उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महानगरपालिका निवडणुकीवर खासदार गोपाळ शेट्टी यांची घट्ट पकड आहे. गोपाळ शेट्टी हे नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वधिक मतांनी निवडून येणाऱ्या खासदारांपैकी एक आहे. उत्तर मुंबईतील एकूण ६ आमदरांपैकी  एक आमदार शिवसेनेचा आणि एक काँग्रेसचा आहे. यापैकी प्रकाश सुर्वे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेची पाटी कोरी झाली आहे.

भाजपाचे चार आमदार आपापल्या मतदार मजबूत पाय रोवून आहेत. चारकोप आणि गोराई या मराठी बहुल भागात मनसेचे ठळक अस्तित्व आहे. मनसेने नुकत्याच या भागात काही नियुक्त्या नव्याने केल्या आहेत. मनसेची स्थापना झाली तेव्हा सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दीपका पवार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांशी जोडलेल्या व्यक्तींना मुख्य संघटनेत पद देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना बंडखोरीमुळे दोन पाऊले मागे गेली आहे. त्यामुळे निर्माण झालेली जागा घेण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. 

शिवसेना आणि मनसे यांच्यात मराठी मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. या विभाजनाचा फायदा भाजपाला होणार हे नक्की आहे. गोपाळ शेट्टी यांची मजबूत पकड, शिवसेनेतील बंडखोरी आणि आजूनही सुरू असलेली पक्षांतर्गत धुसफूस,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव नसणे या सर्व बाबी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पडणार हे नक्की.