महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांना १४० चे मताधिक्य; विरोधात काँग्रेस एकाकी

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करण्याऐवजी भाजपने आपली ८२ आणि पाठिंबा देणारा एक अपक्ष अशी एकूण ८३ मते शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पारडय़ात टाकली. त्यामुळे शिवसेनेची ८८ आणि भाजपची ८३ अशी १७१ मते मिळालेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा १४० मताधिक्याने दणदणीत विजय झाला. राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीने तटस्थ भूमिका घेतल्याने काँग्रेस एकाकी पडली होती.

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. शिवसेनेने महापौरपदासाठी मुख्याध्यापक असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांना, तर काँग्रेसने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर आणि पालिकेतील अन्य समित्यांची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने भाजपने या निवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता. मात्र या निवडणुकीसाठी हिरवा तुरा असलेले भगवे फेटे परिधान करून भाजपचे नगरसेवक ‘मोदी’ नामाचा गजर करीत सभागृहात अवतरले. माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौरपदाच्या निवडणुकीची घोषणा करताच भाजपने विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पारडय़ात मते टाकण्यासाठी हात उंच केले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्षांपैकी एक मुमताज रेहबर खान यांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे महाडेश्वर यांना शिवसेनेची ८८ आणि भाजपची ८३ अशी एकूण १७१ मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या अनुक्रमे नऊ व सहा नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडली होती. काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना केवळ ३१ मते मिळाली आणि महाडेश्वर यांचा १४० मताधिक्यांनी विजय झाला. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांना १६६ मते मिळाली. भाजपची पाच मते बाद झाली. तर काँग्रेसचे उमेदवार विनी डिसोझा यांना ३१ मते मिळाली. या वेळीही राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीने तटस्थ भूमिका घेतली होती.

मनसेचा बहिष्कार

स्वबळावर निवडणुका लढविणारे शिवसेना आणि भाजप सत्ता मिळविण्यासाठी एकत्र येत असल्याची कुणकुण लागल्यामुळे मनसेच्या नगरसेवकांनी बुधवारी पालिका मुख्यालयात होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले आहेत. मुंबईकरांची ही फसवणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप लांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर एएमआयएमच्या दोनपैकी एक उमेदवार अनुपस्थित होता. तर पालिका सभागृहात आलेल्या एएमआयएमच्या एका नगरसेवकाने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही.

हुतात्म्यांना अभिवादन

निवडणूक पार पडल्यानंतर ढोल-ताशाचा गजरामध्ये हुतात्मा चौकाच्या दिशेने मिरवणूक काढण्यात आली होती. फुलांनी सजविलेल्या वाहनांमध्ये नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले.

मुंबई महापालिकेत राजकीय अस्थिरता येऊ नये यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले. भाजपचे नगरसेवक भविष्यात पालिकेत पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणूनच काम करणार आहेत. त्रुटी अथवा गडबड असलेल्या प्रस्तावाच्या विरोधात भाजप आवाज उठवेल.   – मनोज कोटक, भाजप गटनेते