केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत ज्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा आहे ती आरोग्यविषयक योजनेची. देशातील १० कोटी कुटुंबांना अर्थात सरासरी ५० कोटी लोकांना प्रति वर्ष ५ लाखांचा आरोग्य विमा जाहीर करण्यात आला आहे. जगातल्या सगळ्या देशांमध्ये भारताने जाहीर केलेला हा सर्वाधिक आरोग्यविमा आहे असाही दावा अरूण जेटली यांनी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा देशाच्या एकूण जनतेपैकी ४० टक्के लोकांना होणार आहे असेही अरूण जेटली यांनी म्हटले आहे.

गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांची आरोग्य मदत जाहीर केली आहे. जगातील ही सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचार मिळण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना ३० हजारांचा आरोग्य विमा दिला जातो. मात्र अरूण जेटली यांनी जाहीर केल्याप्रमाणे आरोग्य विम्याची ही रक्कम ५ लाख रुपये वार्षिक असणार आहे. याचा फायदा देशातील १० कोटी कुटुंबांना म्हणजेच ५० कोटी लोकांना होणार आहे.

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी ओबामाकेअर नावाने एक आरोग्य योजना आणली होती. या योजने अंतर्गत गरीब अमेरिकी नागरिकांवर उपचार केले जातात. त्याच धर्तीवर ही योजना आणण्यात आली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या योजनेला मोदी केअर असे नाव दिले गेले तरीही आश्चर्य वाटायला नको.