मुंबईः भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांत बँकांची एटीएम बंद होण्याच्या अफवा समाजमाध्यमावर पसरल्या असून, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँकेसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्या शुक्रवारी फेटाळून लावल्या. सर्व एटीएम कार्यरत असून, त्यात पुरेशी रक्कम आहे आणि डिजिटल सेवाही सुरळीत सुरू असल्याचे बँकांनी स्पष्ट केले.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर अनेक अफवा पसरत आहेत. त्यात आगामी काही दिवसांत बँकांची एटीएम बंद होण्याच्या अफवा पसरल्या होत्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने समाजमाध्यमावर प्रसृत केलेल्या संदेशात म्हटले आहे की, आमची सर्व एटीएम सुरळीपणे सुरू आहेत. याचबरोबर डिजिटल सेवाही व्यवस्थित सुरू असून, ग्राहकांच्या वापरासाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये.

याचबरोबर बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांनीही अशाच प्रकारचे स्पष्टीकरण दिले आहे. या बँकांनी त्यांच्या सर्व सेवा सुरळीतपणे सुरू असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर डिजिटल सेवा सुरू असल्याने ग्राहक घरातून बसून सेवेचा सोयीस्कर वापर करावा, असेही बँकांनी नमूद केले आहे.

सायबर सज्जताही पुरेपूर 

सीमावर्ती भागातील बँक कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी तेथील स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. बँकेकडून सर्व शाखा आणि एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवण्यात आली आहे. याचबरोबर सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांतही वाढ करण्यात आली आहे, असे युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ए. मनिमेखलाई यांनी स्पष्ट केले.