प्रदीप आपटे

अलेक्झांडर कनिंगहॅम ज्यांना ‘फडताळी पुराप्रेमी’ म्हणे; त्यांच्या पुढे तो गेला- पण उत्खननातल्या खुणांचे सांगणे कधी तरी त्याच्याही कानांआड झाले…

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
Devendra fadanvis calrification on Uddhav Thackeray statement
‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”
ग्रामविकासाची कहाणी
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

‘उणे एक या संख्येचे वर्गमूळ’ अशी एक ‘काल्पनिक’ संख्या असते. ती पत्करली की जगातल्या सगळ्या बहुपदींना किमान एक तरी ‘बाकी निरास उत्तर’ असण्याचे भाग्य लाभते! ही संख्या वापरली तर बीजगणित आणि भूमितीची प्रकृतीच पालटते. गाण्यांच्या भाषेत त्यांचा अंदाज आणि बाजच बदलतो. त्या बदलत्या ‘बाजा’चे सार्वत्रिक मूळ द्विपदी नियम सिद्ध करणारा कर्ता गणिती म्हणजे अब्राम दि-मॉव्हर्. हा न्यूटनचा अगदी विश्वासू पठ्ठा! बऱ्याचदा कुणी गणिती समस्या घेऊन आला की न्यूटन ‘दि-मॉव्हर्ला विचारा’ अशी विश्वासाने बोळवण करीत असे. १६९० नंतर तो गणिताऐवजी नाण्यांमधली भेसळ, जॉनचे सृष्टीप्रलय भाकीत, पूर्वजांना माहीत असलेल्या पण लोप पावलेल्या रसायनी आणि इतर गुरुकिल्ल्या शोधण्यात अधिक रमला. पण काल्पनिक संख्येने उपजणारे गणित पुढे वाढविण्यात न्यूटनला कधी फार रस वाटला नाही. भले दि-मॉव्हर् संपर्कात असूनदेखील! कदाचित अशा संख्यांचा आणि भूमितीचा भौतिक अर्थ काय याचे उदाहरण त्याला कल्पनेने गवसत नव्हते.

असे अनेक क्षेत्रांमध्ये घडलेले आढळते. अगोदरच्या काळातील जंगी मातबरांना त्याच क्षेत्रातली नवी घडामोड खुणावत नाही. अलेक्झांडर कनिंगहॅमचे असेच काहीसे झाले. त्याच काळामध्ये काही लक्षणीय घडामोडी पुरातत्त्वशास्त्राच्या विकासामध्ये घडत होत्या.

विल्यम स्मिथ या इंग्रजी अभियंत्याने या विचारांचा पाया शब्दश: जमीन खोदता खोदता खोदला! कालव्याची दिशा, ठेवण, वळण ठरविताना भूपृष्ठाची जडणघडण, त्याच्या थरांची खोली आणि पसरण जोखावी लागते. एकाच परिसरातील डोंगर उंचवट्यात बदलत्या माती-दगड प्रकारांचे पट्टे त्याने निरखले. भूकवचातल्या एकावर दुसऱ्या थरांच्या ठेवणीमध्ये काही सूत्र आणि संगती त्याला जाणवू लागली. जमिनीच्या आत खोदत जावे तसतसे आढळणारे थर हे निरनिराळ्या काळांचे होते. निरनिराळ्या वैशिष्ट्यांचे होते. एकेक थर उद््भवताना त्यांच्या दरम्यान लोटलेला काळ मोठाही होता. थराथरांमध्ये तो वेगवेगळादेखील होता. दगडांचे प्रकार वेगळे. दगडांची कमी-अधिक झीज होते. त्यांची माती होते. माती वारा-पाण्यासोबत वाहते. त्यात भूकंपाने होणाऱ्या उलथापालथीची भर पडते. या सगळ्या घडामोडींचा वेग लक्षात घेऊन हिशेब केला तर तो कालावधी भलताच प्रदीर्घ आहे हे ध्यानात येऊ लागले. त्या गतीची ठेवण लक्षात घेऊन ‘भूशास्त्रीय काळ’ नावाचे काळाचे मापन सुरू करावे लागले.

म्हणजे पृथ्वीचा इतिहास वेगळा. तिच्या काळा-वेळचे, वयाचे मापसुद्धा वेगळे! आणि पृथ्वीवर उपजलेल्या जीवांचा काळ आणि इतिहास वेगळा. भूशास्त्रीय काळ मापनानुसार ज्याला अगदी ‘अलीकडचा काळ’ म्हटले जाते तो आजपासून जवळपास बारा हजार वर्षांपूर्वी, असे मानतात! हा हिशेब एकीकडे; तर दुसरीकडे चर्चप्रणीत जुन्या करारातील कथेनुसार सृष्टीसह मनुष्य अवतरल्याची वर्षे तर जेमतेम साडेसहा हजार! ही तर वेगळीच सामाजिक/ धार्मिक पंचाईत!

