‘लोकसत्ता’च्या ‘हुतात्मा’ मारुती कांबळे’ या अग्रलेखावर व्यक्त होताना संवेदनाशून्य जातीयवादी राजकारणावर सडेतोड भूमिका मांडणारी शीव येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयाची शालिनी शिरसाट ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे. तर नागपूरच्या एसबीसीटी महाविद्यालयाचा चेतन आगे याने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. शालिनी शिरसाट हिला सात हजार रुपये तर चेतन आगेला पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. बक्षिसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या पाश्र्वभूूमीवर ‘लोकसत्ता’त २५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘हुतात्मा’ मारुती कांबळे’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे होते. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच आठवडय़ाचे विजेते घोषित करण्यात आले आहेत. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद या विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला. या स्पर्धेत प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.