मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहरात आणखी ५०० नवीन वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्यामुळे सध्या सत्तधारी शिवसेना आणि भाजपकडून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नव्या घोषणा आणि विकासकामांची उद्घाटने सुरू करण्याचा धडाका सुरू आहे. याच मालिकेतील आणखी एक घोषणा आज मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. या घोषणेनुसार मुंबईत आणखी ५०० नव्या ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू करण्यात येतील. येत्या १ मे २०१७ पर्यंत मुंबईतील वायफाय हॉटस्पॉटची संख्या १२०० पर्यंत नेण्याचा मानसही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. या माध्यमातून तरूणांना खूष करून शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा हेतू आहे. त्यामुळेच भाजपने वायफाय जोडणी करण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण, मुंबईला वायफाय जोडणी देण्याचे आश्वासन सेनेने २०१२च्या महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिले होते. परंतु, राज्य सरकारने पुढाकार घेऊन सेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.

मुंबईला स्मार्ट सिटी करण्याच्या राज्य सरकारच्या उपाययोजनांतून शहरात सुमारे ५०० ‘हॉटस्पॉट’ जोडण्यांचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले होते. या सुविधेद्वारे मुंबईकरांना महिन्याला मोफत तीन जीबी डेटापर्यंत वायफाय वापरता येणार आहे. मात्र, दिवसाला केवळ अर्धा तास १०० एमबीपर्यंतच्या डेटावापराची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी अंदाजे १९४ कोटी रुपये खर्च आला आहे. चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, रेल्वे स्थानक परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी जास्तीत जास्त हॉटस्पॉट ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ लावण्यात आले आहेत. या ठिकाणी एका ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ला एकाच वेळी २० ते २५ जण जोडले जाऊ शकतील. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’च्या ‘एमसीएस’ या कंपनीला हॉटस्पॉट बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. एचपी कंपनीचे दोन हजार ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ व फोटीनेट कंपनीचे ६०० ‘अ‍ॅक्सेस पॉइंट’ लावण्यात आले आहेत. मंत्रालयाचा आरसा गेट, गार्डन गेट, गिरगाव चौपाटी आदी महत्त्वाच्या ठिकाणांसह सुमारे ५०० हॉटस्पॉटची चाचणी करण्यात आली आहे. वायफायला जोडण्यासाठी भ्रमणध्वनीचा क्रमांक नोंदणी केल्यावर त्यावर एक ‘वन टाइम’ पासवर्ड येईल. त्यानंतर वायफायशी जोडून घेता येईल. दिवसभरात एका व्यक्तीला फक्त अर्धा तास १०० एमबीपर्यंत डेटा वापरता येईल. त्यानंतर तो आपोआप इंटरनेटपासून तोडला जाईल. या वायफाय सेवेत वापरायोग्य नसलेली सर्व संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत. त्याच वेळी अर्धा तास झाल्यावरही सरकारी संकेतस्थळाशी वापरकर्ता जोडला जाऊ शकेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक प्रकल्पांत या वायफाय सेवेचा फायदा होईल.