विल्यम स्मिथमुळे झालेला साक्षात्कार एवढ्यावर थांबत नाही.

या निरनिराळ्या थरांमध्ये साकळून राहिलेले जीवसृष्टीचे संचितही भिन्न भिन्न होते. ‘प्रत्येक थरांमध्ये दगड बनून तगलेले जीव निराळे होते. जे खालच्या थरांत आढळले त्यातले काही पुढच्या वरच्या थरात गैरहजर असायचे! तर कधी त्यांचे रूप ‘थोडे किंवा बहुत’ बदललेले असायचे. म्हणजे ‘अगोदरचे जीव’ मग ‘नंतरचे जीव’ असा क्रम उलगडू लागला. अशा प्रदीर्घ वाटचालीत कधी काळी जरा परिचित जीव आणि मनुष्यसदृश प्राणी आढळू लागले. सापडणाऱ्या जीवाश्मांची हजेरी अशा लयीत होती की अमुक प्रकारचा जीवाश्म म्हणजे अमुक काळ असा निर्देशांकच वापरात आला!

पण या शोधामुळे काय झाले? तेव्हा समजला जायचा त्या तथाकथित ‘प्राचीन इतिहासा’च्या आधीदेखील खूप मोठा अधिक प्राचीन असा इतिहास कालखंड होता, याचे खडबडून भान आले! काळाचा पल्ला बघितला तर हा इतिहास भलताच अवाढव्य होता. इतका की त्याच्या तुलनेत ज्याला प्राचीन म्हणून समजले जात होते ते भलतेच अलीकडचे, अर्वाचीन भासावे! म्हणून या अधिक पुरातन कालखंडांचे वर्णन करताना ‘इतिहासपूर्व’, ‘प्रागैतिहासिक’ असे बारसे होऊ लागले.

या जाणिवेचे लोण भारतात पसरणे स्वाभाविकच होते. जे लंडनला रॉयल सोसायटीत दुमदुमत असे, त्याचे पडसाद कोलकात्याच्या रॉयल एशियाटिक सोसायटीत यायचेच. स्मिथच्या जरा अगोदरची गोष्ट. जबलपूरजवळ नर्मदा खोऱ्याकाठी कॅप्टन विल्यम हेन्री स्लीमानला जीवाश्म आढळला. डॉक्टर जी. जी. स्पिलस्बरी यांनी तो जेम्स प्रिन्सेपकडे धाडला. त्यावर प्रिन्सेपने ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’च्या जर्नलमध्ये त्याचे टिपण प्रसिद्ध केले. नंतर जबलपूरजवळ उमर नावाची नर्मदेची उपनदी आहे; तिथे १८३३ साली स्पिलस्बरीला हत्तीच्या जबड्याचा जीवाश्म गवसला. त्याने असे जीवाश्म धुंडाळण्याचा उद्योग जारी ठेवला. आणि १८३३ने १८४४ मधील त्याच्या संग्रहाचा अहवाल सोसायटीने प्रकाशित केला. अर्थात त्याला प्रोत्साहन, प्रेरणा देत राहणारा होता जेम्स प्रिन्सेप! त्याच दशकात पेशाने शल्यविशारद असलेल्या डॉ. ह्यू फाल्कनरने शिवालिक दरीमधले जीवाश्म जमवून प्रसिद्ध केले. विल्यम थिओबाल्डने १८६० साली नर्मदेच्या प्राचीन गाळपेर भागाचे स्तरीकरण करून त्याचा अहवाल दिला होता. त्यामध्ये त्याने अनेक जीवाश्म आणि जीवाश्मांनी भरलेल्या स्थळांची नोंद केली होती. इंग्लंडप्रमाणेच भारतातील कोळशाच्या आशेपोटी जिओलॉजिकल सव्र्हेची व्यवस्था १७६७ साला मध्येच झाली होती. नकाशे बनविण्याच्या उद्योगात त्यांचाही सहभाग असे. सी. ए. हैकेट नावाच्या ब्रिटिश नोकराला क्वाटर््झ् दगडाची हातकुºहाड मिळाली. एच. बी. मेडलिकॉटने त्याचा अहवाल दिला. त्याच्या मते ती प्लाइस्टोसीन कालखंडातली (म्हणजे आजघडीच्या पंचवीस लाख ऐंशी हजार ते अकरा हजार सातशे वर्षे अगोदर) होती.

जानेवारी १८६०च्या सुमाराला ईस्ट इंडिया रेल्वेमधल्या एच. पी. ल’मेसुरिए याला खांब रोवायला खड्डा घेताना अत्यंत पुरातनकालीन दगडांचा थर आढळला. शिवाय पल्लावरम येथे भूशास्त्रीय सर्वेक्षणाचे उत्खनन चालू होते तेव्हा, वज्री दगडाच्या गादीवर लाल कुरुंदी दगडगोट्यांचा दोन ते तीन फूट जाडीचा थर होता. तेथे कुरुंदी दगडाच्या खडेगोट्यांमध्ये ब्रूस फूटला अश्मयुगीन हातकुºहाड सापडली होती. पुढे कोसस्थलयार आणि नरणवरम् नदीपात्रात आत्राम्बक्कम येथे अशी अनेक पाषाणयुगी हत्यारे मिळाली. बॅबिंग्टन- हार्कनेस, न्यूबोल्ड, मेडोज टेलर यासारख्यांच्या खटाटोपामुळे अनेक ‘पाषाणयुगी स्मारक वस्तू’ उजेडात आल्या. मोजक्या इमारती, वास्तू यांपलीकडे अधिक प्राचीन समाजाचे व्यापक चित्र लाभण्याच्या या खुणा होत्या!

या सगळ्याची खबरबात कनिंगहॅमला निश्चित होती. पण त्यामुळे कनिंगहॅमची उत्सुकता ढवळली नाही की चाळवली नाही. त्याच्या आवाक्यात असूनही निसटलेली मोठी पर्वणी म्हणजे हरप्पाचे उत्खनन त्याने केले. ते नजरेस पडूनही त्याचे डोळे म्हणावे तसे लकाकले नाहीत. त्यातले गाजलेले चौकोनी नाण्यागत भासणारे कोरीव चित्र त्याला ‘कुणाचातरी शिक्का’ वाटले इतकेच! त्या उत्खननामध्ये अधिक प्राचीन आखीव भरभराटलेली नागरी संस्कृती दडलेली होती. पण या खजिन्याचा त्याला तेव्हा सुगावा आला नाही. थोडक्यात, पुरातत्त्व शास्त्रामध्ये मन्वंतर होणारी पावले वाजू लागली होती. कनिंगहॅम ज्या वळणांत घडला त्या पारंपरिकांच्या कानी ती गरजली नाहीत.

त्याने आरंभलेल्या पुरा- शोधाच्या कर्तबगार आघाडीचे मोल यामुळे उणावत नाही. कनिंगहॅमचे कर्तृत्व, उत्साह, धडाडी अपारच. अशा प्रकारचे शोध घेण्याचा पायंडा अगदी तुरळक होता. वैयक्तिक प्रेरणेने प्रसंगोपात्त खटाटोपाला जबाबदार सरकारी संस्था बनविण्याची झेप त्याच्या पुढाकाराने साकारली. ज्ञानशाखेच्या आरंभकाळात पुढारपण मूळ स्तंभ आणि पायंडे तयार करण्यातच खर्ची पडते. त्यातूनच पुढचे विशाल हमरस्ते साकारतात. नंतर विस्तारलेल्या आणि आजतागायत फुलत राहिलेल्या पुरातत्त्व परंपरेतला कनिंगहॅमची कर्तबगारी हा उंच स्तंभ आहे. यापुढची पुरातन विधाच्या शोधाची घडी कशी असावी? निव्वळ नोंदणी रेखाटन या जोडीने अशा वारशांचे जतन कसे करायचे? त्याची खर्चाची आणि देखरेखीची धुरा कुणी सांभाळायची? प्रदेशवार त्यांची प्रशासकीय विभागणी कशी करावी? अशा अनेक समस्या हाताळण्यासाठी कनिंगहॅमलाच आखणी अहवाल करण्याचे काम दिले गेले. ते संपवून कनिंगहॅम माघारी परतला.

विरोधाभास हा की, त्याच्या अगोदरच्या- पुराण्या वस्तू कौतुकाने सांभाळणाऱ्या (आणि मिरविणाऱ्या)-  पुराप्रेमींना कनिंगहॅम चेष्टेने ‘फडताळी पुराप्रेमी’ म्हणत असे! त्याच्या धडाडीने फडताळ सोडून खोलात शोधायचा पायंडा त्याने रूढ केला. पण पाच हजार वर्षांपलीकडे आणखी काही लक्षसहस्रा इतिहासवर्षांचे संकेत त्याच्यापर्यंत पोहोचले नाहीत. प्राचीन काळातल्या समग्र समाजाचे विस्तृत दर्शन घडायला मात्र तो मुकला! ‘अवतीभवती असुन दिसेना’ अशी ही स्थिती!

 

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com