भाजप आणि शिवसेनेने जनतेला मूर्ख बनवले असून भाजपने त्यांना मत देणा-या मतदारांचा घात केला आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सत्तेमुळे हे दोन्ही पक्ष कधीच वेगळे होणार नाही असेही ते म्हणालेत.

शिवसेनेशी जुळवून घ्या, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सल्ला तसेच महापौरपद भाजपकडे खेचून आणण्यासाठी जुळवाजुळव करण्यात आलेले अपयश आणि राज्यातील पक्षनेत्यांनी स्वीकारलेली मवाळ भूमिका या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपने माघार घेतल्याने शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरुन आता विरोधकही आक्रमक झाले आहेत.

शिवसेना – भाजपच्या या छुप्या युतीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना आणि भाजप हे फायद्यासाठी पुन्हा एकत्र आले. पण एकत्र येऊन त्यांनी जनतेला मूर्ख बनवले आहे. भाजपला मत देणा-या मतदारांचा पक्षनेत्यांनी घात केला आहे अशी टीका चव्हाण यांनी केली. भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन मतदारांचा कौल नाकारल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र येतील हे आम्हाला आधीपासूनच वाटत होते. आम्ही वेळोवेळी हेच सांगितले होते. आज आमच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले असेही चव्हाण यांनी नमूद केले. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मत मागणारा भाजप शिवसेनेसोबत जाणार नाही असे जनतेला वाटत होते. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक केली. पण निकालानंतर भाजपने यू टर्न घेत शिवसेनेलाच पाठिंबा दिला असे चव्हाण यांनी सांगितले. भाजप आणि शिवसेनेने सत्ता वाचवण्यासाठीच ही धडपड केली असा आरोपच त्यांनी केला आहे.

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा धोरणी निर्णय जाहीर करतानाच पारदर्शक कारभाराचे पहारेकरी आणि मुंबईसाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमणे यातून शिवसेनेला मनाप्रमाणे कारभार करता येणार नाही, असा सूचक इशाराही दिला होता. शिवसेनेबरोबर दोन हात करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची योजना होती. पण त्यातून सरकारचे स्थैर्य धोक्यात आले असते. भाजपचा महापौर निवडून आला असता तर शिवसेना सत्तेबाहेर पडण्याची चिन्हे होती. त्यातून सरकार अल्पमतात आले असते. हे सारे टाळण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य नेत्यांशी सल्लामसलत करून कठोर भूमिका घेण्याचे टाळले अशी चर्चा रंगली आहे.