– करणकुमार जयवंत पोले

कोणत्याही अटीतटीच्या सामन्याचा सीन असो अथवा कुठला आनंदाचा क्षणं असो किंवा मग प्रेयसीने नाकारण्याचा अवघड प्रसंग! अगदी त्याचा नुसता चालण्याचा हावभाव असो की मग फक्त एखाद्या ठिकाणी भिंतीला पाठ करून थांबण्याचं साध नाटकं असो. त्याच्या चेहऱ्यावर एक नकळतंस स्मित असायचं. येरवी कुठल्याही पडद्यावरचा नट आम्हाला इतका कूल वाटलाच नाही. जेवढा नव्या पिढीचा सुशांत वाटला होता. त्याचं हेच साधेपण ह्या नव्या पिढीला आपलं वाटावं असं पडद्यावरचं वावरणं कुणालाही आपलंस कराव असंच होतं. कित्येक जणांच्या वागण्यात नकळत या गोष्टी सहजच येऊन गेल्या असतील. एखादं पात्र मनाला भिडलं की त्याचा नकळत परिणाम आपल्यावर होतंच असतो. कधीही असं स्टेबल आणि नॉर्मल राहणं आजच्या या काळात विरळच! ते आम्हाला सुशांतसिंह राजपूतच्या भूमिकेतून सापडलं होतं. बाकीच्यांसारखे जास्त आक्टिंगचे फवारे नाही की जग जिंकाव ही मनिषा उरात नाही. कुणाच्या यशावर मनातल्या मनात खदखद नाही की आपण हरलो असताना जास्त वाईट वाटून घेणं नाही. त्याचा अभिनय पाहिल्यानंतर कुणालाही वाटाव हे तंग असं जीवन आपल्या यशाची दिशा न सोडता सहजच दोरी सुटलेल्या मुक्त पतंगासारखं जगून पहायला हवं.

आणि तशाच भूमिकाही त्याला मिळाव्यात अथवा त्याच्या व्यतिरिक्त त्या साकार करणं अवघड व्हाव्या अशा काही भूमिका त्याला मिळतं गेल्या आणि त्या त्यानं त्याच सिद्धतेने साकारल्याही. त्यापेक्षा सर्वांत तंतोतंत साच्यात बसावी अशी महेंद्रसिंग धोनी याची भूमिका! तसं त्याचं रुपडही धोनीला मिळतंजुळतं आणि त्यात भारीस भर म्हणजे त्याच्या भर उन्हाच्या दिवसांत चेहऱ्यावर बर्फाचा वर्षाव व्हाव येवढा कूल चेहरा! त्यामुळंच तर धोनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला. अथवा असंही म्हणता येईल की धोनीची भूमिका साकारणारा कूल सु-शांत लोकांच्या मनात भरला. धोनी म्हणून. म्हणजे लोकांना आजही त्याच नाव माहिती नसेल पण तो धोनीची भूमिका साकारणारा म्हंटल की सगळे ओळखतात. यालाच तर भूमिकेच सोन करणं म्हणतात. यापेक्षा एखाद्या नटाला अजून काय हवयं? आणि त्यानंही प्रेक्षकांना खूप काही दिलंय. म्हणजे त्याचा कधीही भर पैसा संपत्ती यामध्ये गुरफटून जाण्यापेक्षा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोणातून पाहण्याकडे राहिलाय आणि सहज हलकंफुलक जगणं शिकवून जाण्याकडे!

पीके चित्रपटातलं देश-धर्माच्या सीमेपल्ल्याड प्रेम करणार व्यक्तिमत्त्व असो की केदारनाथमध्ये हिमालयाच्या पर्वतावरनं प्रवाशांना हसत सहज वाहून नेणं असो की छिछोरेमधलं आपल्या मुलाला प्रयत्न नेणं असो किंवा छीछोरेमधली मैत्रीपूर्ण पालकाची साकारलेली भूमिका असो. ‘आपल्या जीवनात आपण नेहमीच यशाची योजना तयार करतो पण हरल्याची आखणीही आपण करायला हवी. आपण ही जीवघेणी स्पर्धा हसत आपली करावी आणि यशाच्या परिणामाची चिंता न करता तिथंपर्यंतच्या संघर्षातून जीवनाचा आनंद घेतं राहावा. म्हणजे उद्या अपयश आलं तरीही आपण आपलं सर्वस्व देऊन प्रयत्न केला होता याचा नाज असेल.’ हे सर्व आपल्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला तो सांगत असतो. जीवन हिच एक परीक्षा असते ती चित्रपटाच्या पडद्यावर कशी पास करावी हे सांगण सोप्पं होतं. पण जीवनाच्या खऱ्या संघर्षयात्रींनाच ती खरी महिती असते. पण संघर्ष करणं असं सोडायच नसतं. सुशांत सिंह राजपूत या कूल चेहऱ्यामागं आत्महत्त्या करण्याच कुठलही कारण असो पण ते जीवन नावाच्या सुंदर गोष्टीपुढं नक्कीच तुच्छ असेल! यशाच्या शिखरावर नुकतच पाऊल ठेवून लोकांच्या हृदयात आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पाऊलखूणा उमटवणाऱ्या या कूल माणसाला भावपूर्ण श्रध्दांजली!

आपल्या नवीन पिढीला एवढंच सांगण आहे. जीवन नावाच्या सुंदर गोष्टींपुढे आत्महत्त्या करण्याचं कुठलंही कारण खुप क्षुल्लक असतं. कारण आयुष्यात आजच्या संघर्षात आणि अत्यंत वाईट काळात आपल्याला फक्त थोडा वेळ थांबण्याची गरज आहे. फक्त थोडा वेळ थांबा. सूर्य उगवेला की क्षितीजं नक्कीच खुली होतील!

(polekaran@gmail.com)