चंदन हायगुंडे

सत्य घटनांवर आधारित “द कश्मीर फाइल्स” चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कश्मिरी पंडितांवर झालेले भयाण जिहादी अत्याचार, केवळ हिंदू असल्याने स्त्रिया आणि बालकांचाही कत्लेआम, “रलीव, गलीव या चलीव (धर्मांतर करा, पळून जावा किंवा मरा) अशा इस्लामी दहशतवादी घोषणा, निष्पाप हिंदूंसह “उपरसे ऑर्डर” मिळेल तसे मुस्लिमांचेही खून केल्याची जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ)च्या अतिरेक्याने न्यूज चॅनेलवर बिनधास्तपणे दिलेली कबुली, सर्वकाही सुन्न करणारे आहे.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

या “जेकेएलएफ”चा सर्वोच नेता, संस्थापक होता मकबूल भट, १९६० आणि ७० च्या दशकांतला कुख्यात कश्मिरी दहशतवादी. १९६६च्या सुमारास मकबूलला त्याच्या दोन साथीदारांसह अटक झाली. भारतीय ‘सी आय डी’ ऑफिसरच्या हत्येचा खटला त्यांच्याविरोधात चालला. ऑगस्ट १९६८ मध्ये न्यायाधीश नीलकंठ गंजू यांनी मकबूलला फाशीची शिक्षा सुनावली. पण डिसेंबर महिन्यात मकबूलने साथीदारांसह श्रीनगर जेलमध्ये ३८ फूट लांब भुयारी मार्ग खणून त्यावाटे पलायन केले आणि पाकव्याप्त काश्मीर गाठले. तो पुन्हा सक्रिय झाला. हत्याकांडा पासून विमान हायजॅक पर्यंत अनेक दशतवादी कृत्यांमध्ये त्याचे नाव समोर आले. अखेर १९७६ला एका बँकेवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात त्याला पुन्हा अटक झाली. खटला चालला आणि त्याला दुसऱ्यांदा फाशीची शिक्षा झाली. त्याने तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांच्याकडे दयेचा अर्ज केला.

मात्र ३ फेब्रुवारी १९८४ रोजी “जेकेएलएफ”शी संबंधित अतिरेक्यांनी इंग्लंडला बर्मिंगहॅम येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी रवींद्र हरेश्वर म्हात्रे यांचे अपहरण केले. (पुण्यातील म्हात्रे पूल याच रवींद्र म्हात्रे यांच्या नावाने आहे) म्हात्रेंना सोडण्यासाठी मकबूल भटच्या सुटकेची मागणी करण्यात आली. परंतु ६ फेब्रुवारी १९८४ रोजी अतिरेक्यांनी म्हात्रेंची हत्या केली. मग भारतात मकबूलच्या दयेचा अर्ज नाकारून त्यास ११ फेब्रुवारी १९८४ रोजी दिल्लीतील तिहार जेलमध्ये फासावर लटकवले गेले.

मकबूल मेला पण काश्मिरी फुटीरतावाद्यांचा हिरो झाला. पाकिस्तानने त्याला शहीद म्हटले. त्याच्या फाशीचा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी श्रीनगरमध्ये ४ नोव्हेंबर १९८९ रोजी न्यायाधीश गंजूना भर दिवसा गोळ्या घालून मारले. तर दुसरीकडे काश्मिरातच नाही तर उर्वरित भारतातही मकबूलचे समर्थक विविध माध्यमातून आपला फुटीरतावादी अजेंडा रेटू लागले. याचे उदाहरण म्हणजे राजधानी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे ९ फेब्रुवारी २०१६ रोजी डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनिअन (डीएसयू) या विद्यार्थी गटाने आयोजित केलेला “सांस्कृतिक कार्यक्रम”.

Justice ganjoo
न्यायमूर्ती गंजू (फोटो सौजन्य – विकिपिडिया)

नावात “डेमोक्रॅटिक (लोकशाहीवादी)” शब्द असलेल्या “डीएसयू” चे वास्तव समजून घेऊ. लोकसभेत १८ फेब्रुवारी २०१४ रोजी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या शहरी भागातील “फ्रंट” म्हणून काम करणाऱ्या काही गटांची नावे सादर करण्यात आली. यामध्ये “डीएसयू“चे ही नाव आहे.

अशा या संशयित माओवादी फ्रंट संघटनेने “जेएनयू”मध्ये “Against the judicial killing of Afzal Guru and Maqbool Bhat” म्हणजे – अफझल गुरु (भारतीय संसदेवर हल्ला प्रकरणातील फाशी झालेला अतिरेकी) आणि मकबूल भेट या दोन दहशतवाद्यांच्या मृत्युदंडास “न्यायव्यवस्थे करवी केलेला खून” म्हणून – त्या विरोधात जाहीर “सांस्कृतिक कार्यक्रम” घेतला. त्याचे पोस्टर जेएनयू कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी लावले. या पोस्टरवर “अफझल तुम्हारे अरमानो को हम मंझिल तक पहुंचाऐंगे” ही ओळ ठळकपणे छापण्यात आली. जणू दहशतवादी अफझल गुरुचे अपूर्ण मनसुबे पूर्ण करण्याची इच्छाच आयोजकांनी जाहीर केली. प्रत्यक्ष “सांस्कृतिक” कार्यक्रमात “भारत तेरे टुकड़े होंगे”, “तुम कितने अफझल मारोगे, हर घर से अफझल निकलेगा…. तुम कितने मकबूल मारोगे, हर घर से मकबूल निकलेगा” व काश्मिरी फुटीरतावाद्यांच्या “आझादी”च्या घोषणा दिल्या गेल्या.

