प्रमोद पुराणिक

परदेशी वित्तसंस्थांना भारतीय बाजार समजावून सांगणे, त्यांची गुतंवणूक भारतीय कंपन्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे, हे काम करणारी व्यक्ती एक महाराष्ट्रीय आहे. नाशिककरांना तर या व्यक्तीचे खासच कौतुक असायला हवे. आपणा सर्वांनाच अभिमान वाटायला हवा अशा नाशिककर महेश नांदुरकर यांचा परिचय करून घेणे खरे तर अनेकांगाने आवश्यक आहे.

महेश नांदुरकर यांचा जन्म २ जानेवारी १९७५ सालचा. शिक्षण मराठी माध्यमाच्या रचना विद्यालयात झाले, त्यानंतर महेशने आरवायके काॅलेजला प्रवेश घेतला. अभ्यासात अतिशय हुशार असलेला महेश अनेक शिष्यवृत्ती मिळवलेला विद्यार्थी होता. यानंतर आयआयटी बनारस हिंदू विद्यापीठातून त्याने १९९६ मध्ये बी. टेक. पूर्ण केले. इलेक्ट्रॅानिक्स आणि कम्युनिकेशन हा त्यांचा मुख्य विषय होता आणि या ठिकाणी तो अव्वल दहांत होता. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता या ठिकाणी त्याने एमबीए पूर्ण केले. या ठिकाणी त्याचा मुख्य विषय फायनान्स आणि स्ट्रॅटेजी असा होता आणि त्या ठिकाणीसुद्धा तो पहिल्या १० क्रमांकांत होता. वर्ष २०२० मध्ये तो जेफरिज् या जगप्रसिद्ध संस्थेत रुजू झाला. जगातील ज्या सहा मोठ्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँका आहेत, त्यापैकी एक जेफरिज् ही संस्था आहे. गोल्डमन सॅक्स, माॅर्गन स्टॅन्ले, जे पी मॅार्गन अशा संस्थांच्या पंगतीत जेफरिजचे नाव अभिमानाने घेतले जाते. या संस्थेचे वार्षिक उत्पन्न ६५ हजार कोटी रुपये आहे. महेशनी ही संस्था जी भारतात थोडी मागे होती, त्या जेफरिज् इंडियाला २०२० ते २०२३ या वर्षात पहिल्या तीन क्रमांकांत आणले. या संस्थेचा समभाग संशोधन विभाग अत्यंत उत्कृष्ट आहे. एशिया मनी या संस्थेने यांच्या कामांची दखल घेतली. लागोपाठ गेली दोन वर्षे, २०२१, २०२२ या वर्षात ‘इक्विटी रिसर्च’मध्ये पहिल्या क्रमांकाची परदेशी इन्व्हेस्टमेंट बँक म्हणून नाव मिळविले. त्याअगोदर सीएलएसए या दलाली पेढीचा आशिया प्रशांत बाजारपेठ हा विभाग महेशने सांभाळला. २००९ ते २०२० या काळात तो इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम बघत होता. अनेक विषयांवर प्रचंड मेहनत घेऊन गुंतवणुकीसंबंधी त्याने वेगवेगळे संशोधन अहवाल प्रसिद्ध केले आहेत, त्यात बऱ्याच संकल्पनांवर महेशने संशोधन करून त्यावर लिखाण केले आहे.

विशेषत: घरबांधणी क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत, जीएसटी ही संकल्पना अर्थव्यवस्थेत मोठा बदल करू शकली यांचे विवेचन किंवा देशातील शेअर्स गुतंवणुकीची बाजारपेठ कशी उदयास येत आहे याबद्दलसुद्धा त्याने विशेष अभ्यास केला. ‘यूआयडी’चे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचे योगदान राहिले याबद्दलचे त्याचे संशोधन तर नंदन निलेकणी यांनीसुद्धा वाखाणले आहे. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या अगोदर आर्थिक पाहणी अहवाल अर्थ मंत्रालय प्रसिद्ध करीत असते, महेशने यासाठी अर्थ खात्याला मोलाचे सहकार्य केले आहे. हा माणूस संपूर्ण जगामध्ये फिरत असतो. गुंतवणूकदार मेळावे घेत असतो आणि भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूक आणून बाजार संपन्न करण्यासााठी प्रयत्न करत असतो. महेश नांदुरकर आता जेफरिज् इंडियाचा व्यवस्थापकीय संचालक तसेच संशोधन प्रमुख बनला आहे. शेअर बाजाराशी संबंधित विविध घडामोडींवर महेशचे भाष्य जाणून घेण्यासाठी, मॅार्निंग स्टारसह, अनेक वृत्तसंस्था त्याला मानाने बोलावतात.

महेश नांदुरकर हे एक मोठे नाव झालेले आहे. मात्र दुर्दैवाने नाशिककरांना त्याच्याबद्दल काहीही देणेघेणे नाही. नाशिकला ज्या संस्थांमध्ये त्याने शिक्षण घेतले, त्या संस्थांना त्याची माहिती नाही. राजकारणी पुढाऱ्यांना या ना त्या कारणाने विविध कार्यक्रमांना बोलावणारे नाशिकचे वर्तमानपत्रे, उद्योग, व्यवसाय यांच्याशी संबंधित असलेल्या संस्था यांनादेखील त्याची माहिती नाही, याबद्दल खंत व्यक्त करावीशी वाटते. इतर क्षेत्रातल्या व्यक्तींना खूप महत्त्व दिले जाते, मग अर्थकारणात, भांडवल बाजारात गेली २५ वर्षे या व्यक्तीने जे अत्यंत चांगले काम केलेले आहे, त्याची जर नाशिककरांनी दखल घेतली नाही तर त्याची जबाबदार कोणाची? या प्रश्नाला उत्तर नाही.

महेशचे आईवडील आता हयात नाहीत. तोही आता पुरता मुंबईकर झालेला आहे. पंरतु फक्त मुंबईकर तरी का म्हणायचे, कारण तो कधी अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग, चीन, जपान अशा देशांमध्ये सतत फिरत असतो. कधी भारतीय बाजार अवास्तव वाढला आहे म्हणून टीका-टिप्पणीदेखील करतो. एखाद्या कंपनीच्या विरोधात लिहिण्याची कोणत्याही संशोधन संस्थेची ताकद नसते. परंतु महेश त्या कंपनीच्या विरोधात प्रतिकूल संशोधनात्मक अहवाल असला तरी तो प्रसिद्ध करायला कचरत नाही ही त्याची मोठी ताकद आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ ही ज्ञानेश्वरांची शिकवण त्याने खरी करून दाखवली आहे.

Story img Loader