काँग्रेस नेते नारायण यांची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी अनुकूल भूमिका मांडली असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची पक्षाची मानसिकता असल्याचे शनिवारी ठाण्यात स्पष्ट केले. ठाणे महापालिकेत गेल्या २५ वर्षांत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी टिप-टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. या बैठकीआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाण्यामध्ये कळवा-मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढत आणि ऊर्वरित शहरात आघाडी असा कोणताही प्रस्ताव किंवा आघाडीचा फॉम्र्युला माझ्यापर्यंत आलेला नाही आणि त्यासंदर्भात अद्याप चर्चाही झालेली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अशा कोणत्याही फॉम्र्युल्यावर आघाडी होणार नसून आघाडी झाली तर संपूर्ण शहरात होईल, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आला आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे देशातून आणि राज्यातून भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची आवश्यकता आहे, असेही राणे यांनी सांगितले. पारदर्शक कोण भाजप की शिवसेना, असा प्रश्न करत पारदर्शक असण्यासाठी पावित्र्य लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांना पारदर्शकता म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी शेलारांना विचारावे, असेही ते म्हणाले. ठाणे पालिकेत भ्रष्टाचार ठाणे महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असून या ठिकाणी नागरी सुविधा व विकासाकडे लक्ष कमी आणि भ्रष्टाचार कसा करता येईल, या हेतूने काम सुरू असल्याचा आरोप राणे यांनी केला. शिवसेनेने निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत हेच मुद्दे निवडणुकीत लोकांपुढे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिकीट देताना विचार करू ठाण्यातील काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत. पण, त्यांच्यात किरकोळ मतभेद असू शकतात. त्याची पक्ष पातळीवर दखल घेण्याइतपत ही प्रकरणे मोठी नाहीत.काँग्रेसच्या नगरसेवकांनी पालिकेत काय कामे केली आणि पालिकेतील भ्रष्टाचारात सहभागी असतील, असे निदर्शनास आले तर त्यांना तिकीट देताना विचार करू, असे राणे यांनी स्पष्ट केले. निरुपम यांच्यामुळे मुंबईत स्वबळावर-तटकरे पंढरपूर : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादीला नाइलाजाने स्वतंत्रपणे लढवावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ठाण्यातील आघाडीबाबत एकदोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी या वेळी सांगितले. मुंबईत काँग्रेसने आघाडी करावी अशी आमची इच्छा होती. मात्र काँग्रेसने नाइलाजाने स्वतंत्रपणे लढवण्याचे ठरवले आहे. ठाणे महापालिकेतील एक-दोन दिवसांत निर्णय होईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.