प्रियंका गांधींना अखेर काँग्रेसने निवडणुकांच्या रणमैदानात उतरवलंच आहे. पाच वर्षांपूर्वी घ्यायचा निर्णय काँग्रेसने अखेर काल घेतला आहे. गांधी घराणे आणि काँग्रेस हे समीकरणच आहे. त्यातल्या प्रियंका गांधी याच फक्त सक्रिय राजकारणात उतरल्या नव्हत्या मात्र त्यांनाही आता काँग्रेसने निवडणुकांच्या महाभारतात उतरवलं आहे. महाभारतात जसे रथी महारथी होते आणि त्यांनी युद्ध केले होते तसंच काहीसं लोकसभा निवडणुकांचं वातावरण असणार आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या रुपाने काँग्रेसने महायोद्धाच रणांगणात उतरवला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दहन करो मोदीकी लंका, बहन प्रियंका बहन प्रियंका!’ असा नवा नाराही काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुका भाजपाला आणि पर्यायाने मोदींनाही जड जाणार आहेत. २०१४ मध्ये जर या प्रियंका गांधी निवडणुकांच्या मैदानात उतरल्या असत्या तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. मात्र पराभवाच्या गाळात रुतल्याशिवाय काँग्रेसला प्रियंकाची आठवण आली नाही हेच खरं. वेळ आल्यानंतर महिलेने ढाल बनून काँग्रेसला तारलं आहे हा काँग्रेसचा इतिहास आहे. मग त्या इंदिरा गांधी असोत किंवा सोनिया गांधी. सोनिया गांधी यांना विदेशी म्हणून हिणवण्यात सध्याचे आघाडीचे जाणते राजे शरद पवारही मागे नव्हते. मात्र प्रेम आणि युद्धात जसं सर्व काही माफ असतं तोच नियम राजकारणालाही लागू आहे. सोनिया गांधींचं विदेशी असणं हळूहळू सगळेच विसरले.

प्रियंका गांधींना विदेशी असण्याचा शाप नाही त्यामुळे ते विसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट प्रियंका गांधींना एक वरदान मिळालं आहे ते आहे थेट आजीसारखं दिसण्याचं, म्हणजेच काय तर प्रियंका गांधींमध्ये थेट इंदिरा गांधींची झलक दिसते.  त्या इंदिरा गांधींसारख्या दिसतात म्हणून त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमते हे याआधी झालेल्या काही सभांमधून दिसलं आहे. जनतेला अशा गोष्टी आवडत असतात, त्यामुळे प्रियंका गांधी यांच्या प्रेमापोटी लोक त्यांना ऐकण्यासाठी जातील. मात्र मुख्य प्रश्न आहे तो प्रियंका गांधी काँग्रेसला तारक ठरणार की मारक? याचं मुख्य कारण आहे की त्या ‘गांधी’ असल्या तरीही त्यांच्यामागे जोडलं गेलंय वद्रा हे नाव. रॉबर्ट वद्रा यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र रॉबर्ट वद्रांचे नाव अनेक जमीन घोटाळ्यांमध्ये अडकले आहे. त्यामुळे भाजपा निवडणुकांच्या तोंडावर वद्रांवर टीका करून प्रियंका गांधींचा करीश्मा झाकोळण्याचा पूर्ण प्रयत्न करणार हे नक्की मानलं जातं आहे. मात्र रॉबर्ट वद्रांचा अपवाद वगळला तर प्रियंका गांधींची इमेज ‘लार्जर दॅन लाइफ’ अशीच आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या भाषणात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभा निवडणूक ही पानिपतच्या लढाईसारखी आहे असं म्हटलं होतं. हे उदाहरण देताना ते पानिपत होणे म्हणजे पराभव होणे हा वाक्प्रचार बहुदा विसरले. की त्यांना लागलेली ही पराभवाची चाहूल आहे? याचं उत्तर येणारा काळ देईल. मात्र सध्या तरी प्रियंका गांधींना निवडणुकांच्या रणधुमाळीत उतरवून काँग्रेसने भाजपाचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. प्रियंका गांधी या राजकीयदृष्ट्या स्वतःला सिद्ध करु शकलेल्या नाहीत. राजीव गांधींची मुलगी आणि इंदिरा गांधींची नात हीच प्रियंका गांधीची सध्याची ओळख आहे. ही ओळख अधोरेखित आणि एनकॅश करत प्रियंका गांधी जी गर्दी जमवतील त्याचं रुपांतर मतांमध्ये झालं तर त्या यशस्वी ठरल्या असं म्हणता येईल.

