बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांना मत देण्याचे मतदारांना आवाहन केले आणि शुक्रवारी इतिहास घडला. तब्बल 24 वर्षे उत्तर प्रदेशमधले हे दिग्गज नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. परंतु नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी सपा-बसपा एकत्र आले आणि मायावतींनी मैनपुरीतील मतदारांना मुलायम सिंहांना मत देण्याचे आवाहन करण्याची एरवी अशक्यप्राय वाटणारी घटना घडली.
मायावतींचं सभेमध्ये स्वागत करताना मुलायम सिंहांनी आपल्या कार्यकर्त्यांना बसपाच्या अध्यक्षांचा मान राखण्यास सांगितलं. परिस्थिती वाईट असताना मायावतींनी नेहमीच आपल्याला साथ दिली असल्याचे मुलायम म्हणाले. तर मायावतींनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी हे नकली व फर्जी मागासवर्गीय असल्याचा आरोप केला. 1995 मध्ये गेस्ट हाऊस प्रकरण नावाने ओळखली जाणारी घटना घडली आणि तेव्हापासून सपा व बसपा एकमेकांचे कट्टर वैरी झाले. तेव्हापासून आजतागायत एकमेकांचा पाणउतारा करणारे मुलायम व मायावती या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं केवळ एकत्रच नाही आले तर राजकीय व्यासपीठावर देखील शुक्रवारी दिसले. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून रोखणं हा एकच दोघांचा सामायिक अजेंडा आहे.

काय आहे गेस्ट हाऊस प्रकरण?

उत्तर प्रदेशात सपा व बसपाचं युती सरकार होतं व मुलायम मुख्यमंत्री होते. जून 1, 1995 रोजी मुलायमना कळवण्यात आलं की युतीचं अवघं दीड वर्ष झालेलं सरकार बसपा पाडणार आहे. बसपाचे तत्कालिन प्रमुख काशीराम यांची दोन दिवसांपूर्वीच मुलायम यांच्याशी भेट झाली होती, परंतु काशीरामनी अशी काहीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे ही बातमी हा मुलायमना धक्काच होता. सपाच्या अनेक नेत्यांचं म्हणणं होतं की बसपा फोडावी आणि सरकार वाचवावं. दोन जून रोजी सपाचे काही आमदार व नेते लखनौमधल्या गेस्ट हाऊसवर गेले, जिथं मायावती व काशीराम यांचे विश्वासू सहकारी पुढील निर्णय घेणार होते. सपाच्या आमदारांनी व कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसला घेराव घातला आणि मायावतींना एका खोलीत कोंडून ठेवलं. तसेच बसपाच्या अनेक आमदारांना ताब्यात घेऊन ते सपामध्ये दाखल झाल्याचा दावा करण्यात आला.

असं मानण्यात येतं की भाजपाचे आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी सपाच्या नेत्यांपासून मायावतींना वाचवलं. सपाच्या कार्यकर्त्यांकडे रायफली व अन्य शस्त्रास्त्रं होती असं इंडियन एक्स्प्रेसच्या त्यावेळच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. काही आमदारांवर हल्ला करण्यात आला तर काहींना अक्षरश: पळवण्यात आलं. लखनौचे पोलिस सुपरिडेंट ओ. पी. सिंग यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला. सपाच्या सुमारे 12 आमदार व 300 च्यावर कार्यकर्त्यांनी बसपाच्या आमदारांना लाठ्या-काठ्यांनी मारलं.

नरसिंह राव यांच्या केंद्रातल्या सरकारनं 3 जून रोजी मुलायम सिंह यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची संधीदेखील न देता सरकार बरखास्त केलं. त्याच संध्याकाळी भाजपा व जनता दलाच्या पाठिंब्यावर मायावतींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या तीन दिवसात ध्यानीमनी काही नसताना सत्ताबदल झाला आणि मुलायमांचं मुख्यमंत्रीपद जाऊन मायावतींचं सरकार स्थापन झालं.

या गेस्ट हाऊस प्रकरणापासून आजपर्यंत सपा व बसपा आणि विशेषत: मुलायम व मायावती यांच्यामधून विस्तव जात नव्हता. परंतु नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी महागठबंधन झालं. जवळपास पाव शतकानंतर मुलायम यांना पाठिंबा देत मायावतींनी मतदारांना एकाच व्यासपीठावर आवाहन केलं आणि राजकारणात काहीही अशक्य नाही याचा प्रत्यय आला.