Indian Rupee Hits Record Low Against US Dollar: रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज ९२ रुपयांच्या नव्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. विश्लेषकांच्या मते, परकीय भांडवलाचा बहिर्वाह, जागतिक बाजारातील कमकुवत भावना आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) मर्यादित हस्तक्षेप या घटकांच्या एकत्रित परिणामामुळे ही घसरण होत आहे.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे डॉ. व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, भारताची व्यापार आणि चालू खात्यातील तूट यामुळे रुपया ऐतिहासिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे, ज्यामुळे “रुपयाचे सरासरी वार्षिक अवमूल्यन सुमारे ४% दराने झाले आहे.”

ते पुढे म्हणाले की, आता असामान्य गोष्ट ही आहे की, “इतर चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत होत असतानाही” रुपयाचे मूल्य घसरत आहे.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, २०२५ मध्ये बहुतेक उदयोन्मुख बाजारपेठांच्या चलनांमध्ये वाढ झाली, तर रुपयाचे मूल्य मात्र “सुमारे ५% घसरले आहे.”

त्यांच्या मते, सर्वात मोठा दबाव सततच्या परदेशी विक्रीमुळे येत आहे. गेल्या वर्षी एफपीआय (FPI) ने गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण १८ अब्ज रुपयांपेक्षा जास्त होते आणि हा कल २०२६ मध्येही सुरू राहिला आहे.

रिझर्व्ह बँकेने आक्रमकपणे हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, निर्यातदार त्यांचे डॉलरमधील उत्पन्न देशात आणण्यास विलंब करत आहेत, कारण त्यांना रुपयाची किंमत आणखी घसरण्याची अपेक्षा आहे, असे डॉ. विजयकुमार म्हणाले.

त्यांच्या मते, जोपर्यंत रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत नाही, तोपर्यंत रुपया सध्याच्या पातळीजवळच राहील, परंतु जर प्रलंबित अमेरिका-भारत व्यापार करार पूर्ण झाला, तर एक महत्त्वपूर्ण बदल घडू शकतो. अशा परिस्थितीत, “रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ९० च्या पातळीखाली जाऊ शकते.” याबाबत इंडिया टुडेच्या वृत्तात उल्लेख आहे.

चॉईस वेल्थचे अक्षत गर्ग यांनी रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीबाबत बोलताना म्हटले की, “डॉलरची सततची मजबुती, अमेरिकन बाँडवरील वाढते उत्पन्न आणि परदेशी पोर्टफोलिओमधून सुरू असलेला निधीचा बहिर्वाह यामुळे उदयोन्मुख बाजारपेठेतील चलने तणावाखाली राहिली आहेत. आयातदारांकडून महिन्याच्या अखेरीस होणारी नियमित मागणी आणि हेजिंगमुळे या घसरणीत भर पडली आहे.”

त्यांच्या मते, अस्थिरता व्यवस्थापित करण्यासाठी आरबीआयकडे पुरेशी क्षमता आहे, परंतु जोपर्यंत बाजारपेठेत अनागोंदी माजत नाही, तोपर्यंत आरबीआय कोणत्याही विशिष्ट पातळीचे संरक्षण करण्याची शक्यता नाही, असा उल्लेखही इंडिया टुडेच्या वृत्तात आहे.