Sensex Today: पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या देशाला हादरवून टाकणाऱ्या पहलगाम हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दिलेल्या लष्करी प्रत्युत्तराच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सकाळी भारतीय शेअर बाजारातील दोन्ही बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक अंकांत उघडले. पण त्यानंतर सेन्सेक्स ४११.९७ अंकांनी घसरून ८०३३४.८१ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी १४०.६० अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा शेअर बाजार पूर्णपणे कोसळला आहे. आज (८ मे २०२५), कराची स्टॉक एक्सचेंज ७००० अंकांनी कोसळल्याने पाकिस्तानच्या शेअर बाजारातील व्यवहार थांबवण्यात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, पाकिस्तानचा बेंचमार्क निर्देशांक केएसई-३० ७ टक्क्यांहून अधिक घसरल्याने, सलग दुसऱ्या सत्रात मोठे नुकसान झाल्याने पाकिस्तानने शेअर बाजारातील व्यवहार थांबवण्यात आले.
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या चिंतेकडे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित केल्यामुळे, बुधवारी भारतीय शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाले होते. तर, दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाला. कारण काल भारताने केलेल्या कारावईनंतर पाकिस्तानच्या केएसई१०० निर्देशांकात ३५०० अंकांची घसरण झाली होती.
कोल इंडियाने गाठला एप्रिलनंतरचा उच्चांक
दरम्यान, चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात अंदाजापेक्षा जास्त वाढ झाल्याने कोल इंडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत ३.०४% वाढून ३९४.९५ रुपये झाली, जो २९ एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. विश्लेषकांनी अंदाज दावलेल्या ८,४१३.५ कोटी रुपयांच्या तुलनेत, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १२% वाढून ९,६०४.०२ कोटी रुपयांवर पोहोचल्याने शेअरची किंमत वाढली.
अमित सिक्युरिटीज, स्टॅम्पेड कॅप (डीव्हीआर), श्रीराम पिस्टन्स, अथर्व एंटरप्रायझेस आणि बोधट्री कन्सल्ट सारख्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. तर डालमिया इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, बीएनआर उद्योग, तिलक व्हेंचर्स, जेनसोल इंजिनिअरिंग आणि व्हीएमएस इंडस्ट्रीज यांसारख्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
मुंबई शेअर बाजारात आज संरक्षण क्षेत्रातील शेअर्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. गुरुवारी कोचीन शिपयार्ड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ७ मे रोजी भारताने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण लष्करी कारवाई केल्यानंतर या शेअर्सला मागणी वाढली आहे.