नवी दिल्ली : प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या मोहिमांनंतर देशभरातील ९६ शहरांतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे आर्थिक पाहणीअहवालात नमूद करण्यात आले आहे. वाहनांमधील धूर उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. विजेवर चालणाऱ्या वाहनांना चालना देण्यासाठी आणि हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने १ एप्रिल २०१९ पासून पाच वर्षांसाठी १० हजार कोटी रुपयांची योजना राबवली आहे. विद्युत वाहनांना मागणी- प्रोत्साहन देण्यासाठी यापैकी ८६ टक्के निधीचे वितरण करण्यात आले, असे अहवालाने नमूद केले आहे. या योजनेनुसार विजेवर चालणाऱ्या ७,०९० बस, पाच लाख तीनचाकी वाहने, ५५ हजार चारचाकी वाहने आणि १० लाख दुचाकींची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. या परिणामी देशातील ९६ शहरांमधील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून ३६ शहरांमध्ये मात्र प्रदूषण वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.