काँग्रेसमध्ये एकमुखी सूर; परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत युतीवरून काथ्याकूट सुरू असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आघाडी होणार नाही हे गृहित धरून राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करून टाकली आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांचा जाहीरपणे आघाडी नको, असा एकसूर असला तरी परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आघाडी करण्याबाबत काँग्रेसमध्ये नेहमीच वेगवेगळे सूर असतात. नंतर या सूरांचे प्रतिध्वनी प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चेतून उमटतात. हे लक्षात घेऊन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शहरातील सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. गुरुदास कामत, एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, सुरेश शेट्टी, चरणजितसिंह सप्रा आदी साऱ्याच नेत्यांनी या बैठकीत आघाडी नको, असाच सूर लावला. आघाडी केल्यास राष्ट्रवादीला ६० ते ७० जागा सोडाव्या लागतील. तेवढय़ा प्रभागांमधील कार्यकर्ते विरोधात जातात किंवा बंडखोरी होते. हे टाळण्यासाठी सर्व २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात, असा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला. मुंबई काँग्रेसने तसा ठराव दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस समितीला पाठविला. मुंबई काँग्रेसच्या निर्णयानुसार आघाडी केली जाणार नाही, असे निरुपम यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून वेगळे लढण्याचे संकेत दिल्याचे निरुपम यांचे म्हणणे आहे. कुरघोडीचे राजकारण मुंबई काँग्रेस गटबाजीने पोखरली आहे. गुरुदास कामत गट निरुपम यांच्या विरोधात आहे. तिकीट वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा ठरेल. कारण प्रत्येक गटाला सामावून घेताना निरुपम यांची दमछाक होऊ शकते. आघाडी होऊ नये यावर एकमत झाले असले तरी निरुपम यांना अपशकून कसे करता येईल, याचेही डाव टाकले जात आहेत. गटबाजी, परस्परांवर कुरघोडी करणे ही मुंबई काँग्रेसमधील प्रथाच आहे. कामत अध्यक्ष असताना देवरा गट सक्रिय असायचा. कृपाशंकर सिंग गेल्या निवडणुकीत अध्यक्ष असतानाही मोठय़ा प्रमाणावर गटबाजी झाली होती.