शिवसेना आणि भाजपमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे. भाजप मेळाव्यातील भाषणा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा बसला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. मी फार बोलणार नाही, नाही तर घसा बसेल असा टोलाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. लाल किल्ल्यावर भाषण केल्याने पंतप्रधान होत नाही. तसेच स्वतःला कृष्ण म्हणवून घेतल्याने कोणी कृष्ण बनत नाही असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. गुंडांना पक्षात प्रवेश देऊन मुख्यमंत्री हे गुंडांचे मंत्री झालेत की काय असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर फार काही बोलणार नाही. भाजपला जी टीका करायची आहे ती करु द्या. आपण आपलं काम करुया असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आम्हाला आमची मुंबई घडवायची आहे असेही त्यांनी नमूद केले. राम मंदिरच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले. हरवलेल्या वीटा शोधत असतील, त्या वीटा सापडल्या की राम मंदिर बांधायला सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले असून सर्वांचे खरे चेहरे समोर आलेत असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, गोवामध्ये संजय राऊत यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री या पदाचा आम्ही मान राखतो, त्या पदावरुन उतरल्यावर आम्ही दाखवू शिवसेना काय आहे असा इशाराच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. शनिवारी भाजप मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोलच केला होता. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. ‘दुर्योधनाच्या बाजूला अनेक शकुनी मामा आहेत. भाजपची औकात काय, असे ते म्हणतात. २१ फेब्रुवारीला भाजपची काय औकात आहे, ते दाखवून देऊ,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले.