नवी दिल्ली : विद्यमान वर्षातील जानेवारी-मार्च तिमाहीत सोन्याची मागणी १५ टक्क्यांनी घसरून ११८.१ टनांपर्यंत खाली आली आहे. वाढत्या किमतींमुळे सुवर्ण मूल्य २२ टक्क्यांनी वाढून ९४,०३० कोटी रुपये झाले असले तरी एकंदर मागणी घटली आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) बुधवारी सांगितले.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अंदाजानुसार, कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये भारताची सोन्याची मागणी ७००-८०० टनांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. विद्यमान वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच सोन्याचे मूल्य २५ टक्क्यांनी वधारले आहे, ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर झाला आहे.

वाढलेल्या किमतींमुळे गुंतवणूकदारांनी खरेदी कमी केली आहे. मात्र, सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व, विशेषतः अक्षय्य तृतीया आणि आगामी लग्नसराईच्या हंगामापूर्वी, खरेदी वाढते आहे. असे डब्ल्यूजीसी इंडियाचे मुख्याधिकारी सचिन जैन यांनी सांगितले. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे, ज्यामुळे पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी राहिली आहे.

सोन्याच्या विक्रमी किमतींमुळे ग्राहकांचा लहान, हलक्या वजनाच्या दागिने खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र काहींनी किंमत कमी होण्याची आशा बाळगून खरेदी पुढे ढकलली आहे. असे असूनही, लग्नसराईच्या हंगामामुळे मागणी तुलनेने स्थिर राहिली आहे. मात्र, २०२५ या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दागिन्यांची मागणी २५ टक्क्यांनी कमी होऊन ७१.४ टन झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ९५.५ टन होती. दरम्यान, २०२५ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जागतिक सोन्याची मागणी १ टक्क्यांनी वाढून १,२०६ टन झाली आहे. ही २०१९ नंतरच्या पहिल्या तिमाहीतील सर्वोच्च पातळी आहे.

वर्ष                         सोन्याचा भाव

जानेवारी २०२५ ७९,६३३.४ ( प्रति दहा ग्रॅम)

जानेवारी-मार्च २०२४ ५५,२४७.२ ( प्रति दहा ग्रॅम)

गुंतवणूक म्हणून मागणीत वाढ गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी लवचीक राहिली, ती ७ टक्क्यांनी वाढून ४६.७ टन झाली, जी याच कालावधीत ४३.६ टन नोंदवली गेली होती. शिवाय, जागतिक भांडवली बाजारातील अनिश्चिततेच्या काळात, सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने खरेदीकडे कल राहिला आहे. सोन्याचे बार आणि नाण्यांच्या मागणीत वाढ दिसून आली.