मुंबई : लघू आणि मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ बाजारातील अनिर्बंध तेजीबाबत सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिला.
गुंतवणूकदारांनी एसएमई आयपीओमध्ये गुंतवणूक करताना सावध राहावे आणि अल्पकालीन परताव्यांकडे आकर्षित होऊन गुंतवणूक करू नये असा इशारावजा सल्ला दिला आहे. विशेषत: चुकीच्या सल्ल्याने अनेकांची दिशाभूल झाली आहे. कारण बऱ्याच कंपन्यांकडून सूचिबद्धतेच्या दिवशी मिळणारा बहुप्रसवा परतावा कंपनीच्या कामगिरीवर आधारित खरा असू शकत नाही, असे पांडे यांनी सांगितले.
सेबीकडून वारंवार यासंबंधित प्रगटन जाहीर केले जात असते. शिवाय गुंतवणूकदारांना याबाबत माहिती उपलब्ध करून सावध केले जात असते. भांडवली नफ्याच्या बाबतीत परतावा तात्पुरता खूप आकर्षक दिसू शकतो, मात्र प्रत्यक्षात तो खरा आणि दीर्घकाळात टिकावू असेलच असे नाही. सेबीने एसएमई आयपीओसंदर्भातील नियामक चौकटी कठोर करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. एसएमई क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ प्रस्तावांसाठी, अशा कंपन्या नफाक्षम असणे आवश्यक करतानाच, प्रचलित भागधारक – प्रवर्तकांना त्यांच्या आंशिक मालकी हिश्शाच्या विक्रीसाठी (ऑफर फॉर सेल -ओएफएस) २० टक्क्यांची मर्यादा घालून देणारी कठोर नियामक चौकट लागू केली आहे.
या सुधारित नियमांचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतानाच, चांगला आर्थिक पाया असलेल्या एसएमईंना जनतेकडून निधी उभारण्याची संधी देणारे एक सुव्यवस्थित व्यासपीठ प्रदान करावे असा आहे. अलीकडे गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला असताना, एसएमई आयपीओ संबंधांने पुढे आलेल्या समस्या पाहता हे पाऊल उचलले गेल्याचे ‘सेबी’ने म्हटले आहे.
बाजारातील तेजीमुळे, गेल्या दोन वर्षांत एसएमई कंपन्यांद्वारे सार्वजनिक भागविक्रीची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. ‘प्राइमडेटाबेस’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये, सुमारे २४० एसएमई कंपन्यांनी ८,७६१ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या माध्यमातून उभारला, जो २०२३ मध्ये उभारलेल्या ४,६८६ कोटी रुपयांच्या जवळपास दुप्पट आहे. चालू कॅलेंडर वर्षात मार्चपर्यंत, ५५ एसएमई आयपीओच्या माध्यमातून २,३७० रुपयांची निधी उभारणी झाली आहे. मार्चमध्ये १५ एसएमई आयपीओ बाजारात धडकले. मात्र मार्च महिन्यात मुख्य मंचावर एकाही आयपीओचे आगमन झाले नाही.