श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी

मुंबई महापालिकेकडे कोटय़वधी रुपयांचा निधी असताना मुंबई अविकसित का, असा सवाल करून आगामी पालिका निवडणुकीसाठीची आपली कृष्णनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करताच पालिकेतील हजारो कोटींच्या मुदतठेवीची माहिती देणारी श्वेतपत्रिका जाहीर करा अन्यथा भाजप ती जाहीर करेल असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना एकही चांगला रस्ता का उभा राहिला नाही, रत्यांच्या कामातील कोटय़वधींचे घोटाळे, नालेसफाईपासून संगणकीकरणाच्या कामातील कोटय़वधींची उधळण यावर मुख्यमंत्र्यांनी अंगुलीदर्शन करत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. हजारो कोटींचा अर्थसंकल्प असताना विकास का झाला नाही, हा निवडणुकीतील कळीचा मुद्दा राहणार असून शेलार यांनी पन्नास हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवींची व आजपर्यंतच्या कारभाराबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे विकासासाठी निधी उपलब्ध असताना तो वापरायचा नाही आणि दुसरीकडे मुदत ठेवीमध्ये पन्नास हजार कोटीहून अधिक रक्कम ठेवून द्यायची. याचा फटका मुंबईच्या विकास कामांना मोठय़ा प्रमाणावर बसल्याचा आरोप आता भाजपकडून करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची ‘कृष्णनीती’च चालेल असे सांगून पालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका जाहीर करावीच लागेल, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

सेनेच्या आरेला कारे

मेट्रोसाठी आरे कॉलनीतील जागा देण्यास शिवसेना व मनसेचा विरोध होता. शिवसेनेने यावर रान उठवून राजकीय फायदा घेण्याचा जोरदार प्रयत्न चालवला असला तरी त्याला न जुमानता मेट्रोसाठी येथील जमीन ‘ना विकास क्षेत्रा’तून वगळण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.