शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर बोचऱ्या शब्दांत टीका करणाऱ्या ‘नालायकांचे सोबती’ या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखावर व्यक्त होणाऱ्या पुण्यातील ‘रानडे इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम’चा निखिल कुलकर्णी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तर मुंबईतील ‘सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा’ सत्यजित घोडके याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे. राज्याच्या सत्तेत भारतीय जनता पक्षासोबत भागीदारी करतानाच सरकारवरील टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. मात्र, ज्या सरकारला ते आपल्या भाषणांमधून नालायक ठरवितात त्याच सरकारमध्ये आपलेही मावळे आहेत, ते हे विसरतात. ११ एप्रिलला प्रकाशित झालेल्या या अग्रलेखात नेमक्या या विरोधाभासावर बोट ठेवण्यात आले होते. याच अग्रलेखावर निखिल व सत्यजित यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. निखिलला सात हजार आणि प्रमाणपत्र तर सत्यजितला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.