२०१४ च्या निवडणुका होण्याआधी भाजपाने मोदींना अग्रस्थानी ठेवत लोकसभा निवडणुका लढवल्या. ‘जनता माफ करणार नाही’, ‘अच्छे दिन’, ‘१५ लाख प्रत्येकाच्या खात्यात’, ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी’, ‘२ कोटी रोजगार दरवर्षी’ या आणि अशा अनेक लोकप्रिय घोषणाही दिल्या. मोदी लाट तयार करण्यात भाजपा कमालीचे यशस्वी झाले. त्यांना मिळालेले यश दैदीप्यमान होते असेच म्हणता येईल कारण राजीव गांधींनंतर पहिल्यांदाच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदी पंतप्रधान झाले. लोकसभेच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत मी प्रधानसेवक म्हणून देशाची जबाबदारी स्वीकारतो आहे हे मोदींनी जाहीर केले.

त्यानंतर सुरु झाली राहुल गांधींवर टीका करण्याची स्पर्धा. ‘पप्पू’, ‘अल्प बुद्धीचे’, ‘सुटीवर जाणारे’, ‘वयाने मोठे अनुभवाने लहान’ अशा अनेक विशेषणांनी राहुल गांधींना भाजपाकडून हिणवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या अनेक भाषणांमधून लोकसभेत काय किंवा बाहेर काय राहुल गांधी आणि गांधी घराण्याची खिल्ली उडवली. मात्र भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. याचा पुरेपूर फायदा काँग्रेसने घेतला. हे सरकार कसे शेतकरी विरोधी, युवाविरोधी आहे हे दाखवण्यात राहुल गांधी यशस्वी झाले असेच म्हणता येईल. कारण गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये १५० जागा मिळवू अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपाला ९० जागांच्या पुढे जाता जाता काँग्रेसने फेस आणला होता. एवढंच नाही तर डिसेंबर महिन्यात काँग्रेसने पाचपैकी तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. जोडीला राफेल करार घोटाळा, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी या सगळ्या विषयांची फोडणी होतीच. राहुल गांधी इतके दिवस काय करत होते ते काल लक्षात आले. ते स्वतः तयार होता होत होतेच शिवाय त्यांनी बहिणीसाठी जमीन तयार केली आणि मोक्याच्या क्षणी प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकांमध्ये आणले.

एकीकडे २०१४ च्या निवडणुका मॅनेज होत्या, इव्हीएम घोटाळा कसा करायचा हे लंडन येथील हॅकरने सांगितले. त्यावरून खळबळ उडालेली असतानाच काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचे सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसने बुद्धीबळाच्या पटावरचा वजीर प्रियंका गांधीच्या रुपाने बाहेर काढला आहे असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यात कमालीचा बदल झालेला पहण्यास मिळतो आहे. त्यामुळे लोकसभेची यावेळची लढाईही नमो Vs रागा अशीच आहे. बुद्धीबळाच्या पटावर डाव मांडला गेलाय. प्रियंका गांधी नावाचा वजीर म्हणजेच इंग्रजीत ज्या वजीराला क्वीन म्हटलं जातं ती क्वीन काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बुद्धीबळाच्या पटावर राजाला वाचवण्यासाठी ही क्वीन हवी तशी चाल खेळते. कोणालाही मारक ठरू शकते, राजासाठी तारक असते. आता प्रियंका गांधी यांच्या रुपाने उभा राहिलेला वजीर मोदींना आणि भाजपाला मारक ठरतो का? आणि काँग्रेसला तारक ठरतो का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समीर चंद्रकांत जावळे

sameer.jawale@gmail.com

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special blog on priyanka gandhis entry in politics for loksbha polls
First published on: 24-01-2019 at 14:44 IST