अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देशभरात येत्या २ वर्षांत २ कोटी शौचालय बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. भारताच्या अनेक गावात आजही शौचालय नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार आपल्या भाषणात देशातील स्वच्छतेचा मुद्दा अधोरेखीत केला होता. घरात शौचालय नसल्यानं अनेक महिला आणि मुलींना उघड्यावर शौचालयास जावे लागते.  शौचालय नसल्यानं महिलांना अवेळी घराबाहेर पडावे लागत होते. अनेकींना अतिप्रसंगाना समोरं जावं लागत असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे या  मोठ्या समस्येवर तोडगा काढत स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून कुटुंबाना ठराविक निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.

२ ऑक्टोबर २०१४ मध्ये मोदीं सरकारनं ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत खेड्यापाड्यात कोट्यवधी शौचालय बांधण्यात आले. येत्या दोन वर्षांत २ कोटी शौचालय देशभरात बांधण्यात येणार असून एकूण ६ कोटी शौचालय बांधण्याचा सरकारचा मानस असणार आहे. लाईव्ह मिंटच्या सर्वेक्षणानुसार भारतात दर तासाला २, ४०० हून अधिक शौचालाय बांधले जात आहे. तर एका अहवालानुसार बिहार , महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत शौचालय बांधण्यात आले असले तरी पाण्याच्या आभावामुळे मात्र शौचालयाचा वापर मात्र केला गेला नसल्याचं समोर आलं आहे. भारतात दरदिवशी ६२ कोटींहून अधिक लोक शौचालयाच्या आभावी उघड्यावर शौच करतात, त्यामुळे घराघरात शौचालय आणि प्रत्येक गाव हागणदारी मुक्त करण्याचं मोदी सरकारचं स्वप्न पूर्ण करण्याचा मानस जेटलींनी या अर्थसंकल्पात बोलून दाखवला आहे.