पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेला पाटणा महापालिकेइतके गुण मिळाले होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबईला पाटणा शहराच्या बरोबरीला आणून दाखवले आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राज्य सरकारमुळे मुंबई किमान तिसऱ्या स्थानावर आहे. अन्यथा मुंबई महापालिका केंद्राच्या सर्वेक्षणात तळाला असती,' अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. 'केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचा शिवसेनेने विपर्यास केला. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती. अर्धवट वाचले की तोंडघशी पडायला होते. राज्य सरकारमुळेच मुंबई आर्थिक सर्वेक्षण अहवालात तिसरी आहे. पारदर्शक कारभारात हैदराबाद प्रथम आहे. शिवसेनेने मुंबई शहर पाटणा शहराच्या बरोबरीला आणून ठेवले आहे,' अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 'विकास आणि पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा आहे. पारदर्शक कारभाराचा मुद्दा आम्ही मांडतच राहणार आणि तुमचा भ्रष्टाचार समोर आणत राहणार. पारदर्शक कारभारात मुंबई महापालिकेला केंद्राने भोपाळा दिला आहे. गेल्या ७ वर्षांमध्ये मुंबईमध्ये इंटरनल ऑडिट झालेले नाही. जनतेचा पैसा हा जनतेसाठीच खर्च व्हायला हवा. तो पैसा कंत्राटदारांसाठी खर्च व्हायला नको,' असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली. 'मी कलगीतुऱ्यासाठी भाषण करत नाही. मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास शहरातील वाहतूक सुसह्य होईल. चर्चगेट-विरार उन्नत मार्ग तयार करण्यात येईल. एकच तिकीट रेल्वे, मोनो, मेट्रो आणि जल वाहतुकीसाठी वापरता येईल. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास मुंबई शहर देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर होईल,' असेही फडणवीस प्रचारसभेतील भाषणात म्हणाले.