अनुश्री शेखर पत्की
आमचं अंदाजे चार महिने गाजत असलेलं ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरलं. आम्ही टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली या शाळेतील १९७९ च्या दहावी बॅचमधील नऊ जण वरोरा येथे आनंदवन पहायला नव्हे, तर अनुभवायला पोहचलो.

आनंदवन वरोरा पासून साधारण २ कि.मी. अंतरावर आहे. आनंदवनच्या मुख्य कमानीतून आत शिरले की डाव्या बाजुला आनंद निकेतन कॉलेज, अॅग्रिकल्चर कॉलेज आणि कुष्ठरोग्यांसाठी हॉस्पिटल आहे. कुष्ठरोग म्हणजे समाजाच्या अमानवी वागणुकीचे प्रतिक. शरीर अक्षरशः कुरतडून काढणारा हा रोग. मृत्युची वाट पहात ऊन-पाऊस झेलत पडून रहाणे. माणूस म्हणून जगणं संपणे. अशा रोग्यांना समाजाने वाळीत टाकले आणि अशांसाठी बाबा आमटे (श्री. मुरलीधरन देवीदास आमटे) यांनी १९४९ रोजी ‘महारोगी सेवा समिती’ स्थापन करून मदतीचा हात पुढे केला. त्यांच्यासाठी अनेक उपक्रम आणि प्रकल्प आनंदवनात राबवले.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

‘गोकुळ’ अनाथ मुलांसाठी तर ‘स्नेहसावली’ वृद्धांसाठीचा आश्रम, संस्कार वर्ग ते ‘संधी निकेतन’ निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र असे अनेक उपक्रम सुरू केले. मुख्य म्हणजे इथल्या रुग्णांच्या हाताला काम दिलं जातं. रहायला निवारा आणि पोटाची भूकदेखील भागवली जाते. गावात आता १७५० च्या आसपास कुष्ठरोगी आहेत. या प्रत्येकाला कुवती प्रमाणे काम मिळते. थोडाफार मेहनतानादेखील मिळतो. त्यांना औषधं व उपचार मोफत असतात. इथे कोणत्याही घरात चूल पेटत नाही. दररोज अडीच क्विंटल तांदूळ, तीन क्विंटल डाळ शिजते व तीन क्विंटल कणकेच्या पोळ्या बनतात. हे सगळं बायोगॅस व सौर उर्जेवर होतं. इंधन म्हणून लाकूडतोड अजिबात केली जात नाही. कुष्ठरोगींबरोबर इथे मूक बधिर, अंध, अपंग देखील आहेत. त्यांची रहाण्याची घरे त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून जवळंच आहेत. कम्युन्स प्रकारातील ही घरे कमी खर्चाची, उष्णतारोधक आणि अर्धगोलाकार आकाराची आहेत. यांना ‘मुक्ती सदन’ असे नाव देण्यात आले आहे. एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे इथल्या रोगमुक्त कुष्ठरोगी लोकांनी किल्लारी येथे जाऊन अशी भुकंपग्रस्तांसाठी घरे बांधली होती.

‘सोमनाथ प्रकल्प’

सरकार कडून मिळालेली शेतजमीन शेतकऱ्यांना कसायला द्यावी हा बाबांचा हेतू. पण जंगलाजवळ असणाऱ्या सोमनाथमधे शेतीसाठी अपुरा पाणीपुरवठा होता. नकाशाचे कागदी घोडे नाचवून अशी कामे होत नाहीत. त्यासाठी डॉ. विकास यांनी सर्व्हे केला. जंगलातील नाल्याचं वहाणारं पाणी बांध घालून प्रकल्पात आणावे लागेल हे लक्षात आले. श्रम संस्कार मधील अनेक तरूण-तरूणींनी उतरत्या पातळीवर एका खाली एक सहा तलाव बांधले. त्यामुळे शेतीला बारमाही पाणी मिळाले. येथे मानवनिर्मित २७ तळी आहेत.

डॉ. विकास आमटे यांनी दूरदृष्टीने प्लास्टिकचा भस्मासूर नाहीसा करावा या हेतूने श्रेडेड प्लास्टिक तसेच वापरण्यास अयोग्य असणारे टायर आणि काँक्रिटचा वापर करून पाणी अडवण्यासाठी नॉन थर्मल, नॉन केमिकल असे सहा बंधारे बांधले. सोमनाथचा बंधारा सगळ्यात मोठा म्हणजे १४० फूट लांब आहे.

