जलीकट्टू स्पर्धाबाबत तामिळनाडू सरकारने स्वीकारलेल्या धोरणाचा समाचार घेणाऱ्या ‘कासरा सुटला’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा परळीच्या ‘वैद्यनाथ महाविद्यालया’चा विद्यार्थी विश्वजीत आंधळे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर, या स्पर्धेत पुण्यातील कोंढवा येथील ‘सिंहगड अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग’चा विद्यार्थी सुमित रणदिवे याने दुसरे पारितोषिक पटकावले. अग्रलेखावर मत मांडणाऱ्या विश्वजीत आणि सुमित यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली. विश्वजीत यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर सुमित यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना विष्णू ताकिक, श्रीधर दावर, निखिल पाटील, रोहन पष्टे, शुभम काथले या राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत उत्तम लेखन केले. राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवारपर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.