उत्तर पश्चिम मतदारसंघात रखडलेले पुनर्विकास प्रकल्प हा कळीचा मुद्दा आहे. याचा थेट फटका महापालिका निवडणुकीत बसणार आहे. सध्या राज्यात चर्चेत असणारा पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हा याच लोकसभा क्षेत्रात आहे. या प्रकल्पासह मोतीलाल नगर, भगतसिंग नगर, जोगेश्वरी पूर्वेकडील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. अनेक वर्षे हजारो कुटुंब बेघर आहेत. या भागात अनेक दिग्गज नेते असूनसुध्दा पुनर्विकासाचा विषय सुटला नाही. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड रोष आहे.

स्थानिक पातळीवर हा राग महापालिका निवडणुकीत व्यक्त होण्याची भीती स्थनिक नेत्यांना वाटतेय. राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या नेत्यांनासुद्धा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रखडलेले पुनर्विकास प्रकल्प अडचणीचे ठरण्याची भीती वाटतेय. हे प्रकल्प अनेक वर्षे रखडल्यामुळे भागातील रहिवासी हे इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्याचा थेट परिणाम मतदानावर होणार आहे. कोण तात्पुरत्या स्वरूपात कुठे स्थलांतरित झाले आहे याची माहिती मिळवणे कठीण आहे.

इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्यांची संख्या मोठी आहे. याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्क्यावर होणार आहे. याभागत प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी खास वोट बँक आहे. स्थलांतरामुळे ही वोट बँक विखुरली आहे. लोकांची नाराजी आणि विखुरलेले मतदार यामुळे सर्वच राजकीय पक्ष धास्तावले आहेत