मुंबई: देशातील भांडवली बाजारात गेल्या दशकभरात मोठे स्थित्यंतर घडले असून, देशांतर्गत गुंतवणूकदार हे आधीपेक्षा महत्त्वाची आणि परदेशी गुंतवणूकदारांपेक्षा प्रबळ भूमिका बजावू लागले असून, या काळात त्यांनी परकीयांच्या तुलनेत ३.७ पटीने अधिक गुंतवणूक केल्याचे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने स्पष्ट केले.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ताज्या अहवालानुसार, भारतीय भांडवली बाजारात आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०२४-२५ या दशकभरात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) १९५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. याच कालावधीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (एफआयआय) झालेली गुंतवणूक ही ५३ अब्ज डॉलर आहे. म्हणजेच त्या तुलनेत देशांतर्गत गुंतवणूकदारांची गुंतवणूक ३.७ पटीने अधिक आहे.

डीआयआयच्या वरचष्म्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून मोठ्या प्रमाणात वाढत गेले. गेल्या दशकभराच्या कालावधीत करोना साथीचे संकट, जागतिक पातळीवरील चढे व्याज दर आणि देशातील समभागांचे वाढलेले मूल्यांकन या प्रतिकूल गोष्टी असतानाही भारतीय गुंतवणूकदार बाजारात अढळपणे पैसे गुंतवत राहिले.

देशांतर्गत गुंतवणूकदारांचा बाजारात सहभाग जास्त वाढल्याने काही गोष्टींमध्ये बदलही घडून आले आहेत. विशेषत: क्षेत्रनिहाय गुंतवणुकीमध्ये हे बदल दिसून येत आहे. निफ्टी ५०० निर्देशांकात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खासगी बँकांमध्ये सर्वाधिक अशी ४७.५ टक्के हिस्सेदारी झाली आहे. त्यानंतर दूरसंचार २२.५ टक्के, गृहनिर्माण २१ टक्के, बँकेतर वित्तीय कंपन्या २०.५ टक्के, तंत्रज्ञान १९.५ टक्के आणि आरोग्यसुविधा १८.७ टक्के आणि ग्राहक उपभोग क्षेत्र १८.६ टक्के असा त्यांचा वाटा आहे. याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतील सर्वाधिक वाटा खासगी बँकांमध्ये ३३.१ टक्के असून, त्याखालोखाल ग्राहक उपभोग क्षेत्र २३.९ टक्के, तेल व नैसर्गिक वायू २१.३ टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू २०.९ टक्के आणि धातू २०.७ टक्के आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राधान्य कशाला?

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार भांडवली बाजारात गुंतवणूक करताना ग्राहक, तेल व नैसर्गिक वायू आणि धातू या क्षेत्रांना प्राधान्य देत आहेत. याचवेळी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या तुलनेत त्यांची खासगी बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक कमी आहे. गेल्या दशकभरात देशातील भांडवली बाजाराला आकार देण्याचे काम देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केले आहे, असे मोतीलाल ओसवालच्या अहवालाने नमूद केले आहे.