दिल्ली येथील ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’मधील विद्यार्थी कन्हैयाकुमारच्या भाषणानंतर देशात उफाळून आलेले राजकारण हे पोरकटपणाचे लक्षण असल्याचे, आपल्या विशेष शैलीत मांडणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दे रे कान्हा’ या अग्रलेखावरील लेखन स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला आहे मुंबईतील ‘सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालया’चा जितेश दळवी. तर स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कोल्हापूरच्या ‘जेनेसिस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’च्या विनायक घोरपडे या विद्यार्थ्यांने पटकावले आहे. जितेशला सात हजार आणि प्रमाणपत्र, तर विनायकला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षिसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कन्हैयाकुमार प्रकरणानंतर राजकीय पक्षांची दिवाळीखोरी उघड झालीच आहे, मात्र त्यांचा बाल्यावस्थेकडेही प्रवास चालू आहे. यावर विशेषत ‘दे रे कान्हा’ या अग्रलेखात भाष्य करण्यात आले होते. त्यावर जितेश आणि विनायक यांनी ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त होताना आपल्या विचार आणि लेखन शैलीची चुणूक दाखविली होती. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.