भारतीय नागरिक पाच वर्षांतून एकदा मते देतात म्हणून फक्त या व्यवस्थेस लोकशाही म्हणायचे. पण हा मताचा अधिकारही अर्धवटच. म्हणजे आपला उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार मतदारांना नाही. ते पक्षच वाटेल त्या मार्गाने ठरवणार आणि आपल्यासमोर जे कोणी येतील त्याला आपण मते देणार. मुदलात आपला उमेदवार कोण असायला हवा हेदेखील मतदारांनाच ठरवता यायला हवे. म्हणजे त्यासाठी आणखी एक मतदान आले. अमेरिकेत होते तसे. याचा अर्थ भाजपतर्फे पंतप्रधानपदी मोदी हवेत की सुषमा स्वराज की अडवाणी यासाठीही निवडणूक घेणे आले. तसेच काँग्रेसतर्फेही राहुल गांधी हवेत की ज्योतिरादित्य शिंदे की आणखी कोणी हेदेखील निवडणुकीतून ठरवावे लागेल. हे झाल्यानंतर या विजयी ठरलेल्या पक्षीय उमेदवारांत पंतप्रधानपदासाठी निवडणूक. असे करता आल्यास ती खरी लोकशाही ठरेल. परंतु आता आहे तो केवळ लोकशाहीचा आभास. सर्वाना या आभासातच रस आहे. या विषयावर सांगोपांग विवेचन ‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत मुंबईतील शासकीय विधि महाविद्यालयाची विद्यार्थी शिवाजी जाधव याने ‘ब्लॉग बेंचर्स’चे पहिले तर सांगोला येथील सांगोला महाविद्यालयाचा विद्यार्थी उमेश औताडे याने दुसरे पारितोषिक पटकावले. अग्रलेखावर मत मांडणाऱ्या शिवाजी आणि उमेश यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. शिवाजीला सात हजार आणि प्रमाणपत्र तर उमेशला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.