मुंबईसह राज्यातील सहा महापालिकांमध्ये भाजपची सत्ता येईल. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही. मुंबईत कदाचित थोडाफार फरक पडू शकतो. तशी वेळ आल्यास शिवसेनेनेच भाजपला युतीचा प्रस्ताव द्यायला हवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. त्यांनी बुधवारी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. युती ही शिवसेनेने तोडली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास टाळीसाठी शिवसेनेनेच हात पुढे करावा, असे सांगत दानवेंनी युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला आहे. दानवेंच्या या विधानामुळे आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेप्रमाणे शिवसेना-भाजप यांची निवडणुकीनंतर युती होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना भाजपमध्ये वैचारिक मतभेद नाहीत, असेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईसह सहाही महानगरपालिकांमध्ये भाजपचाच महापौर बसेल. याठिकाणी आम्हाला कुणाच्याही आधाराची गरज लागणार नाही. उर्वरित महानगरपालिकांमध्ये भाजप किंगमेकरची भूमिका बजावेल, असे दानवेंनी सांगितले.

मुंबई महापालिकेत युती व आघाडीत बिघाड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमेकांवर प्रचारात यथेच्छ चिखलफेक केली. त्यानंतर मुंबईकरांच्या मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे; तथापि खरी लढत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे, कारण प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन पक्षांची सारी भिस्त प्रचारादरम्यान या दोन नेत्यांवरच होती. मुंबईत सन २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिकेत जेमतेम ४५ टक्के मतदान झाले असताना काल, मंगळवारच्या मतदानात ही टक्केवारी तब्बल १० टक्क्यांनी वधारून ५५ टक्क्यांवर गेल्याचे दिसत असले तरी यावेळी मुंबईतील तब्बल १० लाख मतदार कमी झाल्याने ही वाढ म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, विशेषत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यासाठी एक चकवा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, मतदानाचा वाढलेला टक्का हा भाजपसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला आहे.