पीटीआय, नवी दिल्ली
विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वाढून १२.९२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. १ एप्रिल ते १० नोव्हेंबर दरम्यान या कालावधीतील हे संकलन वार्षिक तुलनेत ७ टक्क्यांची वाढ दर्शविणारे आहे.
वैयक्तिक प्राप्तिकर आणि कंपनी कर यांचा समावेश असलेल्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात या आर्थिक वर्षात १० नोव्हेंबरपर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत १५.३५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत २.१५ टक्के अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे या कालावधीत परतावा देण्याचे (रिफंड) प्रमाण १८ टक्क्यांनी घसरून २.४२ लाख कोटी रुपयांवर सीमित राहिले, ज्यामुळे निव्वळ संकलनात ७ टक्क्यांची वाढ दिसू शकली.
आर्थिक वर्षात आतापर्यंत कंपनी कर संकलन सुमारे ५.३७ लाख कोटी रुपये होते, जे २०२४ मध्ये याच कालावधीत ५.०८ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. तर वैयक्तिक कर संकलन आतापर्यंत सुमारे ७.१९ लाख कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत सुमारे ६.६२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होते.
या कालावधीत रोखे उलाढाल कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) संकलन ३५,६८२ कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षीच्या ३५,९२३ कोटी रुपयांपेक्षा किंचित घटले आहे. मुख्यतः भांडवली बाजार नियामकांनी वायदे बाजारातील व्यवहारासंबंधी केलेल्या सुधारणांचा हा परिणाम आहे.
चालू आर्थिक वर्षात, सरकारने २५.२० लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १२.७ टक्क्यांनी जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘एसटीटी’मधून ७८,००० कोटी रुपये गोळा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
