– दीनानाथ परब

तो पठडीतला क्रिकेटपटू नव्हता. तंत्रशुद्ध फलंदाज तर तो कधीच वाटला नाही. फूटवर्क, ड्राइव्ह, स्ट्रेटबॅट क्रिकेटमधल्या या शब्दांबरोबर त्याचं दूरदूरपर्यंत नातं नव्हतं. क्रिकेटमधल्या पारंपारिक फलंदाजाच्या व्याख्येला तो अपवाद होता. पण तरीही मैदानावर त्याची फलंदाजी पाहणे एक सुखद अनुभव असायचा. ६० चेंडूत विजयासाठी १०० धावा असं कठीण समीकरणं असलं, तरी मैदानावर धोनी आहे म्हटल्यावर देशभरातील कोटयवधी क्रिकेट चाहते निश्चिंत असायचे. धोनी क्रीझवर असेपर्यंत त्यांना विजयाची खात्री असायची. याच महेंद्रसिंह धोनीने काल १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

खरंतर मागच्यावर्षी वर्ल्डकपच्या उत्पांत्यफेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला, त्या दिवसापासूनच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली होती. आपल्याला क्रिकेट कळतं अस वाटणाऱ्या अनेकांना धोनी कधी एकदा निवृत्ती जाहीर करतोय, याची घाई झाली होती तर धोनीने निवृत्ती स्वीकारु नये असं त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कट्टर चाहत्यांना वाटत होतं. पण अखेर धोनीने त्याच्या स्टाइलप्रमाणे कोणलाही कुठलाही थांगपत्ता लागू न देता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. सहावर्षांपूर्वी धोनीने अशीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसाच धक्का त्याने आता दिला.

आमच्या टेनिस क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर धोनी एक बनाठी स्टाइलचा फलंदाज होता. बनाठी म्हणजे बॅटने चेंडूवर जोरदार आघात करण्याची आणि चेंडू लांबपर्यंत मारण्याची क्षमता असलेला फलंदाज. धोनीकडे ताकत होती. त्या ताकतीचा त्याने फलंदाजी करताना अचूकपणे वापर केला. टीम इंडियामध्ये स्थान मिळाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसातली धोनीची फलंदाजी पाहिली की, मला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लुसनरची आठवण यायची. या क्लुसनरने १९९९ विश्वचषक आपल्या फलंदाजीचे गाजवला होता. सामना अटी-तटीच्या अवस्थेत असताना फलंदाजीला येऊन हा क्लुसनर चौकार-षटकारांची बरसात करायचा. धोनीची करीयरच्या सुरुवातीच्या दिवसातली फलंदाजी या क्लुसनरसारखीच आक्रमक होती.

पाकिस्तान विरुद्ध १४८ आणि श्रीलंकेविरुद्ध १८३ धावांची खेळी आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे. त्यावेळचा धोनी आठवला कि, याला कोणी बाद करणारा गोलंदाज आहे का? असा प्रश्न पडायचा. पुढे बदलत्यावेळेनुसार भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे आले. त्यानुसार धोनीने आपल्या फलंदाजीचा गेअरही बदलला. सुरुवातीला वनडाऊन येणारा धोनी नंतर पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ लागला. आपली विकेट न फेकता शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून सामना जिंकून देण्याच्या हातोटीमुळे तो भारताचा सर्वोत्तम फिनिशर बनला.

धोनी उत्तम फलंदाज होता. पण क्रिकेट जगतात तो उत्तम कर्णधार म्हणून जास्त लक्षात राहिल. कारण टी-२०, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी वर्ल्डकप या तिन्ही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून देण्याची कामगिरी धोनीच्या नावावर आहे. कर्णधार म्हणून धोनीचा मेंदू जास्त तल्लख होता. परिस्थितीनुसार, कोणाचा कसा आणि कधी वापर करुन घ्यायचा, याचे उत्तम कौशल्य त्याच्याकडे होते. म्हणून विराट कोहली कर्णधार झाल्यानंतरही मैदानावर त्याला सतत धोनीचा सल्ला लागायचा. भारतासारख्या क्रिकेटवेडया देशामध्ये क्रिकेटपटू कितीही प्रतिभावान असला तरी, त्याच्यावर शेवटी अपेक्षांचे दडपण हे येतेच. त्यात टिकून राहण्यासाठी प्रतिभा आणि कौशल्य तुमच्या ठायी असणे आवश्यक असते. धोनीमध्ये ते होते. म्हणूनच वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत धोनी मैदानावर असेपर्यंत तमाम भारतीयांच्या मनात विजयाची आशा होती. भारताचे क्रिकेट १९८३ चा वर्ल्डकप आणि कपिल देव या दोन नावांशिवाय पूर्ण होत नाही. तसेच यापुढेही एम.एस.धोनी या नावाशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होणार नाही