समीर जावळे

‘नरगिस आँटीने कहाँ था,  चिंटू तुम अगर ठीकसे चलकर आये.. तो मै तुम्हे चॉकलेट दुंगी!’ प्यार हुआ इकरार हुआ या गाण्यात जी तीन मुलं दिसतात त्यातला सर्वात लहान ऋषी कपूर आहे. आपण त्या गाण्यात कसे आलो हा किस्सा ऋषी कपूर यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. ‘श्री ४२०’ सिनेमातलं हे गाणं हिट झालं. त्यानंतर आला ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमात काम कसं मिळालं याचाही किस्सा ऋषी कपूर यांनी सांगितला होता. “जेवणाच्या टेबलवर असताना राजसहाब (राज कपूर) यांनी आईला सांगितलं होतं की माझ्या लहानपणीचं काम चिंटू करणार आहे. मी त्यावेळी खूप आनंदलो, आरशात दहादा पाहिलं आणि सही देण्याचा सरावही केला. तो काळ सेल्फी काढण्याचा नव्हता.” असे एकाहून एक सरस किस्से मुलाखतीत सांगणारा. हिंदी सिनेसृष्टीचा लव्हर बॉय चिंटू कायमचं अलविदा म्हणून निघून गेलाय. कॅन्सरसोबतची त्याची झुंज अपयशी ठरली आहे.

‘मेरा नाम जोकर’ मधला लहानपणीचा राजू १४-१५ वर्षांचा चिंटू अर्थात ऋषी कपूरने साकारला. मॅडमवर एकतर्फी प्रेम करणारा, त्यांचं आणि स्वतःचं नाव वहीत कोरणारा, मै बच्चा नहीं हूँ असं सांगणारा राजू ऋषी कपूरने जिवंत केला. त्यानंतर आला त्याचा बॉबी हा सिनेमा. या सिनेमात त्याचं रुपडं पालटलं होतं. मेरा नाम जोकरमध्ये जाडा दिसणारा ऋषी कपूर आता स्लीम ट्रिम झाला होता. त्याच्यासोबत हिरोईन होती डिंपल. १८-१९ व्या वर्षात मुलं जसं प्रेम करतात ती प्रेमकथा ही या सिनेमाचा आत्मा होती. या सिनेमाने मेरा नाम जोकरचं सगळं अपयश अक्षरशः धुवून काढलं आणि हिंदी सिनेसृष्टीला रातोरात नवा स्टार मिळाला.. ज्याचं नाव होतं ऋषी कपूर. बॉबीबद्दल त्याच्याच शब्दात सांगायचं तर, “जब तक बॉबी नहीं आयी थी तबतक हिंदी फिल्मोंमे काम करनेवाला हिरो मर्द होता था और हिरोईन औरत. बॉबी के बाद हिंदी फिल्ममें काम करनेवाला हिरो लडका हो गया और हिरोईन लडकी!” या सिनेमातून तयार झालेली त्याची ‘लव्हर बॉय’ ही इमेज पुढे २५ वर्षे टीकली. इतका मोठा काळ रुपेरी पडद्यावर रोमान्स करणारा ऋषी कपूर हा एकमेव नायक ठरला. त्याने त्याच्या सिनेकारकिर्दीत २३ नव्या अभिनेत्रींसोबत काम केलं. नीतू सिंग यांच्यासोबत त्याने १४ चित्रपट केले. त्यानंतर मात्र त्यानं ठरवून ही इमेज ब्रेक करायचं ठरवलं. ज्यात तो यशस्वीही झाला.

मल्टिस्टारर सिनेमांमध्येही तो झळकत राहिला. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट सुपरहिट ठरत असतानाही ऋषी कपूर त्याच्या परिने रुपेरी पडदा व्यापत राहिला. ‘जहरीला इन्सान’, ‘कभी कभी’, ‘लैला मजनू’, ‘कभी कभी’, ‘कर्ज’, ‘नगीना’, ‘सरगम’, ‘खेल खेलमें’, ‘प्रेम रोग’, ‘कुली’, ‘अमर-अकबर-अँथनी’, ‘सागर’, ‘चाँदनी’, ‘बोल राधा बोल’, ‘हनीमून’, ‘श्रीमान आशिक’, ‘दामिनी’, ‘हम दोनो’, ‘दरार’, ‘प्रेमग्रंथ’, ‘कारोबार’, ‘हिना’ अशी किती तरी नावं घेता येतील ज्यातून ऋषी कपूर झळकत राहिला आणि त्याची रोमॅन्टिक हिरोची इमेज जपत राहिला. वैविध्यपूर्ण स्वेटर्सचा ट्रेंडही त्यानेच हिंदी सिनेसृष्टीता आणला आणि रुजवलाही. पद्मिनी कोल्हापुरे, नीतू सिंग यांच्यापासून ते अगदी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, दिव्या भारती, जुही चावला, अश्विनी भावे, वर्षा उसगावकर या आणि अशा अनेक नायिकांसोबत त्याने काम केलं. उमेदीच्या काळात नीतू सिंगसोबत लग्न करुन त्याने संसारही थाटला. या दोघांची लव्हस्टोरीही सर्वार्थाने सुंदर ठरली.

२००० नंतर मात्र ऋषी कपूर चरित्र भूमिकांकडे वळला. ज्या ताकदीने त्याने लव्हरबॉय रंगवला त्याच ताकदीने त्याने चरित्र भूमिका आणि अगदी खलनायकही रंगवला. ‘फना’, ‘औरंगजेब’, ‘पटियाला हाऊस’ ‘102 नॉट आऊट’, ‘कपूर अँड सन्स”ओम शांती ओम’, ‘नमस्ते लंडन’, ‘लक बाय चान्स’, ‘चिंटूजी’, ‘दिल्ली ६’, ‘अग्नीपथ’,’ डी-डे’या आणि अशा सिनेमांमधून त्याने चरित्र भूमिका आणि खलनायक साकारला. त्यालाही लोकांची तेवढीच पसंती लाभली. ‘राजमा चावल’ सिनेमातली त्याची राज माथूर ही भूमिकाही प्रेक्षकांना भावली.

विशेष उल्लेख करावासा वाटतो तो ‘डी डे’ आणि ‘अग्नीपथ’ सिनेमांचा. ‘डी डे’ या सिनेमात त्याने इकबाल सेठ हे पात्र साकारलं. ही भूमिका थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी साधर्म्य असणारी होती. ऋषी कपूर असा रोल करु शकेल का? हा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. मात्र दाऊदशी साधर्म्य साधणारं इकबालचं कॅरेक्टर ऋषी कपूरने त्याच्या अभिनयातून जिवंत केलं. दाऊदसारखा गॉगल, हेअरस्टाईल, जाड मिशा आणि त्याची स्वार्थी वृत्ती ही त्याने अभिनयातून इतकी खास सादर केली की आपण खरंच दाऊदलाच पाहातो आहोत की काय असा आभास निर्माण झाला. ‘अग्नीपथ’ सिनेमातली रौफलाला ही खलनायकाची भूमिकाही त्याने जबरदस्त उभी केली. खरंतर हा सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या मूळ अग्नीपथ या सिनेमाचा रिमेक होता. या सिनेमातही ऋषी कपूरने त्याच्या अभिनयाची आणि खलनायकी ढंगाची वेगळी छाप सोडली.

अनुभव सिन्हाच्या ‘मुल्क’ या सिनेमातही ऋषी कपूरच्या अभिनयाची जादू दिसून आली. दाढी वाढवलेला मुराद अली मोहम्मद हा वकील त्याने या सिनेमात साकारला होता. मुस्लीम असलेल्या वकिलाकडे समाजाचा दृष्टीकोन एका घटनेनंतर कसा बदलतो. या सगळ्या बदलांना हा वकील कसा सामोरा जातो ते त्याने आपल्या हावभावातून आणि अभियनातून जिवंत केलं होतं. “जो कुछ भी बना इस जिंदगीमें इस मुल्कने बनाया, मुसलमान होनेकी फायदेभी हुए इस मुल्कमें और कभी कभी शककी नजरसेभी देखा गया है, पर दफन उसी कब्रस्तानमें होना हैं जो मेरे घरसे २०० मीटर दूर है, मेरे घरमें मेरा स्वागत करनेंका हक आपको दिया किसने? आप मेरी और ओसामा बिन लादेन की दाढीमें फर्क करना नहीं जानते तो भी मुझे हक है मेरी सुन्नत निभाने का! गले लगाकर सवाल पुछियेगा तो कलेजा निकालकर जवाब दूँगा” हा त्याने कोर्टात म्हटलेला डायलॉग ऐकत रहावासा वाटतो इतका जिवंत झाला आहे.

कॅन्सरशी त्याचा लढा सुरु होता. तो उपचारही घेऊन आला होता. मात्र अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. अभिनयासाठी जे कपूर घराणं ७० पेक्षा जास्त वर्षांपासून प्रसिद्ध आहे, त्याच घराण्यातून ऋषी कपूरला अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. तो रिअल लाइफमध्येही त्याच्या परखडपणासाठी प्रसिद्ध होता. त्याचे ट्विट्स त्याचे परखड विचार दाखवणारेच ठरतात.

व. पु. काळे यांच्या एका कथेत ते म्हणतात की ‘माणसाला थांबायचं कुठे ते समजलं पाहिजे सुरुवात थोडी चुकली तरीही चालेल.’ ऋषी कपूर याबाबती परफेक्ट ठरला कारण त्याला रुपेरी पडद्यावरचा रोमान्स कुठे थांबवायचा हे समजलं होतं. त्याची सुरुवात चुकली नव्हतीच कारण ती झाली होती बॉबी सिनेमापासून. ‘लव्हरबॉय’ ते ‘चरित्रनायक’ आणि ‘खलनायक’ असा प्रचंड सिनेप्रवास असलेला अभिनेता ऋषी कपूर हा आता आपल्यात नाही. चिंटू हे त्याचं लाडकं नाव.. म्हणूनच त्याचं ट्विटर हँडलही @chintskap या नावाने होतं. असा हा चिंटू आपल्याला अलविदा म्हणून कायमचा निघून गेला आहे खूप मोठं काम मागे ठेवून..