रावसाहेब दानवे यांची भूमिका; मुलाच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ‘मातोश्री’वर

युती शिवसेनेने तोडली असून आता पुन्हा युती करायची असल्यास शिवसेनेने हात पुढे करावा, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सकाळी लगावला. मात्र दानवे यांनी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुलाच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी ‘मातोश्री’ गाठली व सुमारे पाऊण तास चर्चा केली. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांची बरीच राळ उडाल्याने भाजपने ‘तह’ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असतानाही महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युती तुटल्यानंतर एकमेकांवर तोफांच्या फैरी झडल्या. भ्रष्टाचार, मालमत्ता, काळा पैसा व अनेक आरोप झाले. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंधांमध्ये कटुता वाढली आहे. पक्षाची ताकद बरीच वाढली असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, सोलापूर या सहा ठिकाणी भाजपचा महापौर होईल व अन्यत्रही ‘किंग मेकर’च्या भूमिकेत असेल, असे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी सांगितले. मुंबईत स्वबळावर भाजपची सत्ता येईलच, मात्र जर वेगळी परिस्थिती निर्माण झाली, तर पक्षांतर्गत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पण आता शिवसेनेने युती तोडली असल्याने पुन्हा एकत्र यायचे असेल, तर शिवसेनेने हात पुढे करावा, असा टोला दानवे यांनी लगावला.

मात्र त्यानंतर दानवे हेच चिरंजीव संतोष यांच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी सायंकाळी ‘मातोश्री’वर दाखल झाले. ते सुमारे पाऊण तास तेथे होते. ही सदिच्छा भेट केवळ आमंत्रणासाठी होती, राजकीय चर्चा झाली नाही, असे दानवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दानवे यांच्या मुलाचा विवाह २ मार्च रोजी औरंगाबाद येथे होत असून त्यासाठी काही दिवसांचा अवधी आहे. मात्र मतदान झाल्यानंतर लगेच आणि निकालाआधीच दानवे यांनी ठाकरे यांची भेट घेऊन ‘टायमिंग’ साधत चर्चा केल्याने त्यातून तर्कवितर्क काढण्यास सुरुवात झाली आहे. उभयपक्षी निर्माण झालेला ताणतणाव निवळण्यासाठी भाजपचे हे प्रयत्न सुरू झाले आहेत, मुंबई व अन्यत्रही सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज भासल्यास सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने भाजपने तहाच्या भूमिकेतून पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

‘सेनेशी आघाडीस हरकत नाही’

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप किंवा शिवसेनेला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या, तर शिवसेनेशी निवडणुकोत्तर आघाडी करण्यास भाजपला हरकत असणार नाही, असे राज्याच्या एका वरिष्ठ भाजप नेत्याने बुधवारी सांगितले. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप शिरकाव करेल असे प्राथमिक मूल्यांकनावरून लक्षात आल्याचा दावा करतानाच, काही ठिकाणी शिवसेनेला इतरांच्या मदतीची गरज पडेल असे हा नेता म्हणाला. शिवसेनेला बृहन्मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा मिळूनही बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या, तर त्यांना आमच्या पाठिंब्याची गरज भासेल. ठाणे महापालिकेतही त्यांना आमचा पाठिंबा आवश्यक ठरू शकतो.