माझ्या मते भरभरून जगणं म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सर्वच अनुभवांना समर्थपणे सामोरं जाणं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं. आयुष्याच्या काही काळापर्यंत मी नक्कीच अशी जगले नाही. पण ही इच्छा मात्र नक्की होती. काय करायचं, कसं करायचं असा निश्चित मार्ग सापडत नव्हता.

मानसशास्त्र हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. या विषयावर माझ्या अनेकांशी गप्पा आणि चर्चा व्हायच्या. पण तरीही पुस्तकात शिकलेलं मानसशास्त्र आणि रोजचं जगणं याचं नातं जुळण्यात काहीतरी कमी पडतंय असं मला जाणवायचं. रोजच्या जगण्यातलं मानसशास्त्र किंवा रोजच्या जगण्यात मानसशास्त्राचा उपयोग कसा करता येईल आणि त्यातून आपलं जगणं आनंदी, समाधानी आणि समृद्धही कसं करता येईल याचा मी विचार करायला लागले. मग काही वेळा मला आवडलेली पुस्तकं, काही अनुभव मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करायला लागले. त्यावर साधकबाधक चर्चा, वाद व्हायचे. सर्वाना हे आवडायचं पण या वाचण्यात नियमितता नव्हती. या साऱ्यातून माझी मात्र समज वाढत गेली. अनेक वेळा आपली विचार करायची पद्धत चुकीची असते, आपला दृष्टिकोनही पूर्वग्रहदूषित असतो. खुलेपणाने गोष्टी स्वीकारायची आपली तयारी नसते. अशा माझ्यातल्या अनेक त्रुटी मला जाणवत गेल्या आणि त्या सुधारायचा मी प्रयत्न करायला लागले. यातून मलाच परिपक्वता म्हणजे काय समजायला लागलं.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

मी लगेचच कामाला लागले. माझ्या जवळच्या, ओळखीच्या मत्रिणींना एकत्र केले. आमच्या चच्रेतून अशी कल्पना निघाली की आपण आठवडय़ातून एकदा निदान दोन तास भेटून मानसशास्त्रावर आधारित पुस्तकांचं वाचन करायचं, चर्चा करायची. सर्व जणी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या होत्या, उत्साही होत्या आणि वाचनाची आवड असणाऱ्या होत्या. अशा रीतीने आमचा वाचन गट सुरू झाला आणि सुरू राहिलाही. हा वाचनगट सुरू होऊन आता आठ वर्षे झाली. सुरुवातीपासूनच्या पंधरा जणी अजूनही आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या ओळखीपाळखीतून आणखी पंधरा जणींनी जमून दुसरा वाचन गट सुरू केलाय त्यालाही दोन वर्षे होतील. म्हणजे आज माझ्याकडे सोमवार व गुरुवार असे दोन दिवस वाचन गट असतो. आमच्या या वाचन गटात आम्ही कोणतेही ध्येयवाक्य न ठेवता, ‘आपल्या वर्तणुकीत सुधार आणि त्यातून जगण्याचा आनंद अपार’ हे साध्य करायचा आम्ही प्रयत्न करतो.

या गटात प्रामुख्याने मानसशास्त्रावरचीच पुस्तकं वाचली जातात. तसा मानसशास्त्र हा विषय क्लिष्ट आणि अवघड, वाचायला बोजड वाटणारा विषय एकत्र वाचनाने खूपसा सहज होतो. गटातील कोणीही एक मोठय़ाने पुस्तक वाचते. वाचताना कोणत्याही मुद्दय़ावर इतर जणी कधीही आपली प्रतिक्रिया देऊ शकतात. आपले अनुभव शेअर करू शकतात. पटलं नाही, समजलं नाही, तर ते ही सांगू शकतात. काही वेळा पुस्तकात सांगितलेल्या घटनेच्या आधारावर किंवा माहितीवर काही खेळही आम्ही घेतो.

या साऱ्यात चर्चा होते. अनुभवांची देवाणघेवाण होते. काही टोकाच्या प्रतिक्रिया येतात आणि एकाच गोष्टीकडे, प्रश्नाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन लक्षात येतात. अनेक उत्तरे आमच्यासमोर सहज उपलब्ध होतात. काही बाबतीतल्या आपल्या एकांगी विचारसरणीला आपोआपच दिशा सापडते.

अर्थातच हे सर्व एकाच पुस्तकात, लगेचच घडून येत नाही हे ही जाणवते. कारण पटले तरी कळायला आणि वळायला वेळ लागतोच. पण आमच्या वाचन-चर्चा-अनुभव आणि तात्पर्य अशा पायऱ्यांनी ही माहिती आपोआपच कृतीत उतरते. वाचन-चर्चा-सुधार ही प्रक्रिया आम्हाला ग्रुपमुळे व्यवस्थित अनुभवता आली. व्यक्तीचे स्वभाव, नातेसंबंधातील तणाव, पूर्वग्रह, जगण्यातला आनंद हे सारं नीट तपासता आलं. जसजसा आमचा गट प्रगल्भ होत गेला तसतशी पुस्तकातल्या मुद्दय़ांची चर्चा करायची आमची पातळीही उंचावत गेली. चर्चा नुसती तात्त्विक न ठेवता ते रोजच्या आयुष्यात कसे आणता येईल हे आम्ही पाहिले. काही वेळा तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून त्यांचेही विचार ऐकले.

जसे आपण शारीरिक व्यायाम करतो तसेच मनाचे आणि बुद्धीचे विविध व्यायाम आम्ही आमच्या गटात आवर्जून करतो. विविध खेळ, कोडी आणि व्यायाम प्रकारातून कल्पकता आणि सर्जनशक्ती वाढवण्यावर आम्ही भर देतो.

काही पुस्तकं काही वर्षांनंतर पुन्हा नवीन गटात वाचताना अजून वेगळं समजतं हे ही जाणवलं. तसेच गटातल्या मत्रिणींच्या व्यावसायिक वैविध्यामुळेही ज्ञान, विचारसरणीत खूपच सकारात्मक भर पडते. माणसाने मनाने ‘स्वस्थ’ असायला हवं असं मला वाटतं. खरं सांगायचं तर या गटात राहून आम्ही तरुण झालो आहोत. कारण मनाला वय नसतं ही आमची जाणीव गटातूनच, गटचच्रेतूनच समृद्ध झाली आहे.

– रोहिणी फडके, एरंडवणे (पुणे)

 

आयुष्याला द्यावे उत्तर

विं. दा. करंदीकर म्हणतात,

‘असे दांडगी इच्छा ज्याची,

मार्ग तयाला मिळतो सत्तर

नजर रोखुनी नजरेमध्ये,

आयुष्याला द्यावे उत्तर’

वर्षांमागून वर्षे जात होती, ३० जून २००२ला सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. त्यानंतर काय? माझ्या सद्भाग्याने हा प्रश्न केव्हाच निकालात निघाला होता. १ जुलै २००२ मध्ये सावंत महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कामास सुरुवात केली. कालांतराने मी स्वत:ची ‘कौशल्या एज्युकेशन वेल्फेअर’ संस्था काढून शिक्षण क्षेत्रातील एक अभिनव संकल्पना राबवली. निवासस्थानी ‘१७ नंबर स्कूल’ ही पाच तासांची शाळा काढली. किमान ५वी पास व १६ वर्षे पूर्ण झालेल्या गरीब, वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी तसेच असंख्य ९वी नापास विद्यार्थ्यांसाठी अर्थात नापासांची शाळा काढली. पहिल्याच वर्षी १०० टक्के निकाल लावून किमया केली. दरम्यानच्या काळात विनामूल्य योगाचे वर्गही घेतले. परंतु हे सर्व उपक्रम करीत असतानाही ‘गेले काहीतरी करावयाचे राहून’ अशी अवस्था होती. त्यानंतर सतत चार वर्षे नाशिक रोड ते नाशिक येथे एकही दिवस गैरहजर न राहता ज्योतिषशास्त्री व कृष्णमूर्ती पद्धतीची नक्षत्र भास्कर या पदव्या यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. धडपडय़ा स्वभावामुळे ज्योतिष विद्या प्रसार व संशोधन केंद्राचे उद्घाटन करून ज्योतिष वर्ग सुरू केले. गेली १० वर्षे मी ज्योतिष मार्गदर्शन करीत आहे.

सहजीवनाच्या आनंदासाठी पर्यटनासारखा दुसरा उपाय नाही. त्यातून आपणास खूप काही शिकायला मिळते. सेवानिवृत्तीनंतर पत्नीसह मी देशविदेशात पर्यटन केले. आमचा सुखी कुटुंबासारखा ५० लोकांचा मॉर्निग क्लबही आहे. व्यायामव्यतिरिक्त आम्ही सर्वाचे वाढदिवस साजरे करतो. मी त्या क्लबचा संस्थापक संचालक आहे. प्रचंड वाचनाच्या आवडीने व्यक्तिमत्त्वात अनेक बहुमोल गुणांची पेरणी झाली. सानेगुरुजी प्रणित सेवादलाच्या संस्काराने सेवाभाव व प्रेम शिकविले. त्यामुळे विंदा म्हणतात त्याप्रमाणे,

करून जावे असे काही

दुनियेतून या येताना,

गहिवर यावा जगास साऱ्या,

निरोप शेवटचा घेतांना!!

– प्रा. बी. डी. घोलप, नाशिकरोड

 

कर्मयोग प्रत्यक्षात

कर्मयोग म्हणजे नेमकं काय व त्याचा उद्देश काय हे ९९ टक्के हिंदूंना माहिती नसते, मीही त्याला अपवाद नव्हतो. अमेरिकेत बरीच वर्ष खासगी क्षेत्रामध्ये काम करताना मी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या जाळ्यात गुरफटलो होतो. मग मी प्रोफेसर झालो, नंतर एज्युकेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बरीच वर्ष काम केलं आणि या काळात मी कर्मयोग शिकलो. शिकलो म्हणजे अमेरिकन शिक्षणक्रमात कर्मयोग शिकवतात म्हणून शिकावे लागले. माझ्या कामामुळे मी ‘जगायचं कशासाठी’ ही बायबल शिकवण शिकलो, पण ही बायबल शिकवण म्हणजेच गीतेत सांगितलेला कर्मयोग हे मला उमगलं.

अमेरिकेतल्या धार्मिक शिक्षण संस्था त्यांच्या शिक्षणक्रमात बायबल कर्मयोग शिकवतात. कारण ‘ज्या शिक्षण पद्धतीत वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण दिल जाते, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे शिक्षण दिले जात नाही, अशी शिक्षण पद्धत देशाला हानिकारक नागरिक निर्माण करते, देशाला अधोगतीकडे नेणारे नागरिक निर्माण करते.’ अशी तेथे एक म्हण आहे. या म्हणीचे महत्त्व ओळखून, मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग हा उपक्रम भारतात सुरू केला आहे. उपक्रम सुरू करून दोन वर्ष झाली. शाळा, कॉलेजातून शिबीर घेतो. त्यासाठी मी वयाच्या ७७ वर्षी वेबसाइट तयार करायला शिकलो. मी आता एक उत्तम वेबसाइट डिझायनर झालो आहे.

वेबसाइटमुळे माझी झेप उंचावली आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग या उपक्रमाचा सबंध महाराष्ट्रभर प्रसार करायचा आहे, त्याची मी रूपरेषा तयार केली आहे. यामुळे देशाला प्रगतीकडे नेणारे नागरिक तयार होतील असे मला वाटते. भगवान श्रीकृष्णांनी म्हटल्याप्रमाणे, ‘हे कार्य म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक.’

– अनिल देसाई, बोरिवली (मुंबई)