‘हेमलकसा प्रकल्प’

कुष्ठरोग्यांच्या अनेक प्रकल्पाबरोबरच डॉ. बाबा आमटे यांनी ‘Earning through learning’ या धर्तीवर ‘श्रमिक-कार्यकर्ता विद्यापीठ’ काढायचे ठरवले. त्यासाठी जमीन आवश्यक होती. सरकार दरबारी अर्ज केल्यावर २००० एकर जंगल जमीन ताडोबा जंगलाला खेटून मिळाली. तिथे जंगली श्वापदांचा मुक्त संचार होता. जंगलसफाई करून बाबा आमटे यांनी १९७३ मधे ‘लोक बिरादरी’ प्रकल्प सुरू करून भामरागड तालुक्यात माडीया व गोंद या आदिवासी जमातीच्या विकासासाठी प्रयत्न केले.

‘लोक बिरादरी’ प्रकल्पाची जबाबदारी बाबा आमटेंनी त्यांचे दुसरे पुत्र डॉ. श्री. प्रकाश आमटे आणि डॉ मंदाताई आमटे यांच्यावर सोपवली. चंद्रपूरपासून अंदाजे २०० कि. मी. वरचे  हेमलकसा वैनगंगा, गोदावरी आणि इंद्रावती नद्यांनी वेढले आहे. शिवाय पर्लकोटा, गौतमी या नद्याही येथून जातात. उन्हाळा अत्यंत कडक, पावसाळ्यात पूर, श्वापदांची भीती असे भयावह वातावरण इथे असते.

१९७६ साली इथे पहिली आदिवासी शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत बांबुकाम, मेटल क्राफ्ट, सुतारकाम, संगणक असे विविध वर्ग चालतात. १९७५ साली इथे बांधलेल्या हॉस्पिटलमधे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड येथून वर्षाला ४५००० रूग्ण येतात. या प्रकल्पाला अद्यापी सरकारी अनुदान मिळालेले नाही ही मोठी खंत आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांचा अॅनिमल पार्क विशेष प्रसिद्ध आहे. आदिवासी प्राण्यांना मारून खातात त्या बदल्यात त्याना जर दुसरे अन्न दिले तर ते प्राणी मारत नाहीत या अनुभवातून एका माकडाच्या पिलापासून सुरूवात करून आज या प्राणी अनाथालयात बिबटे, कोल्हे, तरस, लांडगा, अस्वल, साप, नाग, मुंगूस असे अनेक अनाथ प्राणी आहेत. हा सर्व डोलारा सांभाळण्यात डॉ. प्रकाश आमटे यांना त्यांच्या डॉक्टर मुलांची आणि पत्नी मंदा यांची साथ आहे. नातवंडे देखील न घाबरता हे प्राणी, साप, नाग सहजपणे हाताळतात.

इथे शेतातून तीबार पीक घेतले जाते. एअरकुलर, सतरंजी, अपंगांसाठी तीन चाकरी सायकल, ग्रीटिंग कार्ड बनवणे अशा अनेक व्यवसायांबरोबरच केळीचे सोपट, भाताचे तूस, कणसाच्या सालीपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू, बांबुच्या वस्तु, लाकडी कोरीव काम केलेल्या वस्तू, मागावरील पंचे विणणे, सतरंजी बनवणे असे अनेक छोटो मोठे व्यवस्या सुरू असून रुग्णांच्या हाताला काम दिले आहे.

हे जनकल्याणकारी विश्व उभं करताना बाबांनी रुग्णांच्या पोटापाण्याबरोबरच त्यांच्या भावनांचा देखील विचार केला. त्यांची लग्नंदेखील लावली. तुकडोजी महाराज व गो.नी.दां सारखी मंडळी त्याकाळी मंगलाष्टकं म्हणायला हजर होती.

अंधांसाठींचा ‘स्वरानंदवन’ ऑर्केस्ट्रा शिवाय डॉ. विकास आमटेंच्या पत्नी भारतीताई आमटे स्वतः पहात असलेले ‘नवचैतन्य कृत्रिम अवयव केंद्र’ तसेच ‘अनाम वृक्षांची स्मरणशीला’ हे अन्य उपक्रम लक्षवेधून घेणारे आहेत.

आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ आपापल्या जागी मोठे सामाजिक प्रकल्प आहेत. त्यांचा डोलारा सांभाळणे हे खूप अवघड काम आहे. बाबांनी उचललेले समाजकार्याचे हे शिवधनुष्य त्यांची मुलं आणि पुढची पिढी तितक्याच समर्थपणे समर्थपणे पेलत आहे. या सर्वांना मानाचा मुजरा.