मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या शुभा राऊळ यांनी गुरूवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले. पक्षातील नव्या चेहऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी आपण यंदाची निवडणूक लढवणार नसल्याचे राऊळ यांनी सांगितले. शुभा राऊळ यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय तडकाफडकी जाहीर केल्याने सुरूवातीला या सगळ्यामागे राऊळ आणि अभिषेक घोसाळकर यांच्यातील वाद कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, शुभा राऊळ यांनी ही शक्यता फेटाळून लावत केवळ नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून माघार घेत असल्याचे सांगितले. मी तीनवेळा मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेली आहे. या तीन टर्ममध्ये मी चांगल्याप्रकारे काम केले. त्यामुळे चौथ्या वेळेलाही मलाच उमेदवारी द्यावी असा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मानस होता. मात्र, मी यापूर्वीच आगामी महानगरपालिका निवडणूक लढवणार नसल्याचे ठरवले होते. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना तसे कळविल्याचे राऊळ यांनी सांगितले. दरम्यान, शुभा राऊळ यांच्या माघारीमुळे आता वॉर्ड क्र. ८ मधून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची लगबग सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेकडून काल रात्री सुमारे १५० एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी दहिसर येथील एका उद्यानाच्या कार्यक्रमावरून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याच पक्षातील तीन नगरसेवकांच्या विरोधात केल्याने त्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर  या नगरसेविकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाद मागितली आहे. या प्रकरणाची पक्षप्रमुखांनी गंभीर दाखल घेऊन  घोसाळकर यांच्या हकालपट्टीची आदेश  दिल्याची चर्चा होती. दहिसर परिसरातील काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी येथील कर्मयोग उद्यानामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आचारसंहिता जारी असतानाही या कार्यक्रमास उपस्थित राहून माजी महापौर, शिवसेना नगरसेविका शुभा राऊळ, नगरसेविका शीतल म्हात्रे आणि नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांनी उद्यानाचे उद्घाटन केले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून या तिघांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी निवडणूक आयोग, पालिका आयुक्त आणि पालिकेच्या ‘आर-उत्तर’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त आदींकडे केली होती.