– नामदेव कुंभार

पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवण्याचा पराक्रम करणारा पृथ्वी शॉ गेल्या काही सामन्यात अपयशी ठरतोय. पहिल्या कसोटी सामन्यात राहुल-गिल यांना डावलत विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनानं पृथ्वी शॉवर विश्वास दाखवला. मात्र पृथ्वी शॉ दोन्ही डावात स्वस्तात माघारी परतला. पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात अवघ्या चार धावा त्याला काढता आल्या. दोन्ही वेळा पृथ्वी शॉ एकाच पद्धतीनं बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या शैलीवर सध्या जोरजार चर्चा सुरु आहे आणि त्यात तथ्यही दिसत आहे. शरीरापासून दूर असणारा चेंडू पृथ्वी शॉची दुखरी नस ठरत आहे.

पाँटिग, सुनील गावसकर आणि अॅलन बॉर्डर यांच्या दिग्गजांनीही समालोचन करताना यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. पहिल्या डावांत फलंदाजी करताना पाँटिग पृथ्वीची कमकुवत बाजू सांगत होता. त्यानंतर लगेच तो बादही झाला. चौथ्या आणि पाचव्या स्टंपवरील चेंडू मारताना बॅट आणि पॅड याच्यामध्ये खूप अंतर असते. सुनील गावसकर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वी शॉच्या बॅट आणि पॅडच्या मधून हत्तीही जाईल मग चेंडू काय घेऊन बसलात.

सराव सामन्यातही पृथ्वी शॉ अपयशी झाला होता. सराव सामन्यातील चार डावात त्याला फक्त ६२ धावाच करता आल्या होत्या. मागील दहा डावांत पृथ्वी शॉला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही. पुढील सामन्यात पृथ्वी शॉला डच्चू मिळणार याबाबत दुमत नाही. तेव्हा तरी पृथ्वी शॉनं आपली चूक नेमकी कुठे होती याबाबत चिंतन करायला हवं.

सराव सामन्यात पृथ्वी शऑ अपयशी ठरल्यानंतर फलंदाजीच्या तंत्राबाबत अॅलन बॉर्डर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. फलंदाजी करताना शॉट सिलेक्शन आणि डिफेन्सवर पृथ्वीला काम करण्याची गरज आहे. शिवाय ऑस्ट्रेलियासारख्या वेगवान खेळपट्टीवर सांभाळून खेळण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलेलं. आयपीएल सामन्यावेळीही पाँटिगनं त्याच्या कमकुवत बाजू सांगितल्या असतीलच. पण पृथ्वीला याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात बॅड पॅच येतोच. विराट, सचिन आणि धोनी यांच्यासह अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग आला आहे. पण त्यातून बाहेर कसं निघायचं? यावर त्या दिग्गजांनी काम केलं. २०१४ मधील इंग्लंड दौऱ्यात धावासाठी झगडणाऱ्या कोहलीनं २०१८ मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. हे सगळं एका रात्रीत होतं नाही. त्यासाठी आपल्या कमकुवत बाजूवर काम करावं लागतं. काळानुरुप चुका सुधाराव्या लागतात. अन्यथा भारतीय संघातून तुम्ही कायमचे बाहेर फेकले जाल. आशा आहे… आतातरी पृथ्वी शॉ आपल्या कमकुवत बाजूवर काम करुन टीकाकारांना आणि गोलंदाजांना रोखठोख प्रत्युत्तर देईल. पृथ्वीची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहता आताच्या आणि तेव्हाच्या पृथ्वीत फार अंतर आहे. मात्र पृथ्वीला लवकरात लवकर सुर गवसावा, अशा शुभेच्छा…..