मुंबई: पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात सुरुवातीचा काही काळ अस्थिरतेचे वातावरण होते. मात्र दुपारच्या सत्रात बाजारसावरला आणि प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले.

दिवसभरातील चढ-उतारानंतर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०५.७१ अंशांनी वधारून ८०,७४६.७८ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ८०,८४४.६३ असा सत्रातील उच्चांक आणि ७९,९३७.४८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३४.८० अंशांची वाढ झाली आणि तो २४,४१४.४० पातळीवर स्थिरावला.

अलिकडच्या भारत-पाक सीमा तणावादरम्यान देशांतर्गत भांडवली बाजार मजबूत स्थितीत राहिला. भू-राजकीय जोखमीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र त्याच वेळी, भारत-इंग्लंडमधील मुक्त व्यापार (एफटीए) करारामुळे गुंतवणूकदारांचा आशावाद वाढला, ज्यामुळे कापड, वाहने व वाहन पूरक उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांच्या समभागांमध्ये वाढ झाली. जागतिक स्तरावर, अमेरिका आणि चीनने व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शविल्याने जागतिक बाजारात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, चीनच्या अलीकडील व्याजदर कपातीमुळे आशियाई बाजारातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. बाजाराचे लक्ष आता अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लागले आहे, जरी व्याजदर कपात अशक्य वाटत असली तरी, गुंतवणूकदार बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

भारत आणि ब्रिटनने मंगळवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील कर कमी होतील आणि ब्रिटिश कंपन्यांना भारतात व्हिस्की, कार आणि इतर उत्पादने निर्यात करणे सोपे होईल आणि एकूण व्यापारी बाजाराला चालना मिळेल.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले ज्यात बहावलपूरचा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि लष्कर-ए-तय्यबाचा मुरीदके येथील तळ यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २६ नागरिकांच्या हत्याकांडानंतर दोन आठवड्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत लष्करी हल्ले करण्यात आले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एटरनल, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, टायटन, महिंद्र अँड महिंद्र आणि पॉवर ग्रिड यांचे समभाग वधारले. तर एशियन पेंट्स, सन फार्मा, आयटीसी, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचसीएल टेकच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ३,७९४.५२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

पाकिस्तानी बाजारात पडझड

भारताच्या कारवाईचे पडसाद पाकिस्तान शेअर बाजारावर बुधवारी उमटले. तेथील गुंतवणूकदारांमध्ये यातून घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक ‘केएसई १००’ हा ६,२७२ अंशांनी म्हणजेच ६ टक्क्यांनी कोसळला. निर्देशांक तीव्र पडझडीने १,०७,००७ अंशांपर्यंत खाली आल्यांनतर शेअर बाजारातील व्यवहार काही काळ थांबवण्यात आले होते. दिवसअखेर केएसई १०० निर्देशांक ३.१० टक्क्यांनी म्हणजेच ३,२५१ अंशांनी घसरून १,१०,०४७ अंशांवर स्थिरावला.

बाजारमंचाचे प्रतिबंधात्मक उपाय

पाकिस्तानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आघाडीवर प्रमुख बाजारमंच मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई), खबरदारीचे उपाय म्हणून परदेशी वापरकर्त्यांना त्यांच्या संकेतस्थळावरील प्रवेश बंद केले आहेत. संभाव्य सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली असल्याचे ‘बीएसई’च्या प्रवक्त्याने सांगितले.

सेन्सेक्स ८०,७४६.७८ १०५.७१ ( ०.१३%)

निफ्टी २४,४१४.४० ३४.८० ( ०.१४%)

तेल ६२.५५ ०.६४%

डॉलर ८४.८० ४५ पैसे