कार्यक्रमाच्या आयोजनात जे विद्यार्थी सक्रिय होते त्यापैकी एक म्हणजे उमर खालिद. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. उमर सह काहींना अटकही झाली. मकबूल आणि अफझल गुरु सारख्या दहशतवाद्यांना फाशी होते तेंव्हा त्याला न्याय होणे म्हणतात. मात्र “जेएनयू”मध्ये उमर खालिद व सहकार्यांनी या दहशतवाद्यांच्या मृत्युसाठी न्यायव्यवस्थेलाच खुनी ठरवले. तरीही उमर आणि अन्य अटक आरोपींच्या समर्थनार्थ एक मोठी यंत्रणा देशभरात सज्ज झाली. पुढे उमर जामिनावर बाहेर आला आणि फुटीरतावाद्यांच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झाला.

Umar Khalid
उमर खालिद (संग्रहीत छायाचित्र)

पुण्यात ३१ डिसेंबर, २०१७ रोजी शनिवार वाड्यावर आयोजित एल्गार परिषदेत त्याला भाषण देण्यासाठी निमंत्रित केले गेले. १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईस २००वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘एल्गार परिषद’ आयोजित करण्यात आली होती. आयोजनात कबीर कला मंच ने पुढाकार घेतला होता. लोकसभेत सादर केलेल्या माओवादी फ्रंट संघटनांच्या यादीत कबीर कला मंचचेही नाव आहे. या मंचाचे पुण्यातील काही कलाकार गडचिरोलीत नक्षल दलम सोबत शस्त्र प्रशिक्षण घेऊन आले आहेत, तर किमान दोन तरुण आजही हाती बंदुका घेऊन जंगलात भूमिगत होऊन काम करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अशा संशयित माओवादी फ्रंटने “संविधान वाचवा” म्हणत एल्गार परिषद आयोजित केली आणि त्यात कश्मिरी दहशतवादी मकबूल भट, अफझल गुरुचे उदात्तीकरण करणाऱ्या उमर खालिदला बोलावले गेले. ही यंत्रणा आपण समजून घेतली पाहिजे. यापूर्वी गडचिरोलीतील नक्षलवादाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी हेम मिश्रा सोबत उमरचे निकट संबंध उघड झाले होते. पुढे उमरला २०२०च्या दिल्ली धार्मिक दंगलीच्या गुन्ह्यात अटक झाली व तो सध्या तुरुंगात आहे.

एल्गार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचार झाला. एल्गार परिषदेच्या निमित्ताने झालेल्या प्रचार सभा, भाषणे, कोरेगाव भीमा लढाईच्या इतिहासाचे विकृतीकरण, समाजात प्रक्षोभ आणि तेढ निर्माण करणारी मांडणी, सहभागी संघटनांच्या संशयास्पद कारवाया इत्यादींचा कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या अनुषंगाने तपास झाला. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोरही याबाबत मुद्दे समोर येत आहेत. पुणे शहर पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रेणेने एल्गार परिषद प्रकरणात दाखल गुन्ह्यात प्रतिबंधित माओवादी चळवळीचे शहरी भागातील जाळे उकरून काढले. याच तपासात गौतम नवलाखा नामक “हाय प्रोफाइल” आरोपीस अटक झाली. नवलाखा हा माओवादी आणि काश्मिरी दहशतवादी यांच्यातील दुवा असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.

gautam navlakha
गौतम नवलखा (फोटो – पीटीआय)

२०११ दरम्यान अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (एफबीआय) ने सईद गुलाम नबी फई या काश्मिरी व्यक्तीस अटक केली होती. फई पाकिस्तानच्या “आय एस आय” कडून फंडिंग घेऊन अमेरिकेत काम करायचा. “एफबीआय”च्या तपासात नवलाखाचेही नाव समोर आले. फईच्या “कश्मीर अमेरिकन कॉऊंसील” च्या कार्यक्रमात नवलाखा सहभाग घेत होता. नवलाखाचे फईसोबत संबंध आणि त्यामाध्यमातून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “आय.एस.आय.”च्या अधिकाऱ्यासोबत भेट झाल्याचे “एफबीआय”च्या कागदपत्रात नमूद आहे.

अशाप्रकारे विविध दहशतवादी, फुटीरतावादी चळवळींना जोडणारी यंत्रणा देश-विदेशात सक्रिय आहे. संविधान, लोकशाही, मानवाधिकार अशा शब्दांच्या आडून या यंत्रणेतील फुटीरतावाद्यांचे हस्तक समाजाची दिशाभूल करत आहेत. ही चक्रावून सोडणारी यंत्रणा आणि त्यामागील देशविघातक षड्यंत्र मोडीत काढण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.