नवी दिल्ली : इंडसइंड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुमंत कथपालिया यांच्या राजीनाम्यानंतर बँकेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
व्यवहार अनियमिततेमुळे अडचणीत असलेल्या इंडसइंड बँकेचे मुख्याधिकारी कथपालिया यांनी मंगळवारी नैतिक जबाबदारी स्वीकारून कामकाजाची वेळ पूर्ण केल्यानंतर पदत्याग केला. हिशेबातील तफावतीमुळे १,१९६० कोटी रुपयांचा तोटा उघडकीस आल्यानंतर त्याची नैतिक जबाबदारी घेत दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदभार स्वीकारेपर्यंत किंवा ३ महिन्यांच्या कालावधीसाठी बँकेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी संचालक मंडळाने कार्यकारी समितीची स्थापन केली आहे, असे इंडसइंड बँकेने प्रमुख बाजार मंचांना कळवले आहे. देखरेख समितीचे अध्यक्ष हे बँकेच्या विविध समित्यांचेदेखील कामकाज बघणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर संचालक मंडळाने कार्यकारी समितीची स्थापना केली आहे. बँक प्रशासन उच्च मानकांचे पालन करत तिच्या कामकाजात स्थिरता आणि सातत्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे, असे बँकेने म्हटले आहे.
विद्यमान आठवड्याच्या सुरुवातीला, इंडसइंड बँकेने नियुक्त केलेल्या बाह्य लेखापरीक्षकाने ३१ मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत प्रतिकूल लेखांकन परिणाम १,९५९.९८ कोटी रुपये निश्चित केले होते, जे १५ एप्रिल रोजी उघड केलेल्या रकमेइतकेच आहे. १५ एप्रिलला हिंदुजा बंधूंच्या मालकीच्या बँकेने हिशेबातील त्रुटी आणि त्यातून सुमारे २००० कोटी रुपयांचा तोटा संभवत असल्याचा स्वतःहून उलगडा केला होता. इंडसइंड बँकेला हिशेबातील गफलतींमुळे तिच्या निव्वळ मूल्यावर (करोत्तर आधारावर) २.२७ टक्के प्रतिकूल परिणाम केला आहे. बुधवारच्या सत्रात इंडसइंड बँकेचा समभाग ४.५१ रुपयांनी वधारून ८४१ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, बँकेचे ६५,५०६ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.