नुकतीच नोकऱ्यांमध्ये नाही पण भाजपामध्ये मात्र मेगाभरती झाली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक अजीर्ण झालेल्या नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये उड्या घेतल्या. या सर्व प्रकाराने सध्याच्या विरोधीपक्षाच्या पायाखालची जमीन मात्र सरकली. सरकारवर कितीही आरोप करण्याचा प्रयत्न केला किंवा सर्वांना जिवाच्या आकांतानं ओरडून पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी सध्या जनता त्यांची कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते सोडले सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आक्रमक नेता राहिलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर आघाडीच्या बाहेर आलेल्या भ्रष्टाचारांमुळे केंद्रातून त्यांना सत्ता गमवावी लागली होती. तसंच त्यानंतर लगेचच आलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्येही काँग्रेस राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढले असले तरी भाजपाला मिळालेला प्रतिसाद हा विरोधकांना नक्कीच तोंडात बोटं घालायला लावणारा होता. थोडा आपण भूतकाळातला विचार केला तर २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला केवळ ४६ तर शिवसेनेला केवळ ४४ जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेसने ८२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ६२ जागा पटकावत सत्ता स्थापन केली होती. तर या निवडणुकीत मनसेने १३, अपक्ष २४ आणि इतरांनी मिळून १७ जागांवर विजय मिळवला होता. परंतु २०१४ मध्ये मात्र भाजपाने मुसंडी मारत तब्बल दुपटीपेक्षाही अधिक १२२ तर शिवसेनेनेही ६३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. सर्वच पक्ष वेगवेगळे लढत असले तरी मोदी लाटेचा फायदा भाजपा आणि शिवसेनेला झालेला दिसून आला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये २०१४ प्रमाणे मोदी लाट नसली तरी आघाडीला २०१४ मध्ये मिळालेला आकडाही गाठता आला नाही. त्यापेक्षाही दारूण पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं. लोकसभेची महाराष्ट्रातील ४८ जागांची टक्केवारी पाहिली तर भाजपाला २७.५९ टक्के, शिवसेनेला २३.२९ टक्के, काँग्रेसला १६.२७ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १५.५२ टक्के मतं मिळाली होती. अशातच यावेळी विधानसभेत आघाडी जरी सत्तास्थापनेचा दावा करत असली तरी ही निवडणूक त्यांना इतकीही सोपी नाही. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात केलेला प्रवेश. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि ते दिल्या घरी सुखीही झाले. परंतु काँग्रेसच्या पायाखालची जमीन मात्र सरकरली. त्यांच्यासोबतच कालिदास कोळंबकर, संजीव नाईक, जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड, राणा रणजितसिंग पाटील, निरंजन डावखरे, हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक, चित्रा वाघ आणि धनंजय महाडिकांसारख्या दिग्गजांनी काँग्रेस राष्ट्रवादीला रामराम ठोकत कमळ हाती घेतलं. तर भाऊसाहेब कांबळे, पांडुरंग बरोरा, अब्दुल सत्तार, जयदत्त क्षीरसारगर, अवधूत तटकरे, भास्कर जाधव आणि निर्मला गावीत यानीदेखील काँग्रेस राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत शिवबंधन हाती बांधलं. अनेकांना चौकशीचा धाक दाखवून सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे ओढून घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. विरोधक असा आरोप करत असले तरी खरी बाब अशी की आता काँग्रेस राष्ट्रवादी आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे.

दिग्गजांनी रामराम ठोकल्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढवली ती म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आणि एमआयएमने. निवडणुकांपूर्वी वंचित आणि एमआयएमची युती म्हणजे ‘फेविकॉल का जोड है, टुटेगा नाही’ असं म्हणणाऱ्या जलिल यांची भविष्यवाणी खोटी ठरली आणि आणि जोड काही टिकलाही नाही. एकमेकांसाठी दरवाजे उघडे ठेवणारे दोन्ही पक्षांचे नेते त्याच दरवाज्यातून चालते झाले आणि आपली वेगळी चूल मांडली. दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले. वंचितही वेगळा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचा मतदार हा त्यांच्याकडे वळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. असं झाल्यास ही आघाडीसाठी धोक्याची घंटा धरण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसची राज्यातील जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर असल्यानं वंचित आणि एमआयएमसोबतच काँग्रेसची ढासळलेली राज्यातील प्रतीमा पुन्हा सुधारण्याचं तगडं आव्हान असणारच आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे मनसे आणि वंचित दोन प्रामुख्याने विरोधक तयार झाले असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांचा आधार घेता आला नाही. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जहरी टीका केली. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनीही त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्याचा फायदा झाला नाही. त्यातच वंचित आणि मनसेला सोबत घेण्याची इच्छा असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या विचारधारांमधला फरक मनसेला सोबत घेऊ शकला नाही. तर या दोन्ही मोठ्या पक्षांची स्थिती पाहून वंचितनेच काँग्रेस राष्ट्रवादीला आम्ही अमूक अमूक जागा सोडू अशी ऑफर देऊन टाकली. दोन मोठ्या पक्षांची झालेली ही नाचक्कीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पुढचा विरोधीपक्ष वंचित असू शकतो असं सांगत त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

मनसेही निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून ते १०० जागांवर निवडणूक लढवतील असं सांगण्यात आलं आहे. परंतु सोमवारी होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. यावेळी लाट वगैरे असा प्रकार जरी नसला भाजपाच्या शिवसेनेच्या निघालेल्या यात्रा, तळागाळात भाजपाने सुरू केलेली पक्षबांधणी, अब की बार २२० पार चा नारा आणि आघाडीतील नेतृत्वाची कमतरता यामुळे आघाडीला विरोधीपक्ष म्हणून बसण्यासाठीही आपल्या चपला झिजवाव्या लागणार हे नक्की. त्यातच महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपदासारखं मोठं पद भूषवलेल्या अजित पवारांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यासारखी राजकीय घडामोड हे नक्कीच चांगलं नाही असं म्हणावं लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर त्वरित विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करणं अपेक्षित असतानाही अद्याप आघाडीची तयारीच सुरू असल्यानं त्यांची वाट बिकट ठरणार हे नक्की.

 

जयदीप उदय दाभोळकर

jaydeep.dabholkar@loksatta.com