दिलीप ठाकूर

सिनेमाच्या पडद्यावर कशी कोणत्या स्वरूपाच्या लाटा येतील हे खुद्द फिल्मवालेच सांगू शकत नाही आणि हीच तर या माध्यम व व्यवसायाची गंमत आहे. सध्या याच फिल्मवाल्यांचे इतिहासावरचे प्रेम उतू लागलेय आणि त्याला झक्कास पूर्वप्रसिध्दी आणि रसिकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हेच इतिहासात डोकावणे वाढणार आहे हे निश्चित! सिनेमाच्या जगात एकच ‘चलनी नाणे’ असते, ते म्हणजे यश. ज्या प्रकारचा चित्रपट भारी सुपर हिट होतो, त्याच पठडीतील चित्रपट ‘रिळांमागून रिळे’ येत राहतात. सतराम रोहरा दिग्दर्शित ‘जय संतोषी माँ’ (रिलीज ३० मे १९७५) आणि त्याच्यामागोमाग रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ( रिलीज १५ ऑगस्ट १९७५) घवघवीतपणे यशस्वी ठरताच एकीकडे जणू तेहतीस कोटी देवदेवतांवरच्या पौराणिक चित्रपटाची लाट आली तर दुसरीकडे रक्तपाती हिंसक चित्रपटाचेही दिवस आले. किती विरोधाभास ना? पण यशापुढे सगळे सारखेच.

तात्पर्य, जो हिट है वोही फिट है हा चित्रपट निर्मितीमधील सही फंडा आहे. येथे सर्व काही यशासाठीच तर करायचे असते. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी ‘ आणि मग ‘पद्मावत ‘ हे अतिशय महत्वाकांक्षी आणि समाजाच्या सर्व स्तरांवर चर्चा झालेले ऐतिहासिक चित्रपट सुपर हिट झाले आणि हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर इतिहासाला जणू प्रेरणा मिळाली. तत्पूर्वीही, हिंदीत ऐतिहासिक चित्रपट पडद्यावर येत. सोहराब मोदी यांची तर ती खासियत होती. ते प्रामुख्याने मुगलकालीन इतिहास साकारत. त्यांच्याच ‘पुकार ‘ या चित्रपटातील संवाद ऐकण्यासाठी आंधळे प्रेक्षकही थिएटरमध्ये येत असे किस्से/कथा/दंतकथा प्रसिद्ध आहेत. खरं तर पूर्वी तांत्रिकदृष्ट्या चित्रपट प्रगत नव्हते, सिंगल स्क्रीन थिएटरच्या पडद्यावर इतिहास खुलवणे जिकरीचे होते, त्यात तो कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाचा जमाना, अशाही परिस्थितीत काही ऐतिहासिक चित्रपट उत्तम वठले, पण त्यात उर्दूमिश्रित जोरदार नाट्यपूर्ण संवादाचा मोठा वाटा होता. के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम ‘( १९६०) हा आपल्याकडचा सर्वाधिक सुपर हिट ऐतिहासिक चित्रपट आहे. खरं तर इतिहासाच्या पार्श्वभूमीवर त्यात सलिम आणि अनारकली यांची उत्कट प्रेमकथा आहे. त्याचे मुंबईतील मराठा मंदिर थिएटरवरील डेकोरेशनही ऐतिहासिक फिल देणारे होते. अनारकली, ताजमहाल, रझिया सुल्तान, राज तिलक, बगावत असे अनेक ऐतिहासिक चित्रपट पूर्वी आले. पण ते खरं तर इतिहासवर आधारित मनोरंजक चित्रपट होते. इतिहासातील एकादी व्यक्तिरेखा अथवा काळ घेऊन त्यात गीत संगीत व नृत्य यांची रेलचेल करीत ते चित्रपट पडद्यावर आले. प्रेक्षकांनाही तेच अपेक्षित असते. त्यामुळे हॉलीवूडसारखे ( बेन हर वगैरे) अधिकाधिक इतिहास खुलवणारे चित्रपट हिंदीत पूर्वी शक्यच नव्हते आणि आताही इतिहासाशी काही तडजोड करीतच ऐतिहासिक चित्रपटाची पटकथा असते. ‘बाजीराव मस्तानी ‘मध्ये मस्तानी आणि काशीबाई पिंगा ग पिंगा नाचल्या. म्हणूनच हा चित्रपट धो धो चालला. पूर्वीच्या तुलनेत फरक इतकाच की आज काही सामाजिक संस्था, राजकीय पक्ष हे अशा चित्रपटात ‘चुकीचा इतिहास ‘ ( काही संदर्भ वगैरे) दाखवलेत असे तो चित्रपट न पाहताच जोरदार आंदोलन करतात, प्रचंड आरडाओरडा होतो…. याची सुरुवात आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर ‘ने झाली. पण असा चित्रपट रिलीज झाल्यावर आंदोलनकर्ते चिडीचूप होतात असे दिसतेय तरी. यात इतिहास अभ्यासक/संशोधक महत्वाचे आहेत. त्यांना अशा चित्रपटाच्या सेन्सॉर खेळासाठी आवर्जून आमंत्रित करता येईल अथवा यावे असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तसे कधीही होत नाही आणि एकदा सेन्सॉरने यू प्रमाणपत्र दिले की निर्माता आणि दिग्दर्शकबाह्य सेन्सॉरशीपचे दडपण घेत नाही. आतापर्यंत कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाला ए अर्थात ‘फक्त प्रौढांसाठी ‘ असे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, आपल्याकडचे भव्य आणि बहुचर्चित/बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट हे प्रामुख्याने मनोरंजन करण्यासाठीच असतात असे निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, वितरक तर झालेच पण अगदी फिल्म मिडिया आणि चित्रपटाला गर्दी करणारा प्रेक्षक हे असे कळत नकळतपणे मानतात….

त्यात पुन्हा मोठ्या पडद्याचे आणि मेनी ट्रॅक स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीमचे मल्टीप्लेक्स, तसेच मेकिंगमध्ये युएफओचा/डिजिटलचा उत्तम वापर करता येतोय…. तात्पर्य ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीला पोषक वातावरण आहे. अर्थात पटकथा आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक अशा चित्रपटातील अधिकाधिक अचूक संदर्भ/तपशील/माहिती यावर खुप वाचन/संशोधन करतात, लायब्ररीत जातात, गड किल्ल्याना भेट देतात, कला दिग्दर्शक ऐतिहासिक चित्रपटानुसार कल्पकता आणि करामत करतो. तांत्रिकदृष्ट्या असे चित्रपट एकदम ‘कडक’ असतातच. आशुतोष गोवारीकरने ‘मोहन दो जारो ‘नंतर ‘पानिपत’ घडवलाय. त्याला दृश्य माध्यमाची उत्तम जाण आहे. ओम राऊतने ‘तान्हाजी ‘साठी तब्बल पाच वर्षे मेहनत घेतली असे तोच या चित्रपटाच्या ट्रेलर लाॅन्चच्या वेळी म्हणाला. विशेष म्हणजे हा थ्री डी चित्रपट आहे, त्यात हा चित्रपट वेगळी उंची गाठण्यात यशस्वी ठरेल हे नक्कीच. अर्थात, सिनेमॅटीक लिबर्टी घेऊनच असे चित्रपट पडद्यावर येताहेत, त्यात नृत्य गीत संगीताची जबरा रेलचेल आहे….. हे सगळे योग्य की अयोग्य हा मुद्दा/गुद्दा वेगळा.

मराठीतही ऐतिहासिक चित्रपटाची परंपरा खूपच मोठी आहे. भालजी पेंढारकर यांनी पन्नास व साठच्या दशकात अनेक ऐतिहासिक चित्रपट रसिकांसमोर आणले आणि त्या चित्रपटांचे स्वागतही झाले. नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा, छत्रपती शिवाजी, मराठा तितुका मिळवावा असे त्यांचे अनेक ऐतिहासिक चित्रपट आहेत. चित्रपती व्ही शांताराम यांनी सिंहगड या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पूर्वीपासून मराठीत अधूनमधून ऐतिहासिक चित्रपट रसिकांसमोर येतोय. राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा ‘ या चित्रपटासाठी प्लाझा थिएटवर केलेले अतिशय देखणे असे ऐतिहासिक थिएटर डेकोरेशन पाह्यलाही गर्दी होई. मराठी रसिक एखाद्या चित्रपटावर असे काही भरभरून प्रेम करतो की त्याची मोजदाद कशातच होणार नाही. त्यात पुन्हा शिवकालिन इतिहास हा मराठी माणसाचा अतिशय भावनिक विषय आहे. फक्त चित्रपटाने इतिहासाला योग्य न्याय द्यायला हवा. तेच तर महत्वाचे आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद ‘मध्ये ते दिसले म्हणून चित्रपट यशस्वी ठरला. विशेष म्हणजे या यशाचे श्रेय त्यांनी मिडियालाही दिले. त्याचाच ‘फत्तेशिकस्त ‘ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी ‘ सध्या एकाच वेळेस लोकप्रिय झाले. ‘हिरकणी ‘ने सोनाली कुलकर्णीला ‘अप्सरा गर्ल ‘ इमेजबाहेर काढले. ऐतिहासिक चित्रपट असे बरेच काही घडवतोय. अमेरिकेतील देविका भिसे दिग्दर्शित ‘द वॉरियर क्वीन्स ऑफ झांशी ‘ हा चित्रपट एकाच वेळेस मराठी आणि इंग्रजीत निर्माण केलाय पण अमेरिका आणि भारतातही रिलीज केला. कंगना रानावत अभिनित आणि दिग्दर्शित ‘मणिकर्णिका ‘नेही उत्तम प्रतिसाद मिळवला.

ऐतिहासिक चित्रपटाच्या यशाचे प्रमाण उत्तम असले तरी त्यामागे भरपूर मेहनतही आहे. पण उद्या हेच चित्रपट एखाद्या संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहेत तेव्हा त्यात सिनेमॅटीक लिबर्टी किती घ्यायची याचाही विचार व्हावा. इतिहास आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेरणा घेण्यासाठी आहेत याचे भान कुठे सुटू नये एवढीच अपेक्षा…