्ञात गुन्हेगाराकडून येणारे धमकीवजा गूढ संदेश असतात. ते नेहमीच्या परिचित अक्षरांत लिहिलेले नसतात. त्यात अक्षरांऐवजी असतात त्या नाचत्या माणसाच्या वेगवेगळ्या नृत्यमुद्रा! शेरलॉकला अर्थातच या नृत्यमुद्रांचा परिचित अक्षरांत आणि शब्दांत उलगडा करता येतो आणि त्यातल्या गर्भित धमक्या संकेताचा छडा लावता येतो. निव्वळ तर्काच्या आधारे! कसे तर भाषेतल्या शब्दात कोणती अक्षरे आपसूक वारंवार येतात? कोणती अक्षरे गाळली तरी फार बिघडत नाही! वारंवार आलेल्या आकृतीचे अक्षर कोणते असा तर्क केला आणि त्याच जोडीने त्याचा शेजारपाजार असलेल्या आकृतींचे अक्षर काय संभवते याचा कमीत कमी शक्यता अजमावत तो उलगडा करतो.

यासारख्याच नव्हे याहून अधिक जटिल कोड्यांचा उलगडा पुरातत्त्ववेत्त्यांना करावा लागतो. होम्सकडे आलेल्या समस्येत भाषा कुठली हा प्रश्न नाही! (तसे असेल तर प्रश्न आणखी बिकट!) त्या भाषेत कोणती अक्षरे अधिक वारंवार येतात याचा बराचसा ठोकताळा आहे. उदाहरणार्थ इंग्रजीत ‘ई’ हे अक्षर सर्वाधिक येते. (जाता जाता : अर्नेस्ट व्हिन्सेंट राइटने ‘गॅड्सबी’ नावाची ५० हजार शब्दांची कादंबरी लिहिली; त्यात परिचयातले तीन अपवाद वगळता ‘ई’ हे रोमन लिपीतले इंग्रजी अक्षरच येत नाही!) अक्षरांचा वारंवारपणा हा एक गुणधर्म; त्याचे इतर अक्षरांबरोबरचे साहचर्य हा आणखी एक पैलू. त्या-त्या शब्दाची सांकेतिक ठेवण हा पण निराळा पैलू! उदाहरणार्थ इंग्रजीत किंवा लॅटिनात ‘क्यू’ अक्षरानंतर ‘यू’ येणारच, खेरीज queue शब्दाऐवजी नुसते ० लिहिले तरी संदेशाची गरज भागते… इत्यादी.  काही अक्षरे म्हणजे वस्तुरूपांची चिन्हे असतात. कुदळ-फावड्यासारखे अवजार वाटावे असे चिन्ह कोणत्या अक्षरासाठी पर्यायाने शब्दासाठी असेल? तर ही वस्तू भूमी किंवा माती उकरायला वापरतात. संस्कृत प्राकृत भाषेत असे उकरण्याचे क्रियापद ‘खन्’! म्हणजे हे चिन्ह ख अक्षराचे असेल. असा काही तर्क लढवीत कयास बांधावे लागतात.

भारतातील भाषांचे प्राचीन काळातले लेखन हा एक गूढ प्रश्न आहे. जगात आजदेखील अशा अनेक भाषा आहेत ज्या बोलल्या जातात, पण त्यांना लेखनाचा मागमूस नाही. गीर्वाणभाषेची इतकी प्राचीन वाङ्मय परंपरा, पण त्यामधला फार मोठा वारसा निखळ मौखिक परंपरेवर चालत आलेला. ज्या भाषेचे व्याकरण माहेश्वरसूत्राने डमरूच्या सुघड बोलासारखे स्वर-व्यंजन भेदांच्या उच्चारांनी आरंभले जाते त्या भाषेतील अक्षरांना लिखित चिन्हरूप कसे होते? गीतेमध्ये कृष्ण ऋतूंमध्ये मी कुसुमाकर (वसंत) आहे सांगतो तसेच ‘अक्षराणाम् अकारोस्मि’( अक्षरांमध्ये मी ‘अ’कार आहे असे सांगतो.) त्या ‘अ’काराला दृश्य चिन्हरूप होते तर ते कसे होते?

व्यासांनी उद््गारलेला महाभारत नावाचा भाषाप्रपात! तो गणपतीने तेवढ्याच द्रुतगतीने लिहिला, ती लिपी कोणती? मौखिक परंपरा तर होतीच. आजही आहे. पण लिखित परंपरेचे रूप कसे होते? लिहिण्याचे साधन कुठले होते? ते किती विपुल आणि सुकर होते? लिहिण्याचे साधन लिपीच्या ठेवणीत थोडेबहुत कायापालट घडवते. आजच्या प्रचलित लिपी रूपे त्याचीच वाहती बदलती रूपे आहेत की दुसऱ्या कोणत्या लिपी संकराने ती पालटली आहेत?

विशेषत: परकीय प्रवासी आणि अभ्यासकांना तो निरनिराळ्या काळात भेडसावताना दिसतो. मॅगेस्थानिस म्हणतो ‘भारतात लेखनकला आहे’; तर इतर काहींचा अभिप्राय नेमका उलट!

होम्सच्या कथेत येतात त्यापेक्षा फार विविध आकारांनी मढलेले एक प्रकारचे चिन्हसमूह भारतात बऱ्याच ठिकाणी आढळले होते. एका मोठ्या देखण्या स्तंभावर अशा अज्ञात चिन्हांचा पट कोरलेला होता. ही चिन्हमाला आहे तरी काय हे गूढ फार वर्षे सतावत होते.

एका नजर खिळावी अशा भल्या मोठ्या गोल स्तंभावर असा कोरलेला चिन्हांकित भाग होता. शिकारीला गेला असताना फिरोजशाह तुघलकाच्या नजरेला तो स्तंभ पडला. त्या स्तंभाच्या देखण्या धिप्पाडपणाने तो इतका भारावला की तो त्याने होता तेथून उखडून आणला आणि आपला राजधानीतल्या टेकाडावर वसविला. त्यावरची काही बोध न होणारी चिन्हमालिका कसली यावर अनेकांनी विचार केला! ते सोडवल्यास बक्षिसाचे आमिषसुद्धा अनेक राजांनी जाहीर केले. पण कुणाच विद्वानांना ते कोडे उकलेना. हे एक उदाहरण. त्यासारखे भासणारे नमुने इतर अनेक ठिकाणी भरपूर आढळले होते. पण या चिन्हावलीचे रूप काय? उद्देश काय? ही निव्वळ चिन्हगर्दी ताकास तूर लागू देत नव्हती.

रॉयल एशियाटिक सोसायटीचा संस्थापक ‘प्राच्यसुरी’ विल्यम जोन्स आणि संस्कृत, ग्रीक, फारसी भाषांचा जाणकार विद्वान चाल्र्स विल्किन्स यांनीदेखील बरेच यत्न केले. त्यांनी अशा लेखांचे संग्रह केले,परंतु त्यांचा उलगडा मिळत नव्हता.

१८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या टांकसाळेत जेम्स प्रिन्सेप नावाचा तरुण अभियंता दाखल झाला. तर्कनिष्ठ विचार, हरहुन्नरी औत्सुक्य आणि उत्साह असलेला हा टांकसाळीमधला ‘कसपारखी’ लष्करी अधिकारी होता. जोन्स आणि विल्किन्सच्या प्राचीन भारताबद्दलच्या कुतूहलाचा संसर्ग त्यालाही जडला होता. नवी टांकसाळ सुरू करण्याकरिता तो कोलकात्याहून वाराणसीत गंगेच्या प्रवाहाउलट दोन बोटी घेऊन दाखल झाला. अवघ्या वाराणसीच्या देवळाघाटांची त्याने काढलेली चित्रे, त्यामधल्या बदलत्या नव्या-जुन्या शैलींची सरमिसळ झालेली बांधकामे यांचे मोठे बारकाईने चित्रण आणि वर्णन करणारे पुस्तक त्याने लिहिले आहे. वाराणसीतील मैलाप्रवाह निराळा करून काढण्याची बांधकाम तजवीज हीसुद्धा त्याचीच करामत!

त्याच्या हाती लागलेल्या काही नाण्यांमध्ये ग्रीक मजकुराबरोबर दुसऱ्या बाजूला वेगळ्याच चिन्हांनी मढलेला मजकूर होता. त्यातले काही शब्द आणि अक्षरे त्याला त्यामुळे उलगडली. मग त्याने आजवर दुर्बोध ठरलेल्या शिळेवरल्या मजकुरांचा उलगडा करण्याचा पिच्छाच पुरवला. अनेक ठिकाणच्या शिलालेखांच्या नकला, कागदी ठसे कोलकात्याला ‘एशियाटिक सोसासटी’कडे अनेकांनी जमा करून पाठविले होते. त्यातल्या अनेक ‘लेखां’मध्ये त्याला काही अक्षरपुंज वारंवार आढळले. अक्षरांचा छडा लागल्याने ते वाचता आले. एक होता ‘दानम्’, दुसरा होता ‘देवानाम पियदस्सी’. काही अक्षरांची कुणकुण लागत-लावत प्रिन्सेपला अवघा अक्षरसमूह उलगडता आला. त्याने कयासाने ‘वाचलेले’ शब्द अर्थवाही वाक्ये उभी करत होते. त्याला अगोदरप्रमाणे मोजकी अक्षरे नव्हे तर अवघी लिपीच उलगडता आली होती! ही लिपी म्हणजे भारतभर पसरलेल्या अनेक शिलालेखांचे ताम्रपटांचे मजकूर अर्थवाहीपणे उलगडणारी गुरुकिल्ली होती. ही लिपी म्हणजे एके काळी रूढ, पण नंतर लोप पावलेली ब्रह्मी लिपी!

वारंवार उल्लेख येणारा ‘पियदस्सी’ हा श्रीलंकेतला राजा होता असा प्रिन्सेपचा समज होता. त्याने श्रीलंकेतील ब्रिटिश अभ्यासकांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की हे बुद्धधर्मी राजा अशोकाचे नामाभिधान आहे! बुद्ध धर्माचा व्यापक प्रसार दर्शवणारे वायव्येपासून पूर्व- पश्चिम- दक्षिण भारतभर पसरलेले गूढ पण ‘मूक’ शिलालेखांचा ताम्रपटांचा समूह भलताच बोलका झाला.

एकाच मूळ लिपीची थोड्या थोड्या वळणांचा फरक होत पैदासलेली रूपे असतात. हे बदल काळानुसार, प्रदेशांनुसार, लेखनसामग्रीनुसार साचत साचत स्थिरावतात. त्यातले काही अगदी फारकत घेऊन निराळे झाल्यागत भासतात. प्रिन्सेपने हे तौलनिक बदलांचे तक्तेही बनविले. प्रचलित लिपींमधले साधम्र्य/वैधम्र्य पारखायला हा मूळ प्राचीन लिपी स्राोत हाती आला. आजवर हैराण करणारे अनेक अनुत्तरित लिपिसंकेत आणि दुवे आहेत. त्यांचा माग अजूनही जारी आहे. पण निदान अडीच हजार वर्षांपूर्वीची एक अवघी लिपी हस्तगत झाली, ही प्रिन्सेपची थोर देणगी! कोलकात्यात हुगळी नदीवर एक घाट आहे. तेथे श्राद्धकर्म ते बोटींचा थांबा असा वावर असतो! त्या घाटाचे आणि तेथील रिंग रेल्वे स्थानकाचे नाव आहे ‘प्रिन्सेप घाट’!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com