‘चढ्ढा, तुमने कभी छोटे बच्चोंको बिजलीके खंबेसे पतंग उतारते हुए देखा है? कुछ तारे ऐसी होती है जिसमेंसे उलझी हुई पतंग बच्चेभी उतार लाते हैं. ये और बात है, दामिनीके केस को छेडकर जो तार तुने छु लिया है, बिजली झटका लगेगा की तू झटकना भुल जाएगा” दामिनी सिनेमातला हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी लागलेले पाच राज्यांचे निकाल. ज्याला पप्पू म्हणून नरेंद्र मोदींसहित सगळ्या भाजपाने हिणवलं. मात्र त्याच पप्पूने असा झटका दिला की मोदींची बोलतीच बंद झाली. पराभवानंतर प्रसारमाध्यमांना सामोरे गेलेले मोदी काहीही बोलू शकले नाहीत. आम्हीच जिंकणार या मोदी-शाह यांच्या अहंकारावर राहुल गांधींनी थेट बोळा फिरवला.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम आणि तेलंगण या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे टप्पे ७ डिसेंबरला संपले. जे निकाल समोर आले त्यामध्ये पाचही राज्यात भाजपाची धूळधाण उडाली. लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहण्यात आले. मात्र ही सेमीफायनल भाजपा हरली आहे. काहीही झाले तरीही आम्ही काँग्रेसमुक्त भारत करणारच अशा घोषणा देणाऱ्या नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधींनी आणखी सिक्सर लगावला तो आम्हाला भाजपामुक्त भारत नको आहे असे म्हणून. काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा करून त्याचा गवगवा करणाऱ्या नरेंद्र मोदींना आणि तमाम भाजपा नेत्यांना राहुल गांधींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आता झालेल्या पराभवातून बोध घेत नरेंद्र मोदी आणि भाजपा पुढच्या समीकरणांची मोट बांधणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान पाच राज्यांपैकी राजस्थान जाणार हे बऱ्यापैकी नक्की झाले होते. कारण वसुंधरा राजे आणि अमित शाह यांच्यातून विस्तवही जात नव्हता. स्वतःच्या तोऱ्यात राहिलेल्या वसुंधरा राजेंना अखेर जनतेने आस्मान दाखवले. जनतेचा कौल मान्य आहे असे म्हणत त्यांनी निकाल मान्य केला. मध्यप्रदेशचा पराभव हा खऱ्या अर्थाने भाजपासाठी झटका आहे. जी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती ती गमावण्याचे शल्य भाजपाच्या नशिबी आले आहे. मध्यप्रदेश जिंकण्यासाठी आकाश पाताळ एक केलेल्या भाजपाला लख्ख पराभवाचा सामना करावा लागतो आहे. मध्यप्रदेश हातातून जाणे हे केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपासाठी चांगले लक्षण नाही, असा खोचक टोलाही भाजपाचेच खासदार संजय काकडे यांनी लगावला.

भाजपाला काय नडले?
एकीकडे विकास, विकास, अमक्या हजार कोटींचे पॅकेज, अमक्या महापुरुषाचे स्मारक, तमक्या महापुरुषाचे स्मारक यासंदर्भातल्या घोषणा नडल्या. स्टॅच्यू ऑफ युनिटी आल्यानंतर पुतळे उभारण्याची घोषणा करण्याची स्पर्धाच जणू सुरु झाली. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे आहेतच. सुटाबुटातले सरकार ही विरोधकांनी दिलेली उपाधी मोदी सरकार पुसू शकले नाही. आपणच निवडणून येऊ ही शेखी मिरवत राहिल्याने भाजपाला पराभव सहन करावा लागला. राहुल गांधींना सातत्याने पप्पू म्हणणे, त्यांच्या घराण्याचा उद्धार करत मागील सत्तर वर्षांचा हिशोब मागणे या सगळ्याला जनता वैतागली होती. तेच ते आणि तेच ते मोदींच्या भाषणातून सातत्याने दिसत होते. जी बाब मोदींची ती बाब अमित शाह आणि भाजपाच्या इतर रथी महारथींची.. राहुल गांधींवर टीका करत राहिलं, राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत राहिला, विकासाच्या गप्पा मारत राहिल्या की आपणच जिंकतो अशी समजूत झालेल्या भाजपाचा गोड गैरसमज जनतेने मतपेटीतून दूर केला आहे.

काँग्रेसचे काय लाभले?
आजवर या सरकारवर बोट उचलून टीका करता येईल असे एकही प्रकरण घडले नव्हते. मात्र राफेल करारातले घोळ समोर आले आणि राहुल गांधींना ही संधी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर इनकॅश करता आली. राफेल कराराबाबत राहुल गांधी सातत्याने बोलत राहिले. चौकीदार चोर हैच्या घोषणा देत राहिले. ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाचा (२०१४ च्या तुलनेत) वापरही उत्तम प्रकारे काँग्रेसने केल्याचे दिसून आले. नोटाबंदी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या सगळ्या प्रश्नांमुळे जनता मोदी सरकारलाही वैतागली होती. त्याचा पुरेपूर फायदा राहुल गांधी यांनी केला. राफेल करारात झालेले घोळ आणि नोटाबंदीचा निर्णय या दोन निर्णयांवर टीका करत राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी भाजपाला दिलेला शब्दांचा मार जनतेला राग व्यक्त करण्यासाठी पुढे आणण्यास उपयुक्त ठरला. अच्छे दिन न येता बुरे दिन आलेल्या जनतेने भाजपाला मग मतपेटीतून उत्तर दिले.

काँग्रेसमुक्त भारताचे भाजपाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न या निकालांमुळे भंगले आहे. पाचपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. Every Thing is fare in Love & War असे म्हणतात. आता त्याच उक्तीप्रमाणे कारण काहीही असो म्हणजे राहुल गांधी लोकांना आवडत असो की नसो त्यांनी भाजपाला आणि पर्यायाने नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून काँग्रेसला निवडले आहे. २०१४ च्या निवडणुका मला खूप काही शिकवून गेल्या. मोदींकडून मी खूप काही शिकलो असे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधींना मोदींएवढा करीश्मा साधता आला नसला तरीही लोकांच्या काळजाला हात कसा घालायचा हे समजले आहे. लोकांची नस ओळखण्यात ते यशस्वी झाले आहेत.

राहुल गांधी काय जादू करू शकतात याची ताकद गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये म्हणजेच गेल्या डिसेंबरमध्ये दिसली होती. मोदींचा किल्ला असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने काँटे की टक्कर दिली होती. तरीही मंदिरे फिरून, राफेल कराराचा मुद्दा पुढे करून आणि सातत्याने मोदींवर टीका करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे वास्तवही नाकारता येत नाहीत. लोकांच्या काळजाला हात घालण्याची कला राहुल गांधींना अवगत झालेली दिसते. राज ठाकरे म्हणतात तसे पप्पू आता परमपूज्य झाला आहे. तेव्हा जनतेचा रोष ओळखून राहुल गांधींनी जे विजयाचे टायमिंग साधले ते महत्त्वाचे आहे. पाच राज्यांचा निवडणुकांमध्ये जनतेचा मोदींवरचा आणि पर्यायाने भाजपावरचा राग व्यक्त झाला आहे असे दिसते आहे त्यामुळे हा भाजपाचा आणि नरेंद्र मोदींचा पराभव आहे. या धक्क्यातून सावरत लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी नरेंद्र मोदींना करायची आहे. राहुल गांधींशी आणि पर्यायाने काँग्रेसशी दोन हात करणे २०१९ मध्ये तितके सोपे नसेल जेवढे २०१४ मध्ये होते, हे सत्य या निकालाने आरशाप्रमाणेच दाखवून दिले आहे.

समीर जावळे

sameer.jawale@gmail.com