Operation Sindoor Impact On Pakistan Share Market: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ले करत ते उद्ध्वस्त केले आहेत. भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचा पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला असून, पाकिस्तान शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक आज ३५२१.५० अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
दरम्यान आज पाकिस्तानचा शेअर बाजार ६५६० अंकांच्या घसरणीसह उघडला होता. मात्र, त्यामध्ये सुधारणा होत तो ३५२१.५० किंवा ३.१० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ब्रोकरेज आरिफ हबीब लिमिटेडने पोस्ट केलेल्या एका नोटनुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दर कपात केल्यानंतरही केएसई १०० मंगळवारी नकारात्मक आकड्यांमध्ये बंद झाला होता. मंगळवारी कराची स्टॉक एक्सचेंज ५३३.७३ अंकांनी घसरून बंद झाला होता.
संरक्षण मंत्रालयाने बुधवारी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर ऑपरेशन सिंदूर द्वारे कारवाई करण्यात आली आहे. भारताविरुद्ध करण्यात आलेले दहशतवादी हल्ल्यांचा कट या छावण्यांमध्येच रचण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हल्ल्यादरम्यान कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य केले गेले नाही. “हे पाऊल पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
तत्पूर्वी, विश्लेषकांच्या हवाल्याने डॉन पाकिस्तानने वृत्त दिले होते की, मंगळवारी सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये मंदीचे वातावरण होते.
भारत-पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो असा इशारा देणाऱ्या मूडीजच्या अहवालामुळे देखील केएसई१०० वर परिणाम झाला आहे.
पाकिस्तानी दैनिक द डॉनने वृत्त दिले आहे की, मंगळवारी पाकिस्तान सिंधू जल प्राधिकरणाने असा आरोप केला आहे की भारताने चिनाब नदीतून येणारा ९० टक्के पाणीप्रवाह रोखला आहे.
मे महिन्यातील ऐतिहासिक बाजारातील ट्रेंडचा आधार घेत, एसआयए इक्विटीजने केएसई१०० मधील ऐतिहासिक ट्रेंडवरील एका नोंदीत म्हटले आहे की, २०१० पासून शेअर बाजारात आठ वर्षे मंदीचा वरचष्मा राहिला आहे तर सात वर्षे निर्देशांकाने तेजी राखली आहे.
मूडीजचा इशारा
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने “पाकिस्तानच्या विकासावर आणि सरकारच्या चालू आर्थिक योजनांवर परिणाम होईल,” असे रेटिंग एजन्सी मूडीजने त्यांच्या अहवालात दिले आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर दबाव निर्माण होऊन याचा बाह्य वित्तपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो.