जालसंजाल तसेच नदीजोड प्रकल्पाला फाटा औरंगाबाद: वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपये, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी ५० कोटी, औरंगाबाद शहरातील वंदे मातरम सभागृहासाठी ४३ कोटी रुपये, तसेच हैदराबाद- मुंबई मेट्रोचा पाठपुरावा आणि वेरुळ- अजिंठा येथील बंद पडलेले अभ्यागत पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन अशा अर्थसंकल्पातील मराठवाडय़ाच्या नोंदी सुखवणाऱ्या असल्या तरी नदीजोड प्रकल्पाला राज्य सरकारने मारलेला फाटा तसेच मराठवाडय़ाच्या जालसंजाल (वॉटरग्रीड) केलेल्या दुर्लक्षामुळे सरकारवर आता टीका होऊ लागली आहे. खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पास पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी मिळाल्याने राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्याचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी आभार मानले आहेत. हैदराबाद- मुंबई मेट्रोसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पाठपुरावा करत असल्याने त्याचा उल्लेख अर्थसंकल्पातील भाषणादरम्यान करण्यात आल्याचे काँग्रेसच्या सूत्राने सांगितले. तसेच वेरुळ- अजिंठा या जागतिक लेणीच्या पायथ्याशी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी लेणींमधील सुविधां वाढाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात त्यांनी यासाठी बैठक लावल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही लेणींमधील गैरसोयींचा आढावा घेतला होता. फर्दापूर येथील अभ्यागत केंद्र सुरू केले जाईल असे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. या केंद्रातील वीजही सध्या कापण्यात आलेली आहे. खासगी भागीदारी तत्त्वावर येथील विकास करण्याचे नियोजन केले जात होते. त्याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आल्याने आता मराठवाडय़ातील पर्यटन क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जालना-नांदेड महामार्गाच्या कामासाठी होणाऱ्या भूसंपादनास निधी देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले आहे. औरंगाबाद शहरातील शासकीय ज्ञान, विज्ञान महाविद्यालयास शंभरी वर्ष पूर्ण होत असल्याने त्यास दहा कोटी रुपयांचीही तरतूद करण्यात आली आहे. तर उस्मानाबाद येथे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या जलसंधारण विभागातील आर्थिक तरतुदीतून पाझर तलाव उभे केले जाणार आहेत. जल क्षेत्रातील अभ्यासक शंकरराव नागरे म्हणाले,की जालसंजाल ही योजना तर गुंडळाली आहेच तसेच नदी जोड प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दमणगंगा- पिंजाळ योजनेसाठी तरतूद करतील असे वाटले होते पण त्यांनी काही केले नाही. अर्थसंकल्पतील काही तरतुदी चांगल्या असल्या तरी एकूण मागास भागाच्या विकासाला चालना देण्यास हा अर्थसंकल्प पुरेसा नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. मराठवाडय़ात सौर प्रोत्साहन सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी लातूर जिल्हयातील सिंदाळा (६० मेगावॅट), उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव (५७७ मेगावॅट) येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प व्हावा म्हणून खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील या दोन शिवसेनेच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही या प्रकल्पासाठी लक्ष घातले होते. असा आहे अर्थसंकल्पातील मराठवाडा * जालना येथे मनोरुग्णालयासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद * मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वर्षभरातील उपक्रमांसाठी ७५ कोटी रुपये * औरंगाबाद शहरासाठी ४३ कोटी रुपये * जायकवाडी येथे जल पर्यटन प्रकल्पाचे आश्वासन