हे काय सुरू आहे या देशात? आसाराम बापू नावाच्या भोंदूविरोधात तक्रार करणारे एकापाठोपाठ एक मारले जातात, आशुतोष महाराज नामक असाच कोणी मेला तरी त्याचे भक्त म्हणतात गुरू सखोल ध्यानात आहेत आणि म्हणून तीन वर्षे झाली तरी त्याचे कलेवर शीतकपाटात सरकारी खर्चाने राखले जाते, उत्तर प्रदेशात कोणी एक योगी म्हणवणारा स्वत:ची खासगी सेनाच उभी करतो आणि मुख्यमंत्रिपद हिसकावून घेतो, सर्व कायदे खुंटीवर टांगून कोणी एक श्री यमुनेच्या पात्रातच मेळावा भरवतो आणि पर्यावरणाचे नुकसान केले म्हणून दंडदेखील भरायला नकार देतो, पंतप्रधानच त्याच्या कार्यक्रमाला जातात, महाराष्ट्रातला एक स्वत:ला शंकराचार्य म्हणवून घेत अमाप माया जमा करतो आणि मंत्रीसंत्री त्याच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत निर्लज्जपणे त्याच्या पायावर डोके ठेवतात. साक्षात गुंड वाटावा अशा भडक, बटबटीत, गुरूबाबाची मदत थेट पंतप्रधान घेतात, त्याच्या कर्तृत्वाचे(?) गोडवे गातात आणि या बाबाचे पितळ उघडे पाडणाऱ्या पत्रकाराची हत्या होते. असे किती दाखले द्यावेत? बाबा रामरहीम असे तद्दन फिल्मी आणि फोकनाड नाव धारण करणाऱ्या बाबाच्या अटकेने हरयाणात जो काही उत्पात सुरू आहे तो पाहिल्यावर या देशात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. देश म्हणून आपण व्यवस्थाशून्यता क्वचित अनुभवतोच. पण आता सर्रास विधिनिषेधशून्यही होऊ लागलो आहोत हे अशा वारंवार घडणाऱ्या घटनांतून दिसून येते, असे मत ‘बाबा प्रजासत्ताक’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. विद्यार्थ्यांना या मत मांडणे सोपे व्हावे या उद्देशाने ‘लोकसत्ता’चे दिनेश गुणे यांना लिहते केले